भारत की संस्कृति के लिए... भाषा की उन्नति के लिए... साहित्य के प्रसार के लिए

ज्ञानेश्वरी / अध्याय पांचवा / संत ज्ञानेश्वर

Kavita Kosh से
यहाँ जाएँ: भ्रमण, खोज

                अर्जुन उवाचः संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि।
                यत् श्रेयं एतयोरेकें तत् मे ब्रूहि सुनिश्चितम् ॥ १ ॥

मग पार्थु श्रीकृष्णातें म्हणे, हां हो हें कैसें तुमचे बोलणें।
एक होय तरी अंतःकरणे, विचारूं ये ॥ १ ॥

मागां सकळ कर्माचा संन्यासु, तुम्हींचि निरोपिला होता बहुवसु।
तरी कर्मयोगीं केवीं अतिरसु, पोखीतसां पुढती ॥ २ ॥

ऐसें द्व्यर्थ हें बोलतां, आम्हां नेणतयांचिया चित्ता।
आपुलिये चाडे अनंता, उमजू नोहे ॥ ३ ॥

एकें एकसारातें बोधिजे, तरी एकनिष्ठचि बोलिजे।
हें आणिकीं काय सांगिजे, तुम्हांप्रति ॥ ४ ॥

तरी याचिलागीं तुमतें, म्यां राऊळासी विनविले होते।
जे हा परमार्थु ध्वनितें, न बोलावा ॥ ५ ॥

परी मागील असो देवा, आतां प्रस्तुतीं उकलु देखावा।
सांगे दोहींमाजि बरवा, मार्गु कवण ॥ ६ ॥

जो परिणामींचा निर्वाळा, अचुंबितु ये फळा।
आणि अनुष्ठिता प्रांजळा, सावियाचि ॥ ७ ॥

जैसें निद्रेचे सुख न मोडे, आणि मार्गु तरी बहुसाल सांडे।
तैसें सोकासनां सांगडे, सोहपें होय ॥ ८ ॥

येणें अर्जुनाचेनि बोले, देवो मनीं रिझले।
मग होईल ऐकें म्हणितले, संतोषोनियां ॥ ९ ॥

देखा कामधेनु ऐसी माये, सदैवा जया होये।
तो चंद्रुहि परी लाहे खेळावया ॥ १० ॥

पाहें पां शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूचिया आर्ता।
काय क्षीराब्धि दूधभाता, देईजेचिना ॥ ११ ॥

तैसा औदार्याचा कुरुठा, कृष्ण आपु जाहलिया सुभटा।
कां सर्व सुखांचा वसौटा, तोचि नोहावा ॥ १२ ॥

एथ चमत्कारु कायसा, गोसावी लक्ष्मीकांताऐसा।
आतां आपुलिया सवेसा, मागावा कीं ॥ १३ ॥

म्हणोनि अर्जुने म्हणितले, तें हांसोनि येरें दिधले।
तेंचि सांगेन बोलिले, काय कृष्णें ॥ १४ ॥

     श्रीभगवानुवाचः संन्यासं कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ।
                 तयोस्तु कर्मसंन्यासात् कर्मयोगो विशिष्यते ॥ २ ॥

तो म्हणे गा कुंतीसुता, हे संन्यासयोगु विचारितां।
मोक्षकर तत्वता, दोनीहि होती ॥ १५ ॥

तरी जाणां नेणां सकळां, हा कर्मयोगु कीर प्रांजळा।
जैसी नाव स्त्रियां बाळां, तोयतरणीं ॥ १६ ॥

तैसें सारासार पाहिजे, तरी सोहपा हाचि देखिजे।
येणें संन्यासफळ लाहिजे, अनायासें ॥ १७ ॥

आतां याचिलागीं सांगेन, तुज संन्यासियाचे चिन्ह।
मग सहजें हे अभिन्न, जाणसी तूं ॥ १८ ॥

     ज्ञेयः स नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न काङक्षति।
     निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखं बंधात् प्रमुच्यते ॥ ३ ॥

तरी गेलियाचि से न करी, न पवतां चाड न धरी।
जो सुनिश्चळु अंतरीं, मेरु जैसा ॥ १९ ॥

आणि मी माझें ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण।
पार्था तो संन्यासी जाण, निरंतर ॥ २० ॥

जो मनें ऐसा जाहला, संगी तोचि सांडिला।
म्हणोनि सुखें सुख पावला, अखंडित ॥ २१ ॥

आतां गृहादिक आघवें, तें कांहीं नलगे त्यजावें।
जें घेतें जाहलें स्वभावें, निःसंगु म्हणऊनि ॥ २२ ॥

देखें अग्नि विझोनि जाये, मग जे रांखोंडी केवळु होये।
तैं ते कापुसें गिंवसूं ये, जियापरी ॥ २३ ॥

तैसा असतेनि उपाधी, नाकळिजे जो कर्मबंधीं।
जयाचीचे बुद्धी, संकल्पु नाहीं ॥ २४ ॥

म्हणोनि कल्पना जैं सांडे, तैंचि गा संन्यासु घडे।
या कारणे दोनी सांगडे, संन्यासयोगु ॥ २५ ॥

     सांख्ययोगौ पृथक् बालाः प्रवदन्ति न पंडिताः।
     एकमप्यास्थितः सम्यगुभयोर्विन्दते फलम् ॥ ४ ॥

एऱ्हवीं तरी पार्था, जे मूर्ख होती सर्वथा।
ते सांख्यकर्मसंस्था, जाणती केवीं ॥ २६ ॥

सहजें ते अज्ञान, म्हणोनि म्हणती हे भिन्न।
एऱ्हवी दीपाप्रती काई अनान, प्रकाशु आहाती ॥ २७ ॥

पैं सम्यक् एकें अनुभवें, जिहीं देखिलें तत्व आघवें।
ते दोन्हीतेंही ऐक्यभावें, मानिती गा ॥ २८ ॥

     यत् सांख्यैः प्राप्यते स्थानं तत योगैरपि गम्यते।
     एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति ॥ ५ ॥

आणि सांख्यीं जें पाविजे, तेंचि योगीं गमिजे।
म्हणोनि ऐक्यता दोहींते सहजें, इयापरी ॥ २९ ॥

देखें आकाशा आणि अवकाशा, भेदु नाहीं जैसा।
तैसे ऐक्य योगसंन्यासा, वोळखे जो ॥ ३० ॥

तयासीचि जगीं पाहलें, आपणपें तेणेंचि देखिलें।
जया सांख्ययोग जाणवले, भेदेंविण ॥ ३१ ॥

     संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः।
     योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिच्छति ॥ ६ ॥

जो युक्तिपंथें पार्था, चढे मोक्षपर्वता।
तो महासुखाचा निमथा, वहिला पावे ॥ ३२ ॥

येरा योगस्थिति जया सांडे, तो वायांचि गा हव्यासीं पडे।
परि प्राप्ति कहीं न घडे, संन्यासाची ॥ ३३ ॥

     योगयुक्तो विशुध्दात्मा विजितात्मा जितेद्रियः,
     सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते ॥ ७ ॥

जेणें भ्रांतीपासूनि हिरतलें, गुरुवाक्यें मन धुतलें।
मग आत्मस्वरुपीं घातलें, हारौनियां ॥ ३४ ॥

जैसें समुद्रीं लवण न पडे, तवं वेगळे अल्प आवडे।
मग होय सिंधूचि एवढें, मिळे तेव्हां ॥ ३५ ॥

तैसें संकल्पोनि काढिलें, जयाचें मनचि चैतन्य जाहलें।
तेणें एकदेशियें परि व्यापिलें , लोकत्रय ॥ ३६ ॥

आतां कर्ता कर्म करावें , हें खुंटलें तया स्वभावें।
आणि करी जऱ्ही आघवें, तऱ्ही अकर्ता तो ॥ ३७ ॥

     नैव किंचित् करोमीति युक्तो मन्येत तत्वचित्।
     पश्चन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन्नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् ॥ ८ ॥

     प्रलपन् विसृजन् गृण्हन्नुन्मिषन् निमिषन्नपि।
     इंद्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ॥ ९ ॥

जे पार्था तया देहीं, मी ऐसा आठऊ नाहीं।
तरी कर्तृत्व कैचें काई, उरे सांगे ॥ ३८ ॥

ऐसें तनुत्यागेंवीण, अमूर्ताचे गुण,
दिसती संपूर्ण , योगयुक्तां ॥ ३९ ॥

एऱ्हवीं आणिकांचिये परी, तोही एक शरीरी।
अशेषाही व्यापारीं, वर्ततु दिसे ॥ ४० ॥

तोही नेत्रीं पाहे, श्रवणीं ऐकतु आहे।
परि तेथींचा सर्वथा नोहे, नवल देखें ॥ ४१ ॥

स्पर्शासि तरी जाणे, परिमळु सेवी घ्राणें।
अवसरोचित बोलणें, तयाहि आथी ॥ ४२ ॥

आहारातें स्वीकारी, त्यजावें तें परिहरि।
निद्रेचिया अवसरीं, निदिजे सुखें ॥ ४३ ॥

आपुलेनि इच्छावशें, तोही गा चालतु दिसे।
पैं सकळ कर्म ऐसें, रहाटे कीर ॥ ४४ ॥

हें सांगों काई एकैक, देखें श्वासोच्छासादिक।
आणि निमिषोन्निमिष, आदिकरुनि ॥ ४५ ॥

पार्था तयाचे ठायीं , हें आघवेंचि आथि पाहीं।
परि तो कर्ता नव्हे कांही, प्रतीतिबळें ॥ ४६ ॥

जैं भ्रांती सेजे सुतला, तैं स्वप्नसुखें भुतला।
मग तो ज्ञानोदयी चेइला, म्हणोनियां ॥ ४७ ॥

     ब्रह्मण्याधाय कर्माणि संग त्यक्त्वा करोति यः।
     लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भ्सा ॥ १० ॥

आतां अधिष्ठानसंगती, अशेषाही इंद्रियवृत्ती।
आपुलालिया अर्थीं, वर्तत आहाती ॥ ४८ ॥

दीपाचेनि प्रकाशें, गृहींचे व्यापार जैसे।
देहीं कर्मजात तैसे, योगयुक्ता ॥ ४९ ॥

तो कर्में करी सकळें, परी कर्मबंधा नाकळे।
जैसें न सिपें जळीं जळें, पद्मपत्र ॥ ५० ॥

     कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि।
     योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्त्वात्मशुद्धये ॥ ११॥

देखे बुध्दीची भाष नेणिजे, मनाचा अंकुर नुदैजे।
ऐसा व्यापारु तो बोलिजे, शारीरु गा ॥ ५१ ॥

हेंच मराठे परियेशीं, तरी बाळकाची चेष्टा जैशी।
योगिये कर्मे करिती तैशीं , केवळा तनू ॥ ५२ ॥

मग पांचभौतिक संचलें, जेव्हां शरीर असे निदेलें।
तेथ मनचि राहाटें एकलें, स्वप्नीं जेवीं ॥ ५३ ॥

नवल ऐकें धनुर्धरा, कैसा वासनेचा संसारा।
देहा होऊं नेदी उजगरा, परि सुखदुःखें भोगी ॥ ५४ ॥

इंद्रियांचां गांवीं नेणिजे, ऐसा व्यापारु जो निपजे।
तो केवळु गा म्हणिजे, मानसाचा ॥ ५५ ॥

योगिये तोही करिती, परि कर्में तेणें न बंधिजती।
जे सांडिली आहे संगती, अंहभावाची ॥ ५६ ॥

आतां जाहालिया भ्रमहत, जैसें पिशाचाचें चित्त।
मग इंद्रियांचे चेष्टित, विकळु दिसे ॥ ५७ ॥

स्वरूप तरी देखे, आळविलें आइके।
शब्दु बोले मुखें, परि ज्ञान नाही ॥५८ ॥

हें असो काजेंविण, जें जें काही कारण।
तें केवळ कर्म जाण, इंद्रियांचे ॥ ५९ ॥

मग सर्वत्र जें जाणतें , ते बुद्धीचें कर्म निरूतें ।
वोळख अर्जुनातें, म्हणे हरि ॥ ६० ॥

ते बुद्धी धुरे करुनी, कर्म करिती चित्त देऊनी।
परि ते नैष्कम्यापासुनी , मुक्त दिसती ॥ ६१ ॥

जें बुद्धीचिये ठावूनि देही, तयां अंहकाराची सेचि नाहीं ।
म्हणोनि कर्म करितां पाही, चोखाळले ॥ ६२ ॥

अगा करितेनवीण कर्म, तेंचि तें नैष्कर्म्य।
हें जाणती सुवर्म, गुरुगम्य जें ॥ ६३ ॥

आतां शांतरसाचें भरितें, सांडीत आहे पात्रातें।
जें बोलणें बोलापरौतें, बोलवलें ॥ ६४ ॥

एथ इंद्रियांचा पांगु, जया फिटला आहे चांगु।
तयासीचि आथी लागु, परिसावया ॥ ६५ ॥

हा असो अतिप्रसंगु, न संडी पां कथालागु।
होईल श्लोकसंगति भंगु, म्हणोनियां ॥ ६६ ॥

जें मना आकळितां कुवाडें, घाघुसितां बुद्धी नातुडे।
तें दैवाचेनि सुरवाडें, सांगवलें तुज ॥ ६७ ॥

जें शब्दातीत स्वभावें, तें बोलींचि जरी फावे।
तरी आणिकें काय करावें, सांगे कथा ॥ ६८ ॥

हा आर्तिविशेषु श्रोतयांचा, जाणोनि दास निवृतीचा।
म्हणे संवादु दोघांचा, परिसोनि परिसा ॥ ६९ ॥

मग कृष्ण म्हणे पार्थातें, आतां प्राप्ताचें चिन्ह पुरतें।
सांगेन तुज निरुतें, चित्त देई ॥ ७० ॥

     युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोप्ति नैष्ठीकीम्।
     अयुक्तः कामकारेण फले सक्तो निवध्यते ॥ १२ ॥

तरी आत्मयोगें आथिला, जो कर्मफळाशीं विटला।
तो घर रिघोनि वरिला, शांति जगीं ॥ ७१ ॥

येरु कर्मबधें किरीटी, अभिलाषाचिया गांठीं।
कळासला खुंटी, फळभोगाचां ॥ ७२ ॥

     सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी।
     नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन् न कारयन् ॥ १३ ॥

जैसा फळाचिया हांवे, तैसें कर्म करि आघवें।
मग न कीजेचि येणें भावें, उपेक्षी जो ॥ ७३ ॥

तो जयाकडे वास पाहे, तेउती सुखाची सृष्टी होये।
तो म्हणे तेथ राहे, महाबोधु ॥ ७४ ॥

नवद्वारें देहीं, तो असतुचि परि नाहीं।
करितुचि न करी कांही, फलत्यागी ॥ ७५ ॥

     न कर्तृत्वत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः।
     न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते ॥ १४ ॥

जैसा कां सर्वेश्वरु, पाहिजे तंव निर्व्यापारु।
परि तोचि रची विस्तारु, त्रिभुवनाचा ॥ ७६ ॥

आणि कर्ता ऐसें म्हणिपे, तरी कवणें कर्मीं न शिंपें।
जे हातोपावो न लिंपे , उदासवृतीचा ॥ ७७ ॥

योगनिद्रा तरी न मोडे, अकर्तेपणा सळु न पडे।
परि महाभूतांचे दळवाडें, उभारी भले ॥ ७८ ॥

जगाचा जीवीं आहे, परि कवणाचा कहीं नोहे।
जगचि हें होय जाये, तो शुद्धीहि नेंणे ॥ ७९ ॥

     नादत्ते कस्यचित् पापं न चैव सकृतं विभुः।
     अज्ञानेनावृतं ज्ञान तेन मुह्यन्ति जन्तवः ॥ १५ ॥

पापपुण्यें अशेषें, पासींचि असतु न देखें।
आणि साक्षीही होऊं न ठके, येरी गोठी कायसी ॥ ८० ॥

पै मूर्तीचेनि मेळें, तो मूर्तचि होऊनि खेळे,
परि अमूर्तपण न मैळे, दादुलयाचें ॥ ८१ ॥

तो सृजी पाळी संहारी, ऐसे बोलती जे चराचरीं,
ते अज्ञान गा अवधारीं, पंडुकुमरा ॥ ८२ ॥

     ज्ञानेन न तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः,
     तेषामादित्यवत् ज्ञान प्रकाशयति तत्परम् ॥ १६ ॥

तें अज्ञान जैं समूळ तुटे, तैं भ्रांतीचें मसैरें फिटे,
मग अकर्तृत्व प्रगटे , ईश्वराचें ॥ ८३ ॥

एथ ईश्वरु एकु अकर्ता, ऐसे मानले जरी चित्ता,
तरी तोचि मी हें स्वभावता, आदीचि आहे ॥ ८४ ॥

ऐसेनि विवेकें उदो चित्तीं, तयासी भेदु कैंचा त्रिजगतीं,
देखें आपुलिया प्रतीति, जगचि मुक्त ॥ ८५ ॥

जैशी पूर्वदिशेच्या राउळीं, उदयाचि सूर्ये दिवाळी,
की येरीही दिशां तियेचि काळी, काळिमा नाही ॥ ८६ ॥

     तद् बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः,
     गच्छन्त्यपुनरावृत्ति ज्ञाननिर्धूतकल्मषाः ॥ १७ ॥

बुद्धिनिश्चयें आत्मज्ञान, ब्रह्मरुप भावी आपणा आपण,
ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण , तत्परायण अहर्निशीं ॥ ८७ ॥

ऐसें व्यापक ज्ञान भलें, जयांचिया हृदयाते गिंवसित आलें,
तयांची समता दृष्टि बोलें , विशेषूं काई ॥ ८८ ॥

एक आपणपेंचि पां जैसें, ते देखतीं विश्व तैसे,
हें बोलणें कायसें, नवलु एथ ॥ ८९ ॥

परी दैव जैसें कवतिकें, कहींचि दैन्य न देखे,
कां विवेकु हा नोळखे, भ्रांतीतें जेवीं ॥ ९० ॥

नातरी अंधकाराची वानी, जैसा सूर्यो न देखे स्वप्नीं,
अमृत नायके कानी, मृत्युकथा ॥ ९१ ॥

हें असो संतापु कैसा, चंद्रु न स्मरे जैसा,
भूतीं भेदु नेणती तैसा , ज्ञानिये ते ॥ ९२ ॥

     विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि,
     शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः ॥ १८ ॥

मग हा मशकु हा गजु, कीं हा श्वपचु हा द्विपु,
पैल इतरु हा आत्मजु, हें उरेल कें ॥ ९३ ॥

ना तरी हे धेनु हें श्वान, एक गुरु एक हीन।
हें असो कैचें स्वप्न, जागतया ॥ ९४ ॥

एथ भेदु तरी कीं देखा, जरि अंहभावा उरला होआवा,
तो आधींचि नाहीं आघवा, आतां विषमु काई ॥ ९५ ॥

     इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः,
     निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद् ब्रह्मणि ते स्थिताः ॥ १९ ॥

म्हणोनि सर्वत्र सदा सम, तें आपणचि अद्वय ब्रह्म,
हें संपूर्ण जाणें वर्म, समदृष्टीचें ॥ ९६ ॥

जिहीं विषयसंगु न सांडिता, इंद्रियांतें न दंडितां,
परि भोगिली निसंगता, कामेंविण ॥ ९७ ॥

जिहीं लोकांचेनि आधारें, लौकिकेंचि व्यापारें ।
परि सांडिले निदसुरें, लौकिकु हें ॥ ९८ ॥

जैसा जनामाजी खेचरु, असतुचि जना नोहे गोचरु,
तैसा शरीरीं परि संसारु, नोळखें तयांतें ॥ ९९ ॥

हें असो पवनाचेनि मेळें, जैसें जळींचि जळ लोळे,
तें आणिकें म्हणती वेगळें , कल्लोळ हे ॥ १०० ॥

तैसें नाम रुप तयाचें, एऱ्हवीं ब्रह्मचि तो साचें।
मन साम्या आलें जयाचें, सर्वत्र गा ॥ १०१ ॥

ऐसेनि समदृष्टी जो होये, तया पुरुषा लक्षणही आहे।
अर्जुना संक्षेपे सांगेन पाहें, अच्युत म्हणे ॥ १०२ ॥

     न प्रहृष्येत् प्रियं प्राप्य नोद्विजेत् प्राप्य् चाप्रियम्।
     स्थिरबुध्दिरसंमूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः ॥ २० ॥

तरी मृगजळाचेनि पूरें, जैसें न लोटिजे कां गिरिवरें।
तैसा शुभाशुभीं न विकरे, पातलां जो ॥ १०३ ॥

तोचि तो निरुता, समदृष्टी तत्वता।
हरि म्हणे पंडुसुता, तोचि ब्रह्म ॥ १०४ ॥

     ब्राह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत् सुखम्।
     स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते ॥ २१ ॥

जो आपणपे सांडुनि कहीं, इंद्रियग्रामावरी येणेंचि नाहीं।
तो विषय न सेवी हें काई, विचित्र येथ ॥ १०५ ॥

सहजें स्वसुखाचेनि अपारें, सुरवाडे अंतरें।
रचिला म्हणऊनि बाहिरें, पाउल न घली ॥ १०६ ॥

सांगे कुमुददळाचेनि ताटें, जो जेविला चंद्रकिरणें चोखटे।
तो चकोरु काई वाळुवंटे, चुंबितु आहे ॥ १०७ ॥

तैसें आत्मसुख उपाइलें, जयासि आपणपेचिं फावलें।
तया विषयो सहजे सांडवले, म्हणो काई ॥ १०८॥

एऱ्हवीं तरी कौतुकें, विचारुनि पाहें पां निकें।
या विषयांचेनि सुखे, झकविती कवण ॥ १०९ ॥

     ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते।
     आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः ॥ २२ ॥

जिहीं आपणपें नाहीं देखिलें, तेचि इहीं इंद्रियार्थीं रंजले।
जैसें रंकु का आळुकैलें, तुषातें सेवी ॥ ११० ॥

नातरी मृगें तृषापीडितें, संभ्रमें विसरोनि जळांते।
मग तोयबुद्धी बरडीतें, ठाकूनि येती ॥ १११ ॥

तैसें आपणपें नाहीं दिठे, जयातें स्वसुखाचे सदा खरांटे।
तयासीचि विषय हे गोमटे, आवडती ॥ ११२ ॥

एऱ्हवीं विषयीं काइ सुख आहे, हे बोलणेंचि सारिखें नोहे।
तरी विद्युत्स्फुरणें कां न पाहे, जगामाजीं ॥ ११३ ॥

सांगें वातवर्षआतपु धरे, ऐसे अभ्रछायाचि जरी सरे।
तरी त्रिमाळिकें धवळारें , करावीं कां ॥ ११४ ॥

म्हणोनि विषयसुख जें बोलिजे, तें नेणतां गा वायां जल्पिजे।
जैसें महूर कां म्हणिजे, विषकंदातें ॥ ११५ ॥

नातरी भौमा नाम मंगळु, रोहिणीतें म्हणती जळु।
तैसा सुखप्रवादु बरळु, विषयिकु हा ॥ ११६ ॥

हे असो आघवी बोली, सांग पा सर्पफणीची साउली।
ते शीतल होईल केतुली, मूषकासी ॥ ११७ ॥

जैसा आमिषकवळु पांडवा, मीनु न सेवी तंवचि बरवा।
तैसा विषयसंगु आघवा, निभ्रांत जाणें ॥ ११८ ॥

हे विरक्तांचिये दिठी, जैं न्याहाळिजे किरीटी।
तैं पांडुरोगाचिये पुष्टि-।सारिखें दिसे ॥ ११९ ॥

म्हणोनि विषयभोगी जें सुख, तें साद्यंतचि जाण दुःख।
परि काय कीजे मूर्ख, न सेवितां न सरे ॥ १२० ॥

तें अंतर नेणती बापुडे, म्हणोनि अगत्य सेवणें घडे।
सांगे पूयपंकीचे किडे, काय चिळसी घेती ॥ १२१ ॥

तयां दुःखियां दुःखचि जिव्हार, ते विषयकर्दमींचे दर्दुर।
ते भोगजळींचे जलचर, सांडिती केवी ॥ १२२।।

आणि दुःखयोनि जिया आहाती, तिया निरर्थका तरी नव्हती।
जरी विषयांवरी विरक्ती, धरिती जीव ॥ १२३ ॥

नातरी गर्भवासादि संकट, कां जन्ममरणींचे कष्ट।
हे विसांवेवीण वाट, वाहावी कवणें ॥ १२४ ॥

जरी विषयीं विषयो सांडिजेल, तरी महादोषी कें वसिजेल।
आणि संसारु हा शब्दु नव्हेल, लटिका जगीं ॥ १२५ ॥

म्हणोनि अविद्याजात नाथिलें, तें तिहींचि साच दाविलें।
जिहीं सुखबुद्धी घेतलें, विषयदुःख ॥ १२६ ॥

या कारणें गा सुभटा, हा विचारितां विषय वोखटा।
तूं झणें कहीं या वाटा, विसरोनि जाशी ॥ १२७ ॥

पै यातें विरक्त पुरुष, त्यजिती कां जैसें विष।
निराशा तयां दुःख, दाविलें नावडे ॥ १२८ ॥

     शक्नोतीहैव यः सोढुं प्राक् शरीरविमोक्षणात्।
     कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः सुखी नरः ॥ २३ ॥

ज्ञानियांच्या हन ठायीं, याची मातुही कीर नाहीं।
देहीं देहभावो जिहीं, स्ववश केले ॥ १२९ ॥

जयांतें बाह्याची भाष, नेणिजेचि निःशेष।
अंतरीं सुख, एक आथी ॥ १३० ॥

परि तें वेगळेपणें भोगिजे, जैसे पक्षिये फळ चुंबिजे।
तैसें नव्हे तेथ विसरिजे, भोगितेपणही ॥ १३१ ॥

भोगीं अवस्था एक उठी, ते अंहकाराचा अचळु लोटी।
मग सुखेंसि आंठी, गाढेपणें ॥ १३२ ॥

तिये आलिंगनमेळीं, होय आपेंआप कवळी।
तेथ जळ जैसें जळी, वेगळें न दिसे ॥ १३३ ॥

कां आकाशीं वायु हारपे, तेथ दोन्ही हे भाष लोपे।
तैसे सुखचि उरे स्वरुपें, सुरतीं तिये ॥ १३४ ॥

ऐसी द्वैताची भाष जाय, मग म्हणों जरी एकचि होय।
तरी तेथ साक्षी कवणु आहे, जाणतें जे ॥ १३५ ॥

     योऽन्तःसुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव यः।
     स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति ॥ २४ ॥

     लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृषयः क्षीणकल्मषाः।
     छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रताः ॥ २५ ॥

म्हणोनि असो हें आघवें, एथ न बोलणें काय बोलावें।
ते खुणाचि पावेल स्वभावें, आत्माराम ॥ १३६ ॥

जे ऐसेनि सुखें मातले, आपणपांचि आपण गुंतले।
ते मी जाणे निखळ वोतले, साम्यरसाचे ॥ १३७ ॥

ते आनंदाचे अनुकार, सुखाचे अंकुर।
कीं महाबोधें विहार, केले जैसे ॥ १३८ ॥

ते विवेकाचें गांव, की परब्रह्मीचे स्वभाव।
नातरी अळंकारले अवयव, ब्रह्मविद्येचे ॥ १३९ ॥

ते सत्त्वाचे सात्त्विक, की चैतन्याचे आंगिक।
हें बहु असो एकैक, वानिसी काई ॥ १४० ॥

तूं संतस्तवनी रतसी, तरी कथेची से न करिसी।
कीं निराळी बोल देखसी, सनागर ॥ १४१ ॥

परि तो रसातिशयो मुकुळीं, मग ग्रंथार्थदीपु उजळीं।
करी साधुहृदयराउळीं, मंगळ उखा ॥ १४२ ॥

ऐसा श्रीगुरुचा उवायिला, निवृत्तिदासासी पातला।
मग तो म्हणे कृष्ण बोलिला, तेंचि आइका ॥ १४३ ॥

अर्जुना अंनत सुखाच्या डोहीं, एकसरा तळुचि घेतला जिहीं।
मग स्थिराऊनी तेही, तेंचि जाहले ॥ १४४ ॥

अथवा आत्मप्रकाशें चोखें, जो आपणपेंचि विश्व देखे।
तो देहेंचि परब्रह्म सुखें, मानूं येईल ॥ १४५ ॥

जें साचोकारें परम, ना तें अक्षर निःसीम।
जिये गांवींचे निष्काम, अधिकारिये ॥ १४६ ॥

जे महर्षीं वाढले, विरक्तां भागा फिटलें।
जे निःसंशया पिकलें, निरंतर ॥ १४७ ॥

कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम्।
अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम् ॥ २६ ॥

जिहीं विषयांपासोनि हिरतलें, चित्त आपुलें आपण जिंतिले।
ते निश्चित जेथ सुतले, चेतीचिना ॥ १४८ ॥

तें परब्रह्म निर्वाण, जें आत्मविदांचें कारण।
तेचि ते पुरुष जाण, पंडुकुमरा ॥ १४९ ॥

ते ऐसे कैसेनि जाहले, जे देहींचि ब्रह्मत्वा आले।
हें ही पुससी तरी भलें, संक्षेपे सांगो ॥ १५० ॥

     स्पर्शान् कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रवोः।
     प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ ॥ २७ ॥

तरी वैराग्यचेनि आधारें, जिहीं विषय दवडुनि बाहिरें।
शरीरीं एकंदरें, केलें मन ॥ १५१ ॥

सहजें तिहीं संधी भेटी, जेथ भ्रुपल्लवां पडे गांठी।
तेथ पाठमोरी दिठी, पारुखोनियां ॥ १५२ ॥

सांडूनि दक्षिण वाम, प्राणापानसम।
चित्तेंसीं व्योम-, गामिये करिती ॥ १५३ ॥

     यतेद्नियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः।
     विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः ॥ २८ ॥

तेथ जैसीं रथ्योदकें सकळें, घेऊनि गंगा समुद्री मिळे।
मग एकैक वेगळें, निवडु नये ॥ १५४ ॥

तैसी वासनांतराची विवंचना, मग आपैसी पारुखे अर्जुना।
जे वेळी गगनीं लयो मना, पवनें कीजे ॥ १५५ ॥

जेथ हें संसारचित्र उमटे, तो मनोरुपु पटु फाटे।
जैसें सरोवर आटे, मग प्रतिमा नाहीं ॥ १५६ ॥

तैसें मनपण मुदल जाये, मग अंहभावादिक कें आहे।
म्हणोनि शरीरेंचि ब्रह्म होये, अनुभवी तो ॥ १५७ ॥

     भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम्।
     सुहृद सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति ॥ २९ ॥

आम्ही मागां हन सांगितलें, जे देहींचि ब्रह्मत्व पावले।
ते येणें मार्गे आले, म्हणऊनिया ॥ १५८ ॥

आणि यमनियमांचे डोंगर, अभ्यासाचे सागर।
क्रमोनि हे पार, पातले ते ॥ १५९ ॥

तिहीं आपणपें करुनि निर्लेप, प्रंपचाचें घेतलें माप।
मग साचाचेंचि रुप, होऊनि ठेले ॥ १६० ॥

ऐसा योगयुक्तीचा उद्देशु, जेथ बोलिला हृषीकेशु।
तेथ अर्जुनु सुदंशु, म्हणोनि चमत्कारला ॥ १६१ ॥

तें देखिलिया कृष्णें जाणितलें, मग हांसोनि पार्थातें म्हणितलें।
तें काई पां चित्त उवाइलें, इये बोलीं तुझे ॥ १६२ ॥

तंव अर्जुन म्हणे देवो, परचित्तलक्षणांचा रावो।
भला जाणितला जी भावो, मानसु माझा ॥ १६३ ॥

म्यां जें काहीं विवरुनि पुसावें, ते आधींचि कळले देवें।
तरी बोलिलें तेंचि सांगावें, विवळ करुनि ॥ १६४ ॥

एऱ्हवीं तरी अवधारा, जो दाविला तुम्हीं अनुसारा।
तो पव्हण्याहूनि पायउतारा, सोहपा जैसा ॥ १६५ ॥

तैसा सांख्याहूनि प्रांजळा, तरी आम्हांसारिखियां अभोळां।
एथ आहाति कांही परि काळा, तो साहों ये वर ॥ १६६ ॥

म्हणोनि एक वेळ देवा, तोचि पडताळा घेयावा।
विस्तरेल तरी सांगावा, साद्यंतुचि ॥ १६७ ॥

तंव कृष्ण म्हणती हो कां, तुज हा मार्ग गमला निका,
तरी काय जाहलें ऐंकिजो कां, सुखें बोलों ॥ १६८ ॥

अर्जुना तु परिससी, परिसोनि अनुष्ठिसी।
तरी आम्हांसीचि वानी कायसी, सांगावयाची ॥ १६९ ॥

आधींच चित्त मायेचें, वरी मिष जाहलें पढियंताचे,
आतां तें अद्भुतपण स्नेहाचें, कवण जाणे ॥ १७० ॥

ते म्हणों कारुण्यरसाची वृष्टि , कीं नवया स्नेहाची सृष्टि।
हें असे नेणिजे दृष्टी, हरीची वानूं ॥ १७१ ॥

जे अमृताची वोतली, कीं प्रेमचि पिऊन मातली।
म्हणोनि अर्जुनमोहें गुंतली, निघों नेणे ॥ १७२ ॥

हें बहु जें जें जल्पिजेल, तेथें कथेसि फांकु होईल।
परि स्नेह रुपा नयेल, बोलवरी ॥ १७३ ॥

म्हणोनि विसुरा काय येणें, तो ईश्वरु आकळावा कवणें।
जो आपुलें मान नेणे, आपणचि ॥ १७४ ॥

तरी मागीला ध्वनीआंतु, मज गमला सावियाचि मोहितु।
जे बलात्कारें असे म्हणतु, परिस बापा ॥ १७५ ॥

अर्जुना जेणें भेदें, तुझें कां चित्त बोधे।
तैसें तैसें विनोदें, निरुपिजेल ॥ १७६ ॥

तो काइसया नाम योगु, तयाचा कवण उपेगु।
अथवा अधिकारप्रसंगु, कवणा येथ ॥ १७७ ॥

ऐसें जें जें कांही, उक्त असे इये ठाई।
तें आघवेंचि पाहीं, सांगेन आतां ॥ १७८ ॥

तूं चित्त देऊनि अवधारीं, ऐसें म्हणोनि श्रीहरी।
बोलिजेल ते पुढारी, कथा आहे ॥ १७९ ॥

श्रीकृष्ण अर्जुनासी संगु, न सांडोनि सांगेल योगु।
तो व्यक्त करु प्रसंगु, म्हणे निवृत्तिदासु ॥ १८० ॥

इति श्रीमदभगवदगीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे योगगर्भो नाम पञ्चमोऽध्यायः।

॥ ॐ श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु ॥