भारत की संस्कृति के लिए... भाषा की उन्नति के लिए... साहित्य के प्रसार के लिए

ज्ञानेश्वरी / अध्याय चौथा / संत ज्ञानेश्वर

Kavita Kosh से
यहाँ जाएँ: भ्रमण, खोज

आजि श्रवणेंद्रिया पिकलें, जे येणें गीतानिधान देखिलें।
आता स्वप्नचि हें तुकलें, साचासरिसें ॥ १ ॥

आधी विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी कृष्ण जगजेठी।
आणि भक्तराजु किरीटी, परिसत असे ॥ २ ॥

जैसा पंचमालापु सुगंधु, कीं परिमळ आणि सुस्वादु।
तं भला जाहला विनोदु, कथेचा इये ॥ ३ ॥

कैसी आगळिक दैवाची, जे गंगा वोळली अमृताची।
हो कां जपतपें श्रोतयांची, फळा आली ॥ ४ ॥

आतां इंद्रियजात आघवें, तिहीं श्रवणाचे घर रिघावें।
मग संवादसुख भोगावें, गीताख्य हें ॥ ५ ॥

हा अतिसो अतिप्रसंगे, सांडूनि कथाचि ते सांगे।
जे कृष्णार्जुन दोघे, बोलत होते ॥ ६ ॥

ते वेळी संजयों रायातें म्हणे, अर्जुन अधिष्ठिला दैवगुणें।
जे अतिप्रीती नारायणें, बोलिजतु असे ॥ ७ ॥

जें न संगेचि पितया वसुदेवासी, जें न संगे माते देवकीसी।
जें न संगेचि बळिभद्रासी, तें गुह्य अर्जुनेंसी बोलत ॥ ८ ॥

देवी लक्ष्मीयेवढी जवळीक, तेही न देखे या प्रेमाचे सुख।
आणि कृष्णस्नेहाचें पिक, यांतेचि आथी ॥ ९ ॥

सनकादिकांच्या आशा, वाढिनल्या होत्या कीर बहुवसा।
परी त्याही येणें माने यशा, येतीचिना ॥ १० ॥

या जगदीश्वराचें प्रेम, एथ दिसतसे निरुपम।
कैसें पार्थें येणें सर्वोत्तम, पुण्य केलें ॥ ११ ॥

हो कां जयाचिया प्रीती, अमूर्त हा आला व्यक्ती।
मज एकवंकी याची स्थिती, आवडतु असे ॥ १२ ॥

एर्हकवीं हा योगिया नाडळे, वेदार्थासी नाकळे।
जेथ ध्यानाचेही डोळे, पावतीना ॥ १३ ॥

तें हा निजस्वरूप, अनादि निष्कंप।
परी येणे मानें सकृप, जाहला असे ॥ १४ ॥

हा त्रैलोक्यपटाचि घडी, आकाराची पैलथडी।
कैसा याचिये आवडी, आवरला असे ॥ १५ ॥

     श्रीभगनानुवाच: इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम्।
                 विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत् ॥ १ ॥

मग देव म्हणे अगा पंडुसुता, हाचि योगु आम्हीं विवस्वता।
कथिला परी ते वार्ता, बहुवां दिवसांची ॥ १६ ॥

मग तेणें विवस्वतें रवी, हे योगस्थिति आघवी।
निरूपिली बरवी, मनूप्रती ॥ १७ ॥

मनूनें आपण अनुष्ठिली, मग इक्ष्वाकुवा उपदेशिली।
ऐसी परंपरा विस्तारिली, आद्य हे गा ॥ १८ ॥

     एवं परंपराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः।
     स कालेनेह महता योगो नष्टः परंतप ॥ २ ॥

मग आणिकही या योगाते, राजर्षि जाहले जाणते।
परी तेथोनि आतां सांप्रतें, नेणिजे कोणी ॥ १९ ॥

जे प्राणियां कामी भरू, देहाचिवरी आदरु।
म्हणोनि पडला विसरु, आत्मबोधाचा ॥ २० ॥

अव्हांटलिया आस्थाबुद्धि, विषयसुखचि परमावधि।
जीवु तैसा उपाधि, आवडे लोकां ॥ २१ ॥

एर्ह वीं तरी खवणेयांच्या गांवीं, पाटाऊवें काय करावीं।
सांगे जात्यंधा रवी, काय आथी ॥ २२ ॥

कां बहिरयांचां आस्थानीं, कवणे गीतातें मानी।
कीं कोल्हेया चांदणीं, आवडी उपजे ॥ २३ ॥

पैं चंद्रोदया आरौतें, जयांचे डोळे फुटती असते।
ते काऊळे केवीं चंद्रातें, ओळखती ॥ २४ ॥

तैसे वैराग्याची शिंव न देखती, जे विवेकाची भाषा नेणती।
ते मूर्ख केंवीं पावती, मज ईश्वराते ॥ २५ ॥

कैसा नेणों मोहो वाढीनला, तेणें बहुतेक काळु व्यर्थ गेला।
म्हणोनि योगु हा लोपला, लोकीं इये ॥ २६ ॥

     स एवायं मया तेऽद्य योगः प्रोक्तः पुरातनः।
     भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम् ॥ ३ ॥

तोचि हा आजि आतां, तुजप्रती कुंतीसुता।
सांगितला आम्हीं तत्वता, भ्रांति न करीं ॥ २७ ॥

हें जीवींचे निज गुज, परी केवीं राखों तुज।
जे पढियेसी तूं मज, म्हणऊनियां ॥ २८ ॥

तूं प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा।
मैत्रियेची चित्कळा, धनुर्धरा ॥ २९ ॥

तूं अनुसंगाचा ठावो, आतां तुज काय वंचूं जावों।
जरी संग्रामारूढ आहों, जाहलों आम्ही ॥ ३० ॥

तरी नावेक हें सहावें, गाजाबज्यही न धरावें।
परी तुझें अज्ञानत्व हरावें, लागे आधीं ॥ ३१ ॥

     अर्जुन उवाच: अपरं भवतो जन्मं परं जन्म विवस्वतः।
                कथमेतद् विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति ॥ ४ ॥

तंव अर्जुन म्हणे हरी, माय आपुलेयाचा स्नेहो करी।
एथ विस्मो काय अवधारीं, कृपानिधी ॥ ३२ ॥

तूं संसारश्रांतांची साऊली, अनाथ जीवांची माऊली।
आमुतें कीर प्रसवली, तुझीच कृपा ॥ ३३ ॥

देवा पांगुळ एकादें विईजे, तरी जन्मोनि जोजारू साहिजे।
हें बोलों काय तुझें, तुजचि पुढां ॥ ३४ ॥

आतां पुसेन जें मी कांही, तेथ निकें चित्त देईं।
तेवींचि देवें कोपावें ना कांही, बोला एका ॥ ३५ ॥

तरी मागील जे वार्ता, तुवां सांगितली होती अनंता।
ते नावेक मज चित्ता, मानेचिना ॥ ३६ ॥

जे तो विवस्वतु म्हणजे कायी, ऐसें हें वडिलां ठाऊवें नाहीं।
तरी तुवांचि केवीं पाहीं, उपदेशिला ॥ ३७ ॥

तो तरी आइकिजे बहुतां काळांचा, आणि तूं तंव कृष्ण सांपेचा।
म्हणोनि गा इये मातुचा, विसंवादु ॥ ३८ ॥

तेवींचि देवा चरित्र तुझें, आपण कांही काय जाणिजे।
हें लटिके केवीं म्हणिजे, एकिहेळां ॥ ३९ ॥

परी हेचि मातु आघवी, मी परियेसें तैशी सांगावी।
जे तुवांचि तया रवीं केवीं, उपदेशु केला ॥ ४० ॥

     श्री भगवानुवाच: बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन।
                  तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप ॥ ५ ॥

तंव कृष्ण म्हणे पंडुसुता, तो विवस्वतु जैं होता।
तैं आम्ही नसों ऐसी चित्ता, भ्रांति जरी तुज ॥ ४१ ॥

तरी तूं गा हें नेणसी, पैं जन्में आम्हां तुम्हांसी।
बहुतें गेलीं परी तियें न स्मरसी, आपली तूं ॥ ४२ ॥

मी जेणें जेणें अवसरें, जें जें होऊनि अवतरें।
ते समस्तही स्मरें, धनुर्धरा ॥ ४३ ॥

     अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतामामिश्वरोऽपि सन्।
     प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया ॥ ६ ॥

म्हणोनि आघवें, मज मागील आठवें।
मी अजुही परि संभवे, प्रकृतिसंगे ॥ ४४ ॥

माझें अव्ययत्व तरी न नसे, परी होणें जाणें एक दिसे।
ते प्रतिबिंबे मायावशें, माझांचि ठायीं ॥ ४५ ॥

माझी स्वतंत्रता तरी न मोडे, परी कर्माधीनु ऐसा आवडे।
तेंही भ्रांतिबुद्धि तरी घडे, एर्हकवीं नाहीं ॥ ४६ ॥

कीं एकचि दिसे दुसरें, तें दर्पणाचेनि आधारें।
एर्हएवीं काय वस्तुविचारें, दुजें आहे ॥ ४७ ॥

तैसा अमूर्तचि मी किरीटी, परी प्रकृति जैं अधिष्ठीं।
तैं साकारपणे नटें नटीं, कार्यालागीं ॥ ४८ ॥

     यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
     अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ ७ ॥

ते वेळी आपुल्याचेनि कैवारें, मी साकारु होऊनि अवतरें।
मग अज्ञानाचें आंधारें, गिळूनि घालीं ॥ ४९ ॥

अधर्माचि अवधी तोडीं, दोषांचीं लिहिलीं फाडीं।
सज्जनांकरवी गुढी, सुखाची उभवीं ॥ ५० ॥

     परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्।
     धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥ ८ ॥

ते वेळी आपुल्याचेनि कैवारें, मी साकारु होऊनि अवतरें।
मग अज्ञानाचें आंधारें, गिळूनि घालीं ॥ ५१ ॥

अधर्माचि अवधी तोडीं, दोषांचीं लिहिलीं फाडीं।
सज्जनांकरवी गुढी, सुखाची उभवीं ॥ ५२ ॥

दैत्यांचीं कुळें नाशीं, साधूंचा मानू गिंवशीं।
धर्मासी नीतीशी, शेंज भरी ॥ ५३ ॥

मी अविवेकाची काजळी, फेडूनी विवेकदीप उजळीं।
तैं योगियां पाहे दिवाळी, निरंतर ॥ ५४ ॥

स्वसुखे विश्व कोंदे, धर्मचि जगीं नांदे।
भक्तां निघती दोंदें, सात्विकाचीं ॥ ५५ ॥

तैं पापाचा अचळु फिटे, पुण्याची पहाट फुटे।
जैं मूर्ति माझी प्रगटे, पंडुकुमरा ॥ ५६ ॥

ऐसेया काजालागी, अवतरें मी युगीं युगीं।
परि हेंचि वोळखे जो जगीं, तो विवेकिया ॥ ५७ ॥

     जन्म कर्म च ने दिव्यमेवं यो वेत्ति तत्वतः।
     त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन ॥ ९ ॥

माझे अजत्वें जन्मणें, अक्रियताचि कर्म करणें।
हें अविकार जो जाणे, तो परममुक्त ॥ ५८ ॥

तो चालिला संगे न चळे, देहींचा देहा नाकळे।
मग पंचत्वीं तंव मिळे, माझांचि रूपीं ॥ ५९ ॥

     वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः।
     बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः ॥ १० ॥

एर्ह वीं परापर न शोचिती, जे कामनाशून्य होती।
वाटा केवेळीं न वचती, क्रोधाचिया ॥ ६० ॥

जे सदा मियांचि आथिले, माझिया सेवा जियाले।
कां आत्मबोधे तोषले, वीतराग जे ॥ ६१ ॥

जे तपोतेजाचिया राशी, कां एकायतन ज्ञानासी।
जे पवित्रता तीर्थांसी, तीर्थरूप ॥ ६२ ॥

ते मद्भावा सहजें आले, मी तेचि ते होऊनि ठेले।
जे मज तयां उरले, पदर नाहीं ॥ ६३ ॥

सांगे पितळेची गंधिकाळिक, जे फिटली होय निःशेख।
तैं सुवर्ण काई आणिक, जोडूं जाईजे ॥ ६४ ॥

तैसे यमनियमीं कडसले, ते तपोज्ञानीं चोखळले।
मी तेचि ते जाहले, एथ संशयो कायसा ॥ ६५ ॥

     ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्।
     मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ ११ ॥

एर्ह वीं तरी पाहीं, जे जैसे माझां ठाईं।
भजती तया मीही, तैसाचि भजे ॥ ६६ ॥

देखें मनुष्यजात सकळ, हें स्वभावता भजनसीळ।
जाहलें असे केवळ, माझां ठायीं ॥ ६७ ॥

परी ज्ञानेंवीण नाशिले, जे बुद्धिभेदासि आले।
तेणेंचि या कल्पिलें, अनेकत्व ॥ ६८ ॥

म्हणऊनि अभेदीं भेदु देखती, यया अनाम्या नामें ठेविती ॥
देवी देवो म्हणती, अचर्चातें ॥ ६९ ॥

जें सर्वत्र सदा सम, तेथे विभाग अधमोत्तम।
मतिवशें संभ्रम, विवंचिती ॥ ७० ॥

     काङक्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः।
     क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा ॥ १२ ॥

मग नानाहेतुप्रकारें, यथोचितें उपचारें।
मानिलीं देवतांतरें, उपासिती ॥ ७१ ॥

तेथ जें जें अपेक्षित, तें तैसेंचि पावति समस्त।
परी ते कर्मफळ निश्चित, वोळख तूं ॥ ७२ ॥

वाचूंनि देतें घेतें आणिक, निभ्रांत नाही सम्यक।
एथ कर्मचि फळसूचक, मनुष्यलोकीं ॥ ७३ ॥

जैसें क्षेत्रीं जें पेरिजे, तेंवांचूनि आन न निपजे।
कां पाहिजे तेंचि देखिजे, दर्पणाधारें ॥ ७४ ॥

ना तरी कडेयातळवटीं, जैसा आपुलाचि बोलु किरीटी।
पडिसादु होऊनि उठी, निमित्तयोगें ॥ ७५ ॥

तैसा समस्तां यां भजनां, मी साक्षिभूतु पैं अर्जुना।
एथ प्रतिफळे भावना, आपुलाली ॥ ७६ ॥

     चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः।
     तस्य कर्तारमपि मां विध्यकर्तारमव्यम् ॥ १३ ॥

आतां याचिपरी जाण, चार्ही् आहेती हे वर्ण।
सृजिले म्यां गुण -, कर्मभागें ॥ ७७ ॥

जे प्रकृतीचेनि आधारें, गुणाचेनि व्यभिचारें।
कर्में तदनुसारें, विवंचिली ॥ ७८ ॥

एथ एकचि हे धनुष्यपाणी, परीं जाहले गा चहूं वर्णीं।
ऐसी गुणकर्मीं कडसणी, केली सहजें ॥ ७९ ॥

म्हणोनि आईकें पार्था, हे वर्णभेदसंस्था।
मी कर्ता नव्हे सर्वथा, याचिलागीं ॥ ८० ॥

     न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा।
     इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते ॥ १४ ॥

हें मजचिस्तव जाहलें, परी म्यां नाहीं केलें।
ऐसे जेणे जाणितलें, तो सुटला गा ॥ ८१ ॥

     एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वेरपि मुमुक्षुभिः।
     कुरु कर्मेव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम् ॥ १५ ॥

मागील मुमुक्षु जे होते, तिहीं ऐशियाचि जाणोनि मातें।
कर्मे केलीं समस्तें, धर्नुधरा ॥ ८२ ॥

परी तें बीजें जैसीं दग्धलीं, नुगवतीचि पेरलीं।
तैशीं कर्मेंचि परि तयां जाहली, मोक्षहेतु ॥ ८३ ॥

एथ आणिकही एक अर्जुना, हे कर्माकर्मविवंचना।
आपुलिये चाडे सज्ञाना, योग्य नोहे ॥ ८४ ॥

     किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः।
     तत् ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥ १६ ॥

मर्म म्हणिजे तें कवण, अथवा अकर्मा काय लक्षण।
ऐसें विचारितां विचक्षण, गुंफोनि ठेले ॥ ८५ ॥

जैसें का कुडें नाणें, खर्याुचेनि सारखेपणें।
डोळ्यांचेहि देखणें, संशयी घाली ॥ ८६ ॥

तैसे नैष्कर्म्यतेचेनि भ्रमें, गिंवसिजत आहाति कर्में।
जे दुजी सृष्टि मनोधर्में, करूं शकती ॥ ८७ ॥

वाचूनि मूर्खाची गोठी कायसी, एथ मोहले गा क्रांतदर्शी।
म्हणोनि आतां तेचि परियेसीं, सांगेन तुज ॥ ८८ ॥

     कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः।
     अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः ॥ १७ ॥

तरी कर्म म्हणजे स्वभावें, जेथ विश्वाकारु संभवे।
ते सम्यक आधीं जाणावें, लागे एथ ॥ ८९ ॥

मग वर्णाश्रमासि उचित, जे विशेष कर्म विहित।
तेंही वोळखावें निश्चित, उपयोगेंसीं ॥ ९० ॥

पाठीं जें निषिद्ध म्हणिपे, तेंही बुझावें स्वरूपें।
येतुलेनि येथ कांही न गुंफे, आपैसेंचि ॥ ९१ ॥

एर्हलवीं जग हें कर्माधीन, ऐसी याची व्याप्ती गहन।
परि तें असो आइकें चिन्ह, प्राप्ताचें गा ॥ ९२ ॥

     कर्मण्य कर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः।
     स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत् ॥ १८ ॥

जो सकळकर्मीं वर्ततां, देखे आपुली नैष्कर्म्यता।
कर्मसंगे निराशता, फळाचिया ॥ ९३ ॥

आणि कर्तव्यतेलागीं, जया दुसरें नाहीं जगीं।
ऐसिया नैष्कर्मता तरी चांगी, बोधला असे ॥ ९४ ॥

परि क्रियाकलापु आघवा, आचरतु दिसे बरवा।
तरी तो इहीं चिन्हीं जाणावा, ज्ञानिया गा ॥ ९५ ॥

जैसा कां जळापाशीं उभा ठाके, तो जरी आपणपें जळामाजिं देखे।
तरी तो निभ्रांत वोळखे, म्हणे मी वेगळा आहे ॥ ९६ ॥

अथवा नावे हन जो रिगे, तो थडियेचे रुख जातां देखे वेगें।
तेचि साचोकारें जों पाहों लागे, तंव रुख म्हणे अचळ ॥ ९७ ॥

तैसे सर्व कर्मीं असणें, तें फुडें मानूनि वायाणें।
मग आपणपें जो जाणे, नैष्कर्म्यु ऐसा ॥ ९८ ॥

आणि उदोअस्ताचेनि प्रमाणें, जैसे न चलतां सूर्याचें चालणें।
तैसें नैष्कर्म्यत्व जाणे, कर्मीचि असतां ॥ ९९ ॥

तो मनुष्यासारिखा तरी आवडे, परी मनुष्यत्व तया न घडे।
जैसें जळीं जळामाजीं न बुडे, भानुबिंब ॥ १०० ॥

तेणें न पाहतां विश्व देखिलें, न करितां सर्व केले।
न भोगितां भोगिलें, भोग्यजात ॥ १०१ ॥

एकेचि ठायीं बैसला, परि सर्वत्र तोचि गेला।
हें असो विश्व जाहला, आंगेंचि तो ॥ १०२ ॥

     यस्य सर्वे समारम्भाः कामसंकल्पवर्जिताः।
     ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः ॥ १९ ॥

जया पुरुषाचां ठायीं, कर्माचा तरी खेदु नाहीं।
परी फळापेक्षा कहीं, संचरेना ॥ १०३ ॥

आणि हें कर्म मी करीन, अथवा आदरिले सिद्धी नेईन।
येणें संकल्पेंही जयाचें मन, विटाळेना ॥ १०४ ॥

ज्ञानाग्निचेनि मुखें, जेणें जाळिली कर्में अशेखें।
तो ब्रह्मचि मनुष्यवेखें, वोळख तूं ॥ १०५ ॥

     त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यतृप्तो निराश्रयः।
     कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित् करोति सः ॥ २० ॥

जो शरीरीं उदासु, फळभोगीं निरासु।
नित्यता उल्हासु, होऊनि असे ॥ १०६ ॥

जो संतोषाचां गाभारां, आत्मबोधाचिया वोगरा।
पुरे न म्हणेचि धनुर्धरा, आरोगितां ॥ १०७ ॥

     निराशीर्यतचित्तात्मा त्यक्तसर्वपरिग्रहः।
     शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिशम् ॥ २१ ॥

     यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः।
     सम सिद्धावसिद्धौच कृत्वाऽपि न निबध्यते ॥ २२ ॥

कैसा अधिकाधिक आवडी, घेत महासुखाची गोडी।
सांडोनियां आशा कुरोंडी, अहंभावेसीं ॥ १०८ ॥

म्हणोनि अवसरें जें जें पावे, तेणेचि तो सुखावे।
जया आपुले आणि परावें, दोन्ही नाहीं ॥ १०९ ॥

तो दिठी जें पाहे, ते आपणचि होऊनि जाये।
आइकें तें आहे, तोचि जाहाला ॥ ११० ॥

चरणीं हन चाले, मुखें जें जें बोले।
ऐसें चेष्टाजात तेतुलें, आपणचि जो ॥ १११ ॥

हें असो विश्व पाहीं, जयासि आपणपेवांचूनि नाहीं।
आता कवण तें कर्म कायी, बाधी तयातें ॥ ११२ ॥

हा मत्सरु जेथ उपजे, तेतुले नुरेचि जया दुजें।
तो निर्मत्सरु काइ म्हणिजे, बोलवरी ॥ ११३ ॥

म्हणोनि सर्वांपरी मुक्तु, तो सकर्मुचि तो कर्मरहितु।
सगुण परि गुणातीतु, एथ भ्रांति नाहीं ॥ ११४ ॥

     गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित्चेतसः।
     यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते ॥ २३ ॥

तो देहसंगे तरी असे, परी चैतन्यासारिखा दिसे।
पाहतां परब्रह्माचेनि कसें, चोखाळु भला ॥ ११५ ॥

ऐसाही परी कौतुकें, जरी कर्मे करी यज्ञादिकें।
तरी तियें लया जाती अशेखें, तयाचांचि ठायीं ॥ ११६ ॥

अकाळींची अभ्रें जैसी , उर्मीविण आकाशीं।
हारपती आपैशीं, उदयलीं सांती ॥ ११७ ॥

तैशीं विधीविधान विहितें जरी आचरे तो समस्तें।
तरी तियें ऐक्यभावें ऐक्यातें, पावतीचि गा ॥ ११८ ॥

     ब्रह्मार्पणं ब्रह्महविर् ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम्।
     ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मस्माधिना ॥ २४ ॥

जें हें हवन मी होता, कां इये यज्ञीं हा भोक्ता।
ऐसीया बुद्धीसि नाही भंगता, म्हणऊनियां ॥ ११९ ॥

जे इष्टयज्ञ यजावे, तें हविर्मंत्रादि आघवें।
तो देखतसे अविनाशभावें, आत्मबुद्धि ॥ १२० ॥

म्हणऊनि ब्रह्म तेंचि कर्म, ऐसें बोधा आले जया सम।
तया कर्तव्य तें नैष्कर्म्य, धनुर्धरा ॥ १२१ ॥

आतां अविवेककुमारत्वा मुकले, जयां विरक्तीचे पाणिग्रहण जाहलें।
मग उपासन जिहीं आणिलें, योगाग्नीचें ॥ १२२ ॥

     दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते।
     ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति ॥ २५ ॥

जे यजनशील अहर्निशीं, जिहीं अविद्या हविली मनेंसी।
गुरुवाक्यहुताशीं, हवन केलें ॥ १२३ ॥

तिहीं योगाग्निकीं यजिजे, तो दैवयज्ञु म्हणिजे।
जेणे आत्मसुख कामिजे, पंडुकुमरा ॥ १२४ ॥

दैवास्तव देहाचे पाळण, ऐसा निश्चयो परिपूर्ण।
जो चिंतीना देहभरण, तो महायोगी जाण दैवयोगें ॥ १२५ ॥

आतां अवधारीं सांगेन आणिक, जे ब्रह्माग्नी साग्निक।
तयांते यज्ञेंचि यज्ञु देख, उपासिजे ॥ १२६ ॥

     श्रोत्रादीनींद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति।
     शब्दादीन् विषयानन्य, इंद्रियाग्निषु जुह्वति ॥ २६ ॥

एथ संयमाग्निहोत्री, जे युक्तित्रयांच्यां मंत्रीं।
यजन करिती पवित्रीं, इंद्रियद्रव्यीं ॥ १२७ ॥

एकां वैराग्यरवि विवळे, तंव संयती विहार केले।
तेथ अपावृत्त जाहले, इंद्रियानळ ॥ १२८ ॥

तिहीं विरक्तीची ज्वाळा घेतली, तंव विकारांची इंधने पळिपलीं।
तेथ आशाधूमें सांडिलीं, पांचही कुंडें ॥ १२९ ॥

मग वाक्यविधीचिया निरवडी, विषयआहुति उदंडी।
हवन केलें कुंडी, इंद्रियाग्नीचां ॥ १३० ॥

     सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे।
     आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते ॥ २७ ॥

एकीं ययापरी पार्था, दोषु क्षाळिले सर्वथा।
आणिकीं हृदयारणीं मंथा, विवेकु केला ॥ १३१ ॥

तो उपशमें निहटिला, धैर्यें वरी दाटिला।
गुरुवाक्यें काढिला, बळकटपणें ॥ १३२ ॥

ऐसे समरसें मंथन केलें, तेथ झडकरी काजा आलें।
जे उज्जीवन जहालें, ज्ञानाग्नीचें ॥ १३३ ॥

पहिला ऋद्धिसिद्धीचा संभ्रमु, तो निवर्तोनि गेला धूमु।
मग प्रगटला सूक्ष्मु, विस्फुलिंगु ॥ १३४ ॥

मन तयाचे मोकळें, तेचि पेटवण घातलें।
जें यमदमीं हळुवारलें, आइतें होतें ॥ १३५ ॥

तेणें सादुकपणें ज्वाळा समृद्धा, मग वासनांतराचिया समिधा।
स्नेहेंसी नानाविधा, जाळिलिया ॥ १३६ ॥

तेथ सोहंमंत्रें दीक्षितीं, इंद्रियकर्मांचिया आहुती।
तिये ज्ञानानळीं प्रदीप्तीं, दिधलिया ॥ १३७ ॥

पाठीं प्राणक्रिचेनि स्रुवेनिशीं, पूर्णाहुती पडली हुताशीं।
तेथ अवभृत समरसीं, सहजें जाहलें ॥ १३८ ॥

मग आत्मबोधींचे सुख, जे संयमाग्नीचें हुतशेष।
तोचि पुरोडाशु देख, घेतला तिहीं ॥ १३९ ॥

एक ऐशिया इहीं यजनीं, मुक्त ते जाहले त्रिभुवनीं।
या यज्ञक्रिया तरी आनानी, परि प्राप्य तें एक ॥ १४० ॥

     द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथापरे।
     स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः ॥ २८ ॥

एक द्रव्ययज्ञु म्हणिपती, एक तपसामग्रिया निपजती।
एक योगयागुही आहाती, जे सांगितले ॥ १४१ ॥

एकीं शब्दीं शब्दु यजिजे, तो वाग्यज्ञु म्हणिजे।
ज्ञाने ज्ञेय गमिजे, तो ज्ञानयज्ञु ॥ १४२ ॥

हें अर्जुना सकळ कुवाडें, जे अनुष्ठितां अतिसांकडे।
परी जितेंद्रियासीचि घडे, योग्यतावशें ॥ १४३ ॥

ते प्रवीण तेथ भले, आणि योगसमृद्धी आथिले।
म्हणोनि आपणपां तिहीं केले, आत्महवन ॥ १४४ ॥
 
     अपाने जुह्वति प्राणं प्राणेऽपाऽनं तथापरे।
     प्राणापानगति रुद्ध्वा प्राणायामपरायणाः ॥ २९ ॥

मग अपाग्नीचां मुखी, प्राणद्रव्यें देखी।
हवन केलें एकीं, अभ्यासयोगें ॥ १४५ ॥

एकु अपानु प्राणीं अर्पिती, एक दोहींतेंही निरुंधिती।
ते प्राणायामी म्हणिपती, पंडुकुमरा ॥ १४६ ॥

     अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति।
     सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः ॥ ३० ॥

एक वज्रयोगक्रमें, सर्वाहारसंयमें।
प्राणीं प्राणु संभ्रमें, हवन करिती ॥ १४७ ॥

ऐसे मोक्षकाम सकळ, समस्त हे यजनशीळ।
जिहीं यज्ञद्वारा मनोमळ, क्षाळण केले ॥ १४८ ॥

जया अविद्याजात जाळितां, जे उरलें निजस्वभावता।
जेथ अग्नि आणि होता, उरेचिना ॥ १४९ ॥

जेथ यजितयाचा कामु पुरे, यज्ञींचें विधान सरे।
मागुते जेथूनि वोसरे, क्रियाजात ॥ १५० ॥

विचार जेथ न रिगे, हेतु जेथ न निगे।
जें द्वैतदोषसंगें, सिंपेचिना ॥ १५१ ॥

     यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम्।
     नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरुसत्तम ॥ ३१ ॥

ऐसें अनादिसिद्ध चोखट, जें ज्ञान यज्ञावशिष्ट।
तें सेविती ब्रह्मनिष्ठ, ब्रह्माहंमंत्रे ॥ १५२ ॥

ऐसे शेषामृते धाले, कीं अमर्त्यभावा आले।
म्हणोनि ब्रह्म ते जहाले, अनायासे ॥ १५३ ॥

येरां विरक्ति माळ न घालीचि, जयां संयमाग्नीची सेवा न घडेचि।
जें योगयागु न करितीचि, जन्मले सांते ॥ १५४ ॥

जयां ऐहिक धड नाहीं, तयांचें परत्र पुससी काई।
म्हणोनि सांगों कां वांई, पंडुकुमरा ॥ १५५ ॥

     एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे।
     कर्मजान् विद्धि तान् सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्षसे ॥ ३२ ॥

ऐसे बहुतीं परीं अनेग, जे सांगितले तुज कां याग।
ते विस्तारुनि वेदेंचि चांग, म्हणितले आहाती ॥ १५६ ॥

परि तेणें विस्तारें काय करावें, हेंचि कर्मसिद्ध जाणावें।
येतुलेनि कर्मबंधु स्वभावें, पावेल ना ॥ १५७ ॥

     श्रेयान् द्रव्यमयाद् यज्ञान् ज्ञानयज्ञः परंतप।
     सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते ॥ ३३ ॥

अर्जुना वेदु जयांचे मूळ, जे क्रियाविशेषें स्थूळ।
जयां नव्हाळियेचे फळ, स्वर्गसुख ॥ १५८ ॥

ते द्रव्यादियागु कीर होती, परी ज्ञानयज्ञाची सरी न पवती।
जैशी तारातेजसंपत्ती, दिनकरापाशीं ॥ १५९ ॥

देखें परमात्मसुखनिधान, साधावया योगीजन।
जें न विसंबिती अंजन, उन्मेषनेत्रीं ॥ १६० ॥

जें धांवतया कर्माची लाणी, नैष्कर्म्यबोधाची खाणी।
जें भुकेलिया धणी, साधनाची ॥ १६१ ॥

जेथ प्रवृत्ति पांगुळ जाहली, तर्काची दिठी गेली।
जेणें इंद्रिये विसरलीं, इंद्रियसंगु ॥ १६२ ॥

मनाचे मनपण गेलें, जेथ बोलाचे बोलपण ठेलें।
जयामाजि सांपडलें, ज्ञेय दिसें ॥ १६३ ॥

जेथ वैराग्याचा पांगु फिटे, विवेकाचाही सोसु तुटे।
जेथ न पाहता सहज भेटे, आपणपें ॥ १६४ ॥

     तद् विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया।
     उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्वदर्शिनः ॥ ३४ ॥

तें ज्ञान पैं गा बरवें, जरी मनीं आथि आणावें।
तरी संतां यां भजावें, सर्वस्वेंशीं ॥ १६५ ॥

जे ज्ञानाचा कुरुठा, तेथ सेवा हा दारवंटा।
तू स्वाधीन करी सुभटा, वोळगोनी ॥ १६६ ॥

तरी तनुमनुजीवें, चरणासी लागावें।
आणि अगर्वता करावें, दास्य सकळ ॥ १६७ ॥

मग अपेक्षित जें आपुलें, तेंही सांगती पुसिलें।
जेणे अंतःकरण बोधलें, संकल्पा न ये ॥ १६८ ॥

     यज् ज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पांडव।
     येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि ॥ ३५ ॥

जयाचेनि वाक्यउजिवडें, जाहलें चित्त निधडें।
ब्रह्माचेनि पाडे, निःशंकु होय ॥ १६९ ॥

ते वेळीं आपणपेया सहितें, इये अशेषेंही भूतें।
माझां स्वरूपीं अखंडितें, देखसी तूं ॥ १७० ॥

ऐसें ज्ञानप्रकाशें पाहेल, तैं मोहांधकारू जाईल।
जैं गुरुकृपा होईल, पार्था गा ॥ १७१ ॥

     अपि चेदसी पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः।
     सर्व ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि ॥ ३६ ॥

जरी कल्मषांचा आगरु, तूं भ्रांतीचा सागरु।
व्यामोहाचा डोंगरु, होऊनि अससी ॥ १७२ ॥

तर्ही ज्ञानशक्तीचेनि पाडें, हें आघवेंची गा थोकडें।
ऐसे सामर्थ्य असे चोखडें, ज्ञानी इये ॥ १७३ ॥

देखें विश्वभ्रमाऐसा, जो अमूर्ताचा कवडसा।
तो जयाचिया प्रकाशा, पुरेचिना ॥ १७४ ॥

तया कायसें हें मनोमळ, हें बोलतांचि अति किडाळ।
नाहीं येणें पाडें हे ढिसाळ, दुजें जगीं ॥ १७५ ॥

     यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात् कुरुतेऽर्जुन।
     ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा ॥ ३७ ॥

सांगे भुवनत्रयाची काजळी, जे गगनामाजि उधवली।
तिये प्रळयींचे वाहुटळी, काय अभ्र पुरे ॥ १७६ ॥

कीं पवनाचेनि कोंपें, पाणियेंचि जो पळिपें।
तो प्रळयानळु दडपे, तृणें काष्ठे काइ ॥ १७७ ॥

     न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते।
     तत् स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति ॥ ३८ ॥

म्हणोनि असे हें न घडे, तें विचारितांचि असंगडे।
पुढती ज्ञानाचेनि पाडें, पवित्र न दिसे ॥ १७८ ॥

एथ ज्ञान हें उत्तम होये, आणिकही एक तैसें के आहे।
जैसें चैतन्य कां नोहे, दुसरे गा ॥ १७९ ॥

या महातेजाचेनि कसें, जरी चोखाळु प्रतिबिंब दिसे।
कां गिंवसिलें गिंवसे, आकाश हें ॥ १८० ॥

ना तरी पृथ्वीचेनि पाडें, कांटाळें जरी जोडे।
तरी उपमा ज्ञानी घडे, पंडुकुमरा ॥ १८१ ॥

म्हणूनी बहुतीं परीं पाहतां, पुढतपुढती निर्धारिता।
हे ज्ञानाची पवित्रता, ज्ञानींचि आथि ॥ १८२ ॥

जरी अमृताचि चवी निवडिजे, तरी अमृतासारखी म्हणिजे।
तैसें ज्ञान हें उपमिजे, ज्ञानेसींचि ॥ १८३ ॥

आतां यावरि जे बोलणे, ते वायां वेळु फेडणें।
तंव सांचचि जी हे पार्थु म्हणे, जें बोलत असां ॥ १८४ ॥

परि तेंचि ज्ञान केवीं जाणावें, ऐसें अर्जुनें जंव पुसावें
तंव तें मनोगत देवें, जाणितलें ॥ १८५ ॥

मग म्हणतसे किरीटी, आतां चित्त देयीं गोठी।
सांगेन ज्ञानाचिये भेटी, उपाय तुज ॥ १८६ ॥

     श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः।
     ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ॥ ३९ ॥

तरी आत्मसुखाचिया गोडिया, विटे जो कां सकळ विषयां।
जयां ठायीं इंद्रियां, मानु नाही ॥ १८७ ॥

जो मनाचि चाड न सांगे, जो प्रकृतीचे केलें नेघे।
जो श्रद्धेचेनि संभोगें, सुखिया जाहला ॥ १८८ ॥

तयातेंचि गिंवसित, हेंहें ज्ञान पांवे निश्चित।
जयामाजि अचुंबित, शांति असे ॥ १८९ ॥

तें हृदयीं प्रतिष्ठे, आणि शांतीचा अंकुर फुटे।
मग विस्तार बहु प्रकटे, आत्मबोधाचा ॥ १९० ॥

मग जेऊति वास पाहिजे, तेऊति शांतीचि देखिजे।
तेथ अपारा पारु नेणिजे, निर्धारितां ॥ १९१ ॥

ऐसा हा उत्तरोत्तरु, ज्ञानबीजाचा विस्तारु।
सांगता असे अपारु, परि असो आतां ॥ १९२ ॥

     अज्ञाश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति।
     मायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः ॥

ऐकें जया प्राणियाचां ठायीं, इया ज्ञानाची आवडी नाहीं।
तयाचें जियालें म्हणों काई, वरी मरण चांग ॥ १९३ ॥

शून्य जैसें गृह, कां चैतन्येंवीण देह।
तैसें जीवित तें संमोह, ज्ञानहीना ॥ १९४ ॥

अथवा ज्ञान कीर आपु नोहे, परी ते चाड एकी जरी वाहे।
तरी तेथ जिव्हाळा कांही आहे, प्राप्तीचा पैं ॥ १९५ ॥

वांचूनि ज्ञानाची गोठी कायसी, परी ते आस्थाही न धरी मानसीं।
तरी तो संशयरूप हुताशीं, पडिला जाण ॥ १९६ ॥

जे अमृतही परि नावडे, ऐसें सावियाचि आरोचकु जैं पडे।
तैं मरण आले आलें असे फुडें, जाणों ये कीं ॥ १९७ ॥

तैसा विषयसुखें रंजे, जो ज्ञानेंसींचि माजे।
तो संशये अंगीकारिजे, एथ भ्रांति नाहीं ॥ १९८ ॥

मग संशयी जरी पडला, तरी निभ्रांत जरी नासला।
ति ऐहिकपरत्रा मुकला, सुखासी गा ॥ १९९ ॥

जया काळज्वरु आंगी बाणे, तो शीतोष्णें जैशीं नेणे।
आगी आणि चांदिणें, सरिसेंचि मानी ॥ २०० ॥

तैसे साच आणि लटिकें, विरुद्ध आणि निकें।
संशयी तो नोळखे, हिताहित ॥ २०१ ॥

हा रात्रिदिवसु पाहीं जैसा, जात्यंधा ठाउवा नाहीं।
तैसे संशयीं असतां काहीं, मना न ये ॥ २०२ ॥

म्हणऊनि संशयाहुनि थोर, आणिक नाही पाप घोर।
हा विनाशाची वागुर, प्राणियासी ॥ २०३ ॥

येणें कारणे तुवा त्यजावा, आधी हाचि एकु जिणावा।
जो ज्ञानाचिया अभावा-, माजी असे ॥ २०४ ॥

जैं अज्ञानाचे गडद पडे, तैं हा बहुवस मनीं वाढे।
म्हणोनि सर्वथा मागु मोडे, विश्वासाचा ॥ २०५ ॥

हृदयी हाचि न समाये, बुद्धींते गिंवसूनि ठाये।
तेथ संशयात्मक होये, लोकत्रय ॥ २०६ ॥

     योगसंन्यस्तकर्माणि ज्ञानसंछिन्नसंशयम्।
     आत्मवंतं न कर्माणि निबध्नन्ति धनंजयः ॥ ४१ ॥

ऐसे जरी थोरावे, तरी उपायें एकें आंगवे।
जरी हाती होय बरवें, ज्ञानखड्ग ॥ २०७ ॥

तरी तेणें ज्ञानशस्त्रें तिखटें, निखळु हा निवटे।
मग निःशेष खता फिटे, मानसींचा ॥ २०८ ॥

     तस्मादज्ञानसंभूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मनः।
     छित्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत ॥ ४२ ॥

याकारणे पार्था, उठीं वेगीं वरौता।
नाशु करोनि हृदयस्था, संशयासी ॥ २०९ ॥

ऐसे सर्वज्ञानाचा बापु, जो कृष्ण ज्ञानदीपु।
तो म्हणतसे सकृपु, ऐकें राया ॥ २१० ॥

तंव या पूर्वापर बोलाचा, विचारुनि कुमरु पंडूचा।
कैसा प्रश्नु हन अवसरींचा, करिता होईल ॥ २११ ॥

ते कथेची संगति, भावाची संपत्ति।
रसाचि उन्नति, म्हणिपेल पुढां ॥ २१२ ॥

जयाचिया बरवेपणीं, कीजे आठां रसांची ओवाळणी।
सज्जनाचिये आयणी, विसांवा जगी ॥ २१३ ॥

तो शांतुचि अभिनवेल, ते परियेसा मऱ्हाठे बोल।
जे समुद्राहूनि खोल, अर्थभरित ॥ २१४ ॥

जैसें बिंब तरी बचकें एवढें, परि प्रकाशा त्रैलोक्य थोकडें।
शब्दाची व्याप्ती तेणें पाडें, अनुभवावी ॥ २१५ ॥

ना तरी कामितयाचिया इच्छा, फळे कल्पवृक्षु जैसा।
बोल व्यापकु होय तैसा, तरी अवधान द्यावे ॥२१६ ॥

हें असो काय म्हणावें, सर्वज्ञु जाणतीं स्वभावें।
तरी निकें चित्त द्यावें, हें विनंती माझी ॥ २१७ ॥

जेथ साहित्य आणि शांति, हे रेखा दिसे बोलती।
जैसी लावण्यगुणकुळवती, आणि पतिव्रता ॥२१८ ॥

आधींचि साखर आवडे, आणि तेचि जरी ओखदीं जोडे।
तरी सेवावी ना कां कोडें, नावानावा ॥ २१९ ॥

सहजे मलयानिळु मंद सुगंधु, तया अमृताचा होय स्वादु।
आणि तेथेंचि जोडे नादु, जरी दैवगत्या ॥ २२० ॥

तरी स्पर्शें सर्वांग निववी, स्वादें जिव्हेतें नाचवी।
तेवीचि कानाकरवीं, म्हणवी बापु माझा ॥ २२१ ॥

तैसे कथेचें इये ऐकणें, एक श्रवणासि होय पारणें।
मग संसारदुःख मूळवणें, विकृतीविणें ॥ २२२ ॥

जरी मंत्रेचि वैरी मरे, तरी वायांचि कां बांधावीं कटारें।
रोग जाये दुधें साखरे, तरी निंब कां पियावा ॥ २२३ ॥

तैसा मनाचा मारु न करितां, आणि इंद्रियां दुःख न देतां।
एथ मोक्षु असे आयता, श्रवणाचिमाजी ॥ २२४ ॥

म्हणोनि आथिलिया आराणुका, गीतार्थु हा निका।
ज्ञानदेवो म्हणे आइका, निवृत्तीदासु ॥ २२५ ॥

॥ चौथा अध्याय समाप्त ॥