भारत की संस्कृति के लिए... भाषा की उन्नति के लिए... साहित्य के प्रसार के लिए

ज्ञानेश्वरी / अध्याय नववा / संत ज्ञानेश्वर

Kavita Kosh से
यहाँ जाएँ: भ्रमण, खोज

तरि अवधान एकवेळें दीजे, मग सर्व सुखासि पात्र होईजे।
हें प्रतिज्ञोत्तर माझें, उघड ऐका ॥ १ ॥

परि प्रौढी न बोलें हो जी, तुम्हां सर्वज्ञांचां समाजीं।
देयावें अवधान हे माझी, विनवणी सलगीची ॥ २ ॥

कां जे लळेयांचे लळें सरती, मनोरथाचे मनौरे पुरती।
जरी माहेरें श्रीमंतें होती, तुम्हा ऐसी ॥ ३ ॥

तुमचेया दिठिवेचिया वोले, सासिन्नले प्रसन्नतेचे मळे।
ते साऊली देखोनि लोळें, श्रांतु जी मी ॥ ४ ॥

प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो, म्हणोनि आम्ही आपुलिया स्वेच्छा वोलावों लाहों।
येथ जरी सलगी करू बिहों, तरी निवो कें पां ॥ ५ ॥

नातरी बालक बोबडां बोलीं, कां वाकुडां विचुकां पाऊलीं।
तें चोज करूनि माऊली, रिझे जेवीं ॥ ६ ॥

तेवी तुम्हा संतांचा पढियावो, कैसेनि तरि आम्हांवरी हो।
या बहुवा आळुकिया जी आहों, सलगी करीत ॥ ७ ॥

वांचूनि माझिये बोलतीये योग्यते, सर्वज्ञ भवादृश श्रोते।
काय धड्यावरी सारस्वतें, पढों सिकिजे ॥ ८ ॥

अवधारां आवडे तेसणां धुंधुरु, परि महातेजीं न मिरवे काय करूं।
अमृताच्या ताटी वोगरूं, ऐसी रससोय कैंची ॥ ९ ॥

अहो हिमकरासी विंजणे, की नादापुढे आइकवणे।
लेणियासी लेणें, हें कहीं आथी ॥ १० ॥

सांगा परिमळें काय तुरंबावें, सागरें कवणे ठायीं नाहावें।
हें गगनचि आडें आघवें, ऐसा पवाडु कैंचा ॥ ११ ॥

तैसें तुमचें अवधान धाये, आणि तुम्ही म्हणा हें होये।
ऐसें वक्तृत्व कवणा आहे, जेणे रिझा तुम्ही ॥ १२ ॥

तरि विश्वप्रगटतिया गभस्ती, हातिवेनि न कीजे आरती।
कां चुळोदकें अपांपती, अर्घ्यु नेदिजे ॥ १३ ॥

प्रभु तुम्ही महेशाचिया मूर्ती, आणि मी दुबळा अर्चितसे भक्ती।
म्हणोनि बेल जऱ्ही गंगावती, तऱ्ही स्वीकाराल की ॥ १४ ॥

बाळक बापाचिये ताटीं रिगे, रिगौनि बापातेंच जेवऊं लागे।
की तो संतोषलेनि वेगें, मुखचि वोडवी ॥ १५ ॥

तैसा मी तुम्हांप्रती, चावटी करितसे बाळमती।
तरी तुम्हीं संतोषिजे ऐसी जाती, प्रेमाची या ॥ १६ ॥

आणि तेणे आपुलेपणाचेनि मोहें, तुम्ही संत घेतले असा बहुवे।
म्हणोनि केलिये सलगीचा नोहे, आभारु तुम्हां ॥ १७ ॥

अहो तान्हेयाची लागता झटे, तरी अधिकचि पान्हा फुटे।
रोषें प्रेम दुणवटे, पढियंतयाचेनि ॥ १८ ॥

म्हणऊनि मज लेंकुरवाचेनि बोलें, तुमचें कृपाळूपण निदैले।
ते चेइलें हें जी जाणवलें, यालागीं बोलिलों मी ॥ १९ ॥

एऱ्हवीं चांदणे पिकविजत आहे चेपणी, कीं वारया धापत आहे वाहणी।
हां हो गगनासी गंवसणी, घालिजे केवी ॥ २० ॥

आइकां पाणी वोथिजावे न लगे, नवनीतीं माथुला न रिगे।
तेविं लाजिलें व्याख्यान न निगे, देखोनि जयांते ॥ २१ ॥

हें असो शब्दब्रह्म जिये बाजे, शब्द मावळलेया निवांतु निजे।
तो गीतार्थु मऱ्हाटिया बोलिजे, हा पाडु काई ॥ २२ ॥

परि ऐसियाही मज धिंवसा, तो पुढतियाचि येकी आशा।
जे धिटींवा करूनि भवादृश्यां, पढियंता होआवें ॥ २३ ॥

परि आतां चंद्रापासोनि निवविते, जें अमृताहूनि जीववितें।
तेणें अवधान कीजो वाढतें, मनोरथा माझिया ॥ २४ ॥

कां जैं दिठिवा तुमचा वरुषे, तैं सकळार्थसिद्धि मती पिके।
एऱ्हवी कोंभेला उन्मेषु सुके, जरी उदास तुम्ही ॥ २५ ॥

सहजें तरी अवधारा, वक्तृत्वा अवधानाचा होय चारा।
तरी दोंदें पेलती अक्षरां, प्रमेयाचीं ॥ २६ ॥

अर्थ बोलाची वाट पाहे, तेथ अभिप्रावो अभिप्रायातें विये।
भावाचा फुलौरा होत जाये, मतिवरी ॥ २७ ॥

म्हणूनि संवादाचा सुवावो ढळे, तरी हृदयाकाश सारस्वतें वोळे।
आणि श्रोता दुश्चिता तरि वितुळे, मांडला रसु ॥ २८ ॥

अहो चंद्रकांतु द्रवता कीर होये, परि ते हातवटी चंद्री कीं आहे।
म्हणऊनि वक्ता तो वक्ताचि नव्हे, श्रोतेनि वीण ॥ २९ ॥

परी आतां आमुतें गोड करावें, ऐसे तांदुळी कायसा विनवावे।
साइखडियाने काइ प्रार्थावें, सूत्रधारातें ॥ ३० ॥

काय तो बाहुलियांचिया काजा नाचवी, कीं आपुलियें जाणिवेची कळा वाढवी।
म्हणऊनि आम्हां या ठेवाठेवी, काय काज ॥ ३१ ॥

तंव गुरु म्हणती काइ जाहलें, हें समस्तही आम्हां पावलें।
आतां सांगे जें निरोपिलें, नारायणें ॥ ३२ ॥

येथ संतोषोनि निवृत्तिदासें, जी जी म्हणऊनि उल्हासें।
अवधारां श्रीकृष्ण ऐसे, बोलते जाहले ॥ ३३ ॥

     श्री भगवानुवाचः इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे।
     ज्ञानं विज्ञानसहितं यज्ज्ञात्वा मोक्षसेऽशुभात् ॥ १ ॥

नातरि अर्जुना हें बीज, पुढती सांगिजेल तुज।
जें हें अंतःकरणींचे गुज, जीवचिये ॥ ३४ ॥

येणें मानें जीवाचें हियें फोडावें, मग तुज कां पां मज सांगावे।
ऐसें काहीं स्वभावें, कल्पिशी जरी ॥ ३५ ॥

तरी परियेसीं प्राज्ञा, तूं आस्थेचीच संज्ञा।
बोलिलिये गोष्टींची अवज्ञा, नेणसी करुं ॥ ३६ ॥

म्हणोनि गूढपण आपुलें मोडो, वरि न बोलावेंही बोलावें घडो।
परि आमुचिचे जीवींचें पडो, तुझां जीवीं ॥ ३७ ॥

अगा थानीं कीर दूध गूढ, परि थानासीचि नव्हे कीं गोड।
म्हणोनि सरो कां सेवितयाची चाड, जरी अनन्य मिळे ॥ ३८ ॥

मुडाहूनि बीज काढिलें, मग निर्वाळलिये भूमी पेरिलें।
तरी तें सांडीविखुरीं गेलें, म्हणों ये कायी ॥ ३९ ॥

यालागीं सुमनु आणि शुद्धमती, जो अनिंदकु अनन्यगती।
पैं गा गौप्यही परि तयाप्रती, चावळिजें सुखें ॥ ४० ॥

तरि प्रस्तुत आतां गुणीं इहीं, तूं वांचूनि आणिक नाहीं।
म्हणोनि गुज तरी तुझां ठायीं, लपवूं नये ॥ ४१ ॥

आतां किती नावानावा गुज, म्हणतां कानडें वाटेल तुज।
तरि ज्ञान सांगेन सहज, विज्ञानेंसीं ॥ ४२ ॥

परि तेंचि ऐसेनि निवाडें, जैसें भेसळलें खरें कुडें।
मग काढिजे फाडोवाडें, पारखूनियां ॥ ४३ ॥

कां चांचूचेनि सांडसें, खांडिजे पय पाणी राजहंसें।
तुज ज्ञान विज्ञान तैसें, वांटूनि देऊं ॥ ४४ ॥

मग वारयाचियां धारसां, पडिला कोंडा कां नुरेचि जैसा।
आणि अन्नकणाचा आपैसा, राशि जोडे ॥ ४५ ॥

तैसें जें जाणितलेयासाठीं, संसार संसाराचिये गांठी।
लाऊनि बैसवी पाटीं, मोक्षश्रियेचां ॥ ४६ ॥

     राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम्।
     प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम् ॥ २ ॥

जें जाणणेयां आघवेयांचां गांवीं , गुरुत्वाची आचार्यपदवी।
जें सकळ गुह्यांचा गोसावी, पवित्रां रावो ॥ ४७ ॥

आणि धर्माचें निजधाम, तेंविंचि उत्तमाचे उत्तम।
पैं जया येतां नाहीं काम, जन्मांतराचें ॥ ४८ ॥

मोटकें गुरुमुखें उदैजत दिसे, आणि हृदयीं स्वयंभचि असे।
प्रत्यक्ष फावो लागे तैसें, आपैसया ॥ ४९ ॥

तेविंचि पैं गा सुखाचां पाउटीं, चढतां येइजे जयाचिया भेटी।
मग भेटल्या कीर मिठी, भोगणेयाहि पडे ॥ ५० ॥

परि भोगाचिया ऐलीकडिलिये मेरे, चित्त उभें ठेलेंचि सुखा भरे।
ऐसें सुलभ आणि सोपारें, वरि परब्रह्म ॥ ५१ ॥

पैं गा आणिकही एक याचें, जें हाता आले तरी न वचे।
आणि अनुभवितां कांहीं न वेचे, वरि विटेहि ना ॥ ५२ ॥

येथ जरी तूं तार्किका, ऐसी हन घेसी शंका।
ना येवढी वस्तु हे लोकां, उरली केविं पां ॥ ५३ ॥

एकोत्तरेयाचिया वाढी, जे जळतिये आगीं घालिती उडी।
ते अनायासें स्वगोडी, सांडिती केविं ॥ ५४ ॥

तरि पवित्र आणि रम्य, तेविंचि सुखोपायेंचि गम्य।
आणि स्वसुख परि धर्म्य, वरि आपणपां जोडे ॥ ५५ ॥

ऐसा अवघाचि सुरवाडु आहे, तरी जनाहातीं केविं उरो लाहे।
हा शंकेचा ठाव कीर होये, परि न धरावी तुवां ॥ ५६ ॥

     अश्रद्दधाना: पुरुषा धर्मस्यास्य परंतप।
     अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि ॥ ३ ॥

पाहें पां दूध पवित्र आणि गोड, पासीं त्वचेचिया पदराआड।
परि तें अव्हेरुनि गोचिड, अशुद्ध काय नेघती ॥ ५७ ॥

कां कमलकंदा आणि दर्दुरीं, नांदणुक एकेचि घरीं।
परि परागु सेविजे भ्रमरीं, जवळिलां चिखलुचि उरे ॥ ५८ ॥

नातरी निदैवाचां परिवरीं, लोह्या रुतलिया आहाति सहस्त्रवरीं।
परि तेथ बैसोनि उपवासु करी, कां दरिद्रें जिये ॥ ५९ ॥

तैसा हृदयामध्यें मी रामु, असतां सर्वसुखाचा आरामु।
कीं भ्रांतासी कामु, विषयावरी ॥ ६० ॥

बहु मृगजळ देखोनि डोळां, थुंकिजे अमृताचा गिळितां गळाळा।
तोडिला परिसु बांधिला गळा, शुक्तिकालाभें ॥ ६१ ॥

तैसीं अहंममतेचिये लवडसवडी, मातें न पवतीचि बापुडीं।
म्हणोनि जन्ममरणाची दुथडी, डहुळितें ठेलीं ॥ ६२ ॥

एऱ्हवीं मी तरी कैसा, मुखाप्रती भानु कां जैसा।
कहीं नसे न दिसे ऐसा, वाणीचा नव्हें ॥ ६३ ॥

     मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना।
     मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थित: ॥ ४ ॥

माझेया विस्तारलेपणाचेनि नांवें, हे जगचि नोहे आघवें।
जैसें दूध मुरालें स्वभावें , तरि तेंचि दहीं ॥ ६४ ॥

कां बीजचि जाहलें तरु, अथवा भांगारचि अळंकारु।
तैसा मज एकाचा विस्तारु, तें हें जग ॥ ६५ ॥

हें अव्यक्तपणें थिजलें, तेंचि मग विश्वाकारें वोथिजलें।
तैसें अमूर्तमूर्ति मियां विस्तारलें, त्रैलोक्य जाणें ॥ ६६ ॥

महदादि देहांतें, इयें अशेषेंही भूतें।
परि माझां ठायीं बिंबते, जैसे जळीं फेण ॥ ६७ ॥

परि तया फेणांआंतु पाहतां, जेवीं जळ न दिसे पंडुसुता।
नातरी स्वप्नींची अनेकता, चेइलिया नोहिजे ॥ ६८ ॥

तैसीं भूतें इयें माझां ठायीं, बिंबती तयांमाजी मी नाहीं।
इया उपपत्ती तुज पाहीं, सांगितलिया मागां ॥ ६९ ॥

म्हणऊनि बोलिलिया बोलाचा आतिसो, न कीजे यालागीं हें असो, तरी मजाआंत पैसो, दिठि तुझी ॥ ७० ॥

आमचा प्रकृतीपैलीकडील भावो, जरी कल्पनेवीण लागसी पाहों।
तरी मजमाजि भूतें हेंही वावो, जे मी सर्व म्हणऊनि ॥ ७१ ॥

एऱ्हवीं संकल्पाचिये सांजवेळे, नावेक तिमिरेजती बुद्धीचे डोळे, म्हणोनि अखंडित परि झांवळें, भूतभिन्न ऐसें देखें ॥ ७२ ॥

तेचि संकल्पाची सांज जैं लोपे, तैं अखंडितचि आहे स्वरुपें।
जैसें शंका जातखेंवो लोपे, सापपण माळेचें ॥ ७३ ॥

एऱ्हवीं तरी भूमीआंतूनि स्वयंभ, काय घडेगाडगेयांचे निघती कोंभ, परि ते कुलालमतीचे गर्भ, उमटले कीं ॥ ७४ ॥

नातरी सागरींचां पाणीं, काय तंरगाचिया आहाती खाणी।
ते अवांतर करणी, वारयाची नव्हे ॥ ७५ ॥

पाहें पां कापसाचां पोटीं, काय कापडाची होती पेटी।
तो वेढितयाचिया दिठी, कापड जाहला ॥ ७६ ॥

जरी सोनें लेणें होऊनि घडे, तरी तयाचें सोनेपण न मोडे।
येर अळंकार हे वरचिलीकडे, लेतयाचेनि भावें ॥ ७७ ॥

सांगें पडिसादाची प्रत्युत्तरें, कां आरिसां जें आविष्करे।
तें आपलें कीं साचोकारें, तेथेंचि होतें ॥ ७८ ॥

तैसी इये निर्मळे माझां स्वरुपीं, जो भूतभावना आरोपी।
तयासी तयाचां संकल्पीं, भूताभासु असे ॥ ७९ ॥

तेचि कल्पिती प्रकृती पुरे, आणि भूताभासु आधींच सरे।
मग स्वरुप उरे एकसरें, निखळ माझें ॥ ८० ॥

हें असो आंगीं भरलिया भवंडी, जैशा भोंवत दिसती अरडीदरडी, तैशी आपुलिया कल्पना अखंडीं, गमती भूतें ॥ ८१ ॥

तेचि कल्पना सांडूनि पाहीं, तरि मी भूतीं भूतें माझिया ठायीं।
हें स्वप्नींही परि नाहीं, कल्पावयाजोगें ॥ ८२ ॥

आतां मी एक भूतातें धर्ता, अथवा भूतामाजि मी असता।
या संकल्पसन्निपाता, आंतुलिया बोलिया ॥ ८३ ॥

म्हणोनि परियेसीं गा प्रियोत्तमा, यापरी मी विश्वेंसीं विश्वात्मा।
जो इया लटकिया भूतग्रामा, भाव्यु सदा ॥ ८४ ॥

रश्मीचेनि आधारें जैसें, नव्हतेंचि मृगजळ आभासे।
माझां ठायीं भूतजात तैसें, आणि मातेंही भावीं ॥ ८५ ॥

मी ये परीचा भूतभावनु , परि सर्व भूतांसि अभिन्नु।
जैसी प्रभा आणि भानु, एकचि ते ॥ ८६ ॥

हा आमचा ऐश्वर्ययोगु, तुंवा देखिला कीं चांगु।
आतां सांगें कांहीं एथ लागु, भूतभेदाचा असे ॥ ८७ ॥

यालागीं मजपासूनि भूतें , आनें नव्हती हें निरुतें।
आणि भूतावेगळिया मातें, कहींच न मनीं हो, ८८ ॥

     यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्रगो महान्।
     तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय ॥ ६ ॥

पैं गगन जेवढें जैसें, पवनु गगनीं तेवढाचि असे।
सहजें हालविलिया वेगळा दिसे, एऱ्हवीं गगन तेंचि ते ॥ ८९ ॥

तैसें भूतजात माझां ठायीं, कल्पिजे तरी आभासें कांहीं।
निर्विकल्पीं तरि नाहीं, तेथ मीच मी आघवे ॥ ९० ॥

म्हणऊनि नाहीं आणि असे, हें कल्पनेचेनि सौरसें।
जे कल्पनालोपें भ्रंशें, आणि कल्पनेसवें होय।। ९१ ॥

तेंचि कल्पितें मुदल जाये, तैं असें नाहीं हें कें आहे।
म्हणऊनि पुढती तूं पाहें, हा ऐश्वर्ययोगु ॥ ९२ ॥

ऐसिया प्रतीतिबोधसागरीं, तूं आपणपेयातें कल्लोळु एक करीं।
मग जंव पाहासी चराचरीं, तंव तूचि आहासी ॥ ९३ ॥

या जाणणेयाचा चेवो, तुज आला ना म्हणती देवो।
तरी आतां द्वैतस्वप्न वावो, जालें कीं ना ॥ ९४ ॥

तरी पुढती जरी विपायें, बुद्धीसि कल्पनेची झोंप ये।
तरी अभेदबोधु जाये, जैं स्वप्नीं पडिजे ॥ ९५ ॥

म्हणोनि ये निद्रेची वाट मोडे, निखळ उद्बोधाचेंचि आपणपें घडे।
ऐसें वर्म जें आहे फुडें, तें दावो आतां ॥ ९६ ॥

तरी धनुर्धरा धैर्या, निकें अवधान देईं बा धनंजया।
पैं सर्व भूतांतें माया, करि हरि गा ॥ ९७ ॥

     सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम्।
     कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम् ॥ ७ ॥

जिये नांव गा प्रकृती, जे द्विविध सांगितली तुजप्रती।
एकी अष्टधा भेदव्यक्ती, दुजी जीवरुपा।। ९८ ॥

हा प्रकृतीविखो आघवा, तुंवा मागां परिसिलासे पांडवा।
म्हणोनि असो काइ सांगावा, पुढतपुढती ॥ ९९ ॥

तरी ये माझिये प्रकृती, महाकल्पाचां अंती।
सर्व भूतें अव्यक्तीं, ऐक्यासी येती।। १०० ॥

ग्रीष्माचां अतिरसीं, सबीजे तृणें जैसीं।
मागुती भूमीसी, सुलीनें होती ॥ १०१ ॥

कां वार्षिये ढेंढें फिटे, जेव्हां शारदीयेचा अनुघडु फुटे।
तेव्हां घनजात आटे, गगनींचें गगनीं ॥ १०२ ॥

नातरी आकाशाचिये खोंपे, वायु निवांतुचि लोपे।
कां तरंगता हारपे, जळीं जेवीं ॥ १०३ ॥

अथवा जागिनलिये वेळे, स्वप्न मनींचें मनीं मावळे।
तैसें प्राकृत प्रकृती मिळे, कल्पक्षयीं ॥ १०४ ॥

मग कल्पादीं पुढती, मीचि सृजीं ऐसी वदंती।
तरी इयेविषयीं निरुती, उपपत्ती आइक ॥ १०५ ॥

     प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः।
     भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात् ॥ ८ ॥

तरी हेचि प्रकृति किरिटी, मी स्वकीया सहजें अधिष्ठीं।
तेथ तंतुसमवायपटीं, जेविं विणावणी दिसे ॥ १०६ ॥

मग तिये विणावणीचेनि आधारें, लहानां चौकडियां पटत्व भरे।
तैसी पंचात्मके आकारें, प्रकृतिचि होये ॥ १०७ ॥

जैसें विरजणियाचेनि संगें, दूधचि आटेजों लागे।
तैशी प्रकृति आंगा रिगे, सृष्टिपणाचिया ॥ १०८ ॥

बीज जळाचि जवळीक लाहे, आणि तेंचि शाखोपशाखीं होये।
तैसें मज करणें आहे, भूतांचे हें ॥ १०९ ॥

अगा नगर हें रायें केलें, या म्हणणया साचपण कीर आलें।
परि निरुतें पाहतां काय शिणले, रायाचे हात ॥ ११० ॥

आणि मी प्रकृति अधिष्ठीं तें कैसें, जैसा स्वप्नीं जो असे।
मग तोचि प्रवेशे, जागृतावस्थे ॥ १११ ॥

तरि स्वप्नौनि जागृती येतां, काय पाय दुखती पंडुसुता ।
कीं स्वप्नामाजीं असतां, प्रवासु होय ॥ ११२ ॥

या आघवियाचा अभिप्रावो कायी, जे हें भूतसृष्टीचें कांहीं।
मज एकही करणें नाहीं, ऐसाचि अर्थु ॥ ११३ ॥

जैशी रायें अधिष्ठिली प्रजा, व्यापारे आपुलालिया काजा।
तैसा प्रकृतिसंगु माझा, येर करणें तें इयेचें ॥ ११४ ॥

पाहें पां पूर्णचंद्राचिये भेटी, समुद्र भरतें अपार दाटी।
तेथ चंद्रासि काय किरीटी, उपखा पडे ॥ ११५ ॥

जड परि जवळिका, लोह चळे तरि चळो कां।
कवणु शीणु भ्रामका, सन्निधानाचा ॥ ११६ ॥

किंबहुना यापरी, मी निजप्रकृति अंगीकारीं।
आणि भूतसृष्टी एकसरी, प्रसवोंचि लागे ॥ ११७ ॥

जो हा भूतग्रामु आघवा, असे प्रकृतिआधीन पांडवा।
जैसी बीजाचिया वेलपालवा, समर्थ भूमि ॥ ११८ ॥

नातरि बाळादिकां वयसां, गोसावी देहसंगु जैसा।
अथवा घनावळी आकाशा, वार्षियें जेवीं ॥ ११९ ॥

कां स्वप्नासि कारण निद्रा, तैसी प्रकृति हे नरेंद्रा।
या अशेषाहि भूतसमुद्रा, गोसाविणी गा ॥ १२० ॥

स्थावरा आणि जंगमा, स्थूळा अथवा सूक्ष्मा।
हे असो भूतग्रामा, प्रकृतिचि मूळ ॥ १२१ ॥

म्हणोनि भूतें हन सृजावीं, कां सृजिलीं प्रतिपाळावीं।
इयें करणीं न येती आघवीं, आमुचिया आंगा ॥ १२२ ॥

जळीं चंद्रिकेचिया पसरती वेली, ते वाढी चंद्रे नाहीं वाढविली।
तेवि मातें पावोनि ठेलीं, दुरी कर्में ॥ १२३ ॥

     न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय।
     उदासीनवदासीनमसक्तं तेषु कर्मसु ॥ ९ ॥

आणि सुटलिया सिंधुजळाचा लोटु, न शके धरुं सैंधवाचा घाटु।
तेवि सकळ कर्मा मीच शेवटु, ती काइ बांधती मातें ॥ १२४ ॥

धूम्ररजांची पिंजरी, वाजतिया वायुतें जरी होकारी।
कां सूर्यबिंबामाझारीं, आंधारे रिगे ॥ १२५ ॥

हें असो पर्वताचिये हृदयींचें, जेविं पर्जन्यधारास्तव न खोंचे।
तेविं कर्मजात प्रकृतीचें, न लगे मज ॥ १२६ ॥

एऱ्हवीं इये प्राकृतीं विकारीं, एकु मीचि आहे अवधारीं।
परि उदासीनाचिया परि, करीं ना करवी ॥ १२७ ॥

दीपु ठेविला परिवरीं, कवणातें नियमी ना निवारी।
आणि कवण कवणिये व्यापारीं, राहाटे तेंहि नेणे ॥ १२८ ॥

तो जैसा का साक्षिभूतु, गृहव्यापारप्रवृत्तिहेतु।
तैसा भूतकर्मीं अनासक्तु, मी भूतीं असें ॥ १२९ ॥

हा एकचि अभिप्रावो पुढतपुढती, काय सांगो बहुतां उपपत्तीं, येथ एकवेळां सुभद्रापती, येतुलें जाण पां ॥ १३० ॥

     मयाध्यक्षेण प्रकृति: सूयते सचराचरम्।
     हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते ॥ १० ॥

जे लोकचेष्टां समस्तां, जैसा निमित्तमात्र कां सविता।
तैसा जगत्प्रभवीं पंडुसुता, हेतु मी जाणें ॥ १३१ ॥

कां जें मियां अधिष्ठिलिया प्रकृती, होती चराचराचिया संभूती, म्हणोनि मी हेतु हें उपपत्ती, घडे यया ॥ १३२ ॥

आतां येणें उजिवडें निरुतें, न्याहाळीं पां ऐश्वर्ययोगातें।
जे माझां ठायीं भूतें, परी भूतीं मी नसें ॥ १३३ ॥

अथवा भूतें ना माझां ठायीं, आणि भूतांमाजि मी नाहीं।
या खुणा तुं कही, चुकों नको ॥ १३४ ॥

हें सर्वस्व आमुचें गूढ, परि दाविलें तुज उघड।
आतां इंद्रियां देऊनि कवाड, हृदयीं भोगीं ॥ १३५ ॥

हा दंशु जंव नये हातां, तंव माझें साचोकारेपण पार्था।
न संपडे गा सर्वथा , जेविं भुसीं कणु ॥ १३६ ॥

एऱ्हवीं अनुमानाचेनि पैसें, आवडे कीर कळलें ऐसें।
परि मृगजळाचेनि वोलांशें, काय भूमि तिमे ॥ १३७ ॥

जें जाळ जळीं पांगिलें, तेथ चंद्रबिंब दिसे आंतुडलें।
परि थडिये काढूनि झाडिलें, तेव्हां बिंब कें सांगे ॥ १३८ ॥

तैसें बोलवरि वाचाबळें, वायांचि झकविजती प्रतीतीचे डोळे।
मग साचोकारें बोधावेळे, आथि ना होईजे ॥ १३९ ॥

     अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम्।
     परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् ॥ ११ ॥

किंबहुना भवा बिहा या, आणि साचें चाड आथि जरी मियां।
तरि तुम्हीं गा उपपत्ती इया, जतन कीजे ॥ १४० ॥

एऱ्हवीं वेधली दिठी कवळें, ते चांदणियाते म्हणे पिंवळें।
तेविं माझां स्वरुपीं निर्मळे, देखाल दोष ॥ १४१ ॥

नातरी ज्वरें विटाळले मुख, ते दुधातें म्हणे कडू विख।
तेविं अमानुषा मानुष, मानाल मातें ॥ १४२ ॥

म्हणऊनि पुढती तूं धनंजया, झणें विसंबसी या अभिप्राया।
जे इया स्थूलदृष्टी वायां, जाइजेल गा ॥ १४३ ॥

पैं स्थूलदृष्टी देखती मातें, तेंचि न देखणें जाण निरुतें।
जैसें स्वप्नींचेनि अमृतें, अमरा नोहिजे ॥ १४४ ॥

एऱ्हवीं स्थूलदृष्टी मूढ, मातें जाणती कीर दृढ।
परि तें जाणणेंचि जाणणेया आड, रिगोनि ठाके ॥ १४५ ॥

जैसा नक्षत्राचिया आभासा-, साठीं घातु झाला तया हंसा।
माजीं रत्नबुद्धीचिया आशा, रिगोनियां ॥ १४६ ॥

सांगे गंगा या बुद्धी मृगजळ, ठाकोनि आलियाचें कवण फळ ।
काय सुरतरु म्हणोनि बाबुळ , सेविली करी ॥ १४७ ॥

हा निळयाचा दुसरा , या बुद्धी हातु घातला विखारा।
कां रत्ने म्हणोनि गारा, वेंची जेविं ॥ १४८ ॥

अथवा निधान हें प्रगटलें, म्हणोनि खदिरांगार खोळे भरिले।
कां साउली नेणतां घातलें, कुहां सिंहें ॥ १४९ ॥

तेविं मी म्हणोनि प्रपंचीं, जिहीं बुडी दिधली कृतनिश्चयाची।
तिहीं चंद्रासाठीं जेविं जळींची, प्रतिमा धरिली ॥ १५० ॥

तैसा कृतनिश्चय वायां गेला, जैसा कोण्ही एकु कांजी प्याला।
मग परिणाम पाहों लागला, अमृताचा ॥ १५१ ॥

तैसें स्थूलाकारीं नाशिवंते, भरंवसा बांधोनि चित्तें।
पाहती मज अविनाशातें, तरी कैंचा दिसें ॥ १५२ ॥

काइ पश्चिमसमुद्राचिया तटा, निघिजत आहे पूर्विलिया वाटा।
कां कोंडा कांडतां सुभटा, कणु आतुडे ॥ १५३ ॥

तैसें विकारलें हें स्थूळ, जाणितलेया मी जाणवतसें केवळ।
काइ फेण पितां जळ, सेविलें होय ॥ १५४ ॥

म्हणोनि मोहिलेनि मनोधर्में, हेंचि मी मानूनि संभ्रमें।
मग येथिंचीं जियें जन्मकर्में, तियें मजचि म्हणती ॥ १५५ ॥

येतुलेनि अनामा नाम, मज अक्रियासि कर्म।
विदेहासि देहधर्म, आरोपिती ॥ १५६ ॥

मज आकारशून्या आकारु, निरुपाधिका उपचारु।
मज विधिविवर्जिता व्यवहारु, आचारादिक ॥ १५७ ॥

मज वर्णहीना वर्णु, गुणातीतासि गुणु।
मज अचरणा चरणु, अपाणिया पाणी ॥ १५८ ॥

मज अमेया मान, सर्वगतासी स्थान।
जैसें सेजेमाजी वन, निदेला देखे ॥ १५९ ॥

तैसें अश्रवणा श्रोत्र, मज अचक्षूसी नेत्र।
अगोत्रा गोत्र, अरुपा रुप ॥ १६० ॥

मज अव्यक्तासि व्यक्ती, अनार्तासी आर्ती।
स्वयंतृप्ता तृप्ती, भाविती गा ॥ १६१ ॥

मज अनावरणा प्रावरण, भूषणातीतासि भूषण।
मज सकळकारणा कारण, देखती ते ॥ १६२ ॥

मज सहजातें करिती, स्वंयभातें प्रतिष्ठिती।
निरंतराते आव्हानिती, विसर्जिती गा ॥ १६३ ॥

मी सर्वदा स्वतःसिद्धु, तो कीं बाळ तरुण वृद्धु।
मज एकरुपा संबंधु, जाणती ऐसे ॥ १६४ ॥

मज अद्वैतासि दुजें, मज अकर्तायासि काजें।
मी अभोक्ता कीं भुंजें, ऐसें म्हणती ॥ १६५ ॥

मज अकुळाचें कुळ वानिती, मज नित्याचेनि निधनें शिणती।
मज सर्वांतराते कल्पिती, अरि मित्र गा ॥ १६६ ॥

मी स्वानंदाभिरामु, तया मज अनेकां सुखांचा कामु।
अवघाची मी असे समु, कीं म्हणती एकदेशी ॥ १६७ ॥

मी आत्मा एक चराचरीं, म्हणती एकाचा कैंपक्ष करीं।
आणि कोपोनि एकातें मारीं, हेंचि वाढविती ॥ १६८ ॥

किंबहुना ऐसे समस्त, जे हे मनुष्यधर्म प्राकृत।
तयाचि नांव मी ऐसें विपरीत, ज्ञान तयांचें ॥ १६९ ॥

जंव आकारु एक पुढां देखती, तंव हा देव येणें भावें भजती।
मग तोचि बिघडलिया टाकिती, नाहीं म्हणोनि ॥ १७० ॥

मातें येणें येणें प्रकारें, जाणती मनुष्य ऐसेनि आकारें।
म्हणऊनि ज्ञानचि तें आंधारें, ज्ञानासि करी ॥ १७१ ॥

     मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञाना विचेतस:।
     राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिता: ॥ १२ ॥

यालागीं जन्मलेचि ते मोघ, जैसें वार्षियेवीण मेघ।
कां मृगजळाचे तरंग, दुरुनीचि पाहावे ॥ १७२ ॥

अथवा कोल्हेरीचे असिवार, नातरीं वोडंबरीचे अळंकार।
कीं गंधर्वनगरीचे आवार, आभासती कां ॥ १७३ ॥

सांवरी वाढिन्नल्या सरळा, वरि फळ ना आंतु पोकळा।
कां स्तन जाले गळां, शेळिये जैसे ॥ १७४ ॥

तैसें मूर्खाचें तयां जियालें, आणि धिक् कर्म तयांचें निपजलें।
जैसें सांवरी फळ आलें, घेपे ना दीजे ॥ १७५ ॥

मग जें कांहीं ते पढिन्नले, तें मर्कटें नारळ तोडिले।
कां आंधळ्या हातीं पडिलें, मोती जैसें ॥ १७६ ॥

किंबहुना तयांचीं शास्त्रें, जैशी कुमारींहाती दिधलीं शस्त्रें।
कां अशौच्या मंत्रें, बीजें कथिलीं ॥ १७७ ॥

तैसें ज्ञानजात तयां, आणि जें कांहीं आचरलें गा धनंजया।
तें आघवेंचि गेलें वायां, जे चित्तहीन ॥ १७८ ॥

पैं तमोगुणाची राक्षसी, जे सद्बुद्धीतें ग्रासी।
विवेकाचा ठावोचि पुसी, निशाचरी ॥ १७९ ॥

तिये प्रकृती वरपडे जाले, म्हणऊनि चिंतेचेनि कपोलें गेले।
वरि तामसीयेचिये पडिले, मुखामाजीं ॥ १८० ॥

जेथ आशेचिये लाळे, आंतु हिंसा जीभ लोळे।
तेवींचि संतोषाचे चाकळे, अखंड चघळी ॥ १८१ ॥

जे अनर्थाचे कानवेरी, आवाळुवें चाटीत निघे बाहेरी।
जे प्रमादपर्वतींचि दरी, सदाचि मातली ॥ १८२ ॥

जेथ द्वेषाचिया दाढा, खसखसां ज्ञानाचा करिती रगडा।
जे अगस्तीगवसणी मूढां, स्थूलबुद्धी ॥ १८३ ॥

ऐसे आसुरिये प्रकृतीचां तोंडीं, जे जाले गा भूतोंडीं।
ते बुडोनि गेले कुंडीं, व्यामोहाचां ॥ १८४ ॥

एवं तमाचिये पडिले गर्ते, न पविजतीचि विचाराचेनि हातें।
हें असो ते गेले जेथें, ते शुद्धीचि नाहीं ॥ १८५ ॥

म्हणोनि असोतु इयें वायाणीं, कायशीं मूर्खाचीं बोलणीं।
वायां वाढवितां वाणी, शिणेल हन ॥ १८६ ॥

ऐसें बोलिले देवें, तेथ जी म्हणितलें पांडवें।
आइकें जेथ वाचा विसवे, ते साधुकथा ॥ १८७ ॥

     महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता:।
     भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् ॥ १३ ॥

तरी जयांचिये चोखटे मानसीं, मी होऊनि असें क्षेत्रसंन्यासी।
जयां निजेलियांतें उपासी, वैराग्य गा ॥ १८८ ॥

जयांचिया आस्थेचिया सद्भावा, आंतु धर्म करि राणिवा।
जयांचें मन ओलावा, विवेकासी ॥ १८९ ॥

जे ज्ञानगंगे नाहाले, पूर्णता जेऊनि धाले।
जे शांतीसि आले, पालव नवे ॥ १९० ॥

जे परिणामा निघाले कोंभ, जे धैर्यमंडपाचे स्तंभ।
जे आंनदसमुद्रीं कुंभ, चुबकळोनि भरिले ॥ १९१ ॥

जयां भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्यातें परौतें सर म्हणती, जयांचिये लीलेमाजीं नीति, जियाली दिसे ॥ १९२ ॥

जे आघवांचि करणीं, लेइले शांतीची लेणीं।
जयांचें चित्त गवसणी, व्यापका मज ॥ १९३ ॥

ऐसे जे महानुभाव, जे दैविये प्रकृतीचें दैव।
जे जाणोनियां सर्व, स्वरुप माझे ॥ १९४ ॥

मग वाढतेनि प्रेमें, मातें भजती जे महात्मे।
परि दुजेपण मनोधर्में, शिवतलें नाही ॥ १९५ ॥

ऐसें मीच होऊनि पांडवा, करिती माझी सेवा।
परि नवलावो तो सांगावा, असे आइक ॥ १९६ ॥

     सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रता: ॥
     नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते ॥ १४ ॥

तरी कीर्तनाचेनि नटनाचें, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे।
जे नामचि नाहीं पापाचें, ऐसें केलें ॥ १९७ ॥

यमदमा अवकळा आणिली, तीर्थें ठायावरुनि उठविली।
यमलोकीं खुंटिली, राहाटी आघवी ॥ १९८ ॥

यमु म्हणे काय यमावें, दमु म्हणे कवणातें दमावें।
तीर्थें म्हणती काय खावें, दोष ओखदासि नाहीं ॥ १९९ ॥

ऐसे माझेनि नामघोषें, नाहीं करिती विश्वाचीं दुःखें।
अवघें जगचि महासुखें, दुमदुमित भरलें ॥ २०० ॥

ते पाहांटेवीण पाहावित, अमृतेंवीण जीववित।
योगेंवीण दावित, कैवल्य डोळां ॥ २०१ ॥

परि राया रंका पाड धरुं, नेणती सानेयां थोरां कडसणी करुं।
एकसरें आंनदाचे आवारु, होत जगा ॥ २०२ ॥

कहीं एकाधेनि वैकुंठा जावें, तें तिहीं वैकुंठचि केलें आघवें।
ऐसें नामघोषगौरवें, धवळलें विश्व ॥ २०३ ॥

तेजें सूर्य तैसे सोज्वळ, परि तोहि अस्तवे हें किडाळ।
चंद्र संपूर्ण एखादे वेळ, हे सदा पुरते।। २०४ ॥

मेघ उदार परि वोसरे, म्हणऊनि उपमेसी न पुरे।
हे निःशंकपणें सपांखरे , पंचानन ॥ २०५ ॥

जयांचे वाचेपुढां भोजे, नाम नाचत असे माझें,
जें जन्मसहस्त्रीं वोळगिजे, एकवेळ मुखासि यावया ॥ २०६ ॥

तो मी वैकुंठीं नसें, एक वेळ भानुबिंबींही न दिसें।
वरी योगियांचींही मानसें, उमरडोनि जाय ॥ २०७ ॥

परि तयांपाशीं पांडवा, मी हारपला गिंवसावा।
जेथ नामघोषु बरवा, करिती ते माझे ॥ २०८ ॥

कैसे माझां गुणीं धाले, देशकाळातें विसरले।
कीर्तनसुखें झाले, आपणपांचि।। २०९ ॥

कृष्ण विष्णु हरि गोविंद, या नामाचे निखळ प्रबंध।
माजी आत्मचर्चा विशद, उदंड गाती ॥ २१० ॥

हें बहु असो यापरी, कीर्तित मातें अवधारीं।
एक विचरती चराचरीं, पांडुकुमरा ॥ २११ ॥

मग आणिक ते अर्जुना, साविया बहुवा जतना।
पंचप्राणा मना, पाढाऊ घेउनी ॥ २१२ ॥

बाहेरी यमनियमांची कांटी लाविली, आंतु वज्रासनाची पौळी पन्नासिली।
वरी प्राणायामांची मांडिलीं, वाहातीं यंत्रें ॥ २१३ ॥

तेथ उल्हाटशक्तीचेनि उल्हाटशक्तीचेनि, मनपवनाचेनि सुरवाडें।
सतरावियेचें पाणियांडे, बळियाविलें ॥ २१४ ॥

तेव्हां प्रत्याहारें ख्याति केली, विकारांची संपिली बोहली।
इंद्रियें बांधोनि आणिलीं, हृदयाआंतु ॥ २१५ ॥

तंव धारणावारु दाटिले, महाभूतांतें एकवटिलें।
मग चतुरंग सैन्य निवटिलें, संकल्पाचें ॥ २१६ ॥

तयावरी जैत रे जैत, म्हणोनि ध्यानाचें जैत रे जैत वाजत।
दिसे तन्मयाचें झळकत, एकछत्र ॥ २१७ ॥

पांटी समाधिश्रियेचा अशेखा, आत्मानुभवराज्यसुखा।
पट्टाभिषेकु देखां, समरसें जाहला ॥ २१८ ॥

ऐसें हें गहन, अर्जुना माझें भजन।
आतां ऐकें सांगेन, जे करिती एक ॥ २१९ ॥

तरी दोन्ही पालववेरी, जैसा एक तंतु अंबरीं।
तैसा मीवांचूनि चराचरीं, जाणती ना ॥ २२० ॥

आदि ब्रह्मा करुनी, शेवटीं मशक धरुनी।
माजी समस्त हें जाणोनी, स्वरुप माझें ॥ २२१ ॥

मग वाड धाकुटें न म्हणती, सजीव निर्जीव नेणती।
देखिलिये वस्तू उजू लुंटिती, मीचि म्हणोनि ॥ २२२ ॥

आपुलें उत्तमत्व नाठवे, पुढील योग्यायोग्य नेणवे।
एकसरें व्यक्तिमात्राचेनि नांवें , नमूंचि आवडे ॥ २२३ ॥

जैसें उंचीं उदक पडिलें, तें तळवटवरी ये उगेलें।
तैसें नमिजे भूतजात देखिलें, ऐसा स्वभावोचि तयांचा ॥ २२४ ॥

कां फळलिया तरुची शाखा, सहजें भूमीसी उतरे देखा।
तैसें जीवमात्रां अशेखां, खालावती ते ॥ २२५ ॥

अखंड अगर्वता होऊनि असती, तयांतें विनयो हेचि संपत्ती।
जे जयजयमंत्रें अर्पिती, माझांचि ठायीं ॥ २२६ ॥

नमितां मानापमान गळाले, म्हणोनि अवचितें ते मीचि जहाले।
ऐसे निरंतर मिसळले, उपासिती ॥ २२७ ॥

अर्जुना हे गुरुवी भक्ती, सांगितली तुजप्रती।
आतां ज्ञानयज्ञें यजिती, ते भक्त आइकें ॥ २२८ ॥

परि भजन करिती हातवटी, तूं जाणत आहासि किरीटी।
जे मागां इया गोष्टी, केलिया आम्हीं ॥ २२९ ॥

तंव आथि जी अर्जुन म्हणे, तें दैविकिया प्रसादाचें करणें।
तरि काय अमृताचें आरोगणें, पुरे म्हणवे ॥ २३० ॥

या बोला अनंतें, लागटा देखिलें तयातें।
कीं सुखावलेनि चित्तें, डोलतु असे ॥ २३१ ॥

म्हणे भलें केलें पार्था, एऱ्हवीं हा अनवसरु सर्वथा।
परि बोलवीतसे आस्था, तुझी मातें ॥ २३२ ॥

तंव अर्जुन म्हणे हें कायी, चकोरेंवीण चांदिणेंचि नाहीं।
जग निवविजे हा तयाचां ठायीं, स्वभावो कीं जी ॥ २३३ ॥

येरें चकोरें तियें आपुलिये चाडे, चांचु करिती चंद्राकडे।
तेविं आम्ही विनवुं तें थोकडे, देवो कृपासिंधु ॥ २३४ ॥

जी मेघ आपुलिये प्रौढी, जगाची आर्ति दवडी।
वांचूनि चातकाची ताहान केवढी, तो वर्षावो पाहुनी ॥ २३५ ॥

परि चुळा एकाचिया चाडे, जेविं गंगेतेंचि ठाकावें पडे।
तेंविं आर्त का बहु कां थोडें, तरि सांगावें देवा ॥ २३६ ॥

तेथें देवें म्हणितलें राहें, जो संतोषु आम्हां जाहला आहे।
तयावरी स्तुति साहे, ऐसें उरलें नाही ॥ २३७ ॥

पैं परिसतु आम्हासि निकियापरी, तेंचि वक्तृत्वा वऱ्हाडीक करी, ऐसें पुरस्करोनि श्रीहरी, आदरिलें बोलों ॥ २३८ ॥

     ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते।
     एकत्वेन पृथक्त्वेन बहुदा विश्वतोमुखम् ॥ १५ ॥

तरी ज्ञानयज्ञु तो एवंरुपु, तेथ आदिसंकल्पु हा यूपु।
महाभूतें मंडपु, भेदु तो पशु ॥ २३९ ॥

मग पांचांचे जे विशेष गुण, अथवा इंद्रियें आणि प्राण।
हेचि यज्ञोपचारभरण, अज्ञान धृत ॥ २४० ॥

तेथ मनबुद्धीचिया कुंडा-, आंतु ज्ञानाग्नि धडफुडा।
साम्य तेचि सुहाडा, वेदि जाणें ॥ २४१ ॥

सविवेकमतिपाटव, तेचि मंत्रविद्यागौरव।
शांति स्त्रुकस्त्रुव, जीव यज्वा।। २४२ ॥

तो प्रतीतीचेनि पात्रें, विवेकमहामंत्रें।
ज्ञानाग्निहोत्रें, भेदु नाशी ॥ २४३ ॥

तेथ अज्ञान सरोनि जाये, आणि यजिता यजन हें ठाये।
आत्मसमरसीं न्हाये, अवभृथीं जेव्हां ॥ २४४ ॥

तेव्हां भूतें विषय करणें , हें वेगळालें काहीं न म्हणे।
आघवें एकचि ऐसें जाणे, आत्मबुद्धी ॥ २४५ ॥

जैसा चेइला तो अर्जुना, म्हणे स्वप्नींची हें विचित्र सेना।
मीचि जाहालों होतों ना, निद्रावशें ॥ २४६ ॥

आतां सेना ते सेना नव्हे, हें मीच एक आघवें।
ऐसें एकत्वें मानवे, विश्व तया ॥ २४७ ॥

मग तो जीवु हे भाष सरे, आब्रह्म परमात्मबोधें भरे।
ऐसे भजती ज्ञानाध्वरें, एकत्वें येणें ॥ २४८ ॥

अथवा अनादि हें अनेक, जे आनासारिखें एका एक।
आणि नामरुपादिक , तेंही विषम ॥ २४९ ॥

म्हणोनि विश्व भिन्न, परि न भेदे तयांचें ज्ञान।
जैसे अवयव तरी आन आन, परि एकेचि देहींचे ॥ २५० ॥

कां शाखा सानिया थोरा, परि आहाति एकाचिये तरुवरा।
बहु रश्मि परि दिनकरा, एकाचे जेवीं ॥ २५१ ॥

तेविं नानाविधा व्यक्ती, आनानें नामें आनानी वृत्ती।
ऐसें जाणती भेदलां भूतीं, अभेदा मातें ॥ २५२ ॥

येणें वेगळालेपणें पांडवा, करिती ज्ञानयज्ञु बरवा।
जे न भेंदतीं जाणिवा, जाणते म्हणउनि ॥ २५३ ॥

ना तरी जेधवां जिये ठायीं, देखती कां जें जें कांहीं।
तें मीवांचूनि नाहीं, ऐसाचि बोधु ॥ २५४ ॥

पाहें पां बुडबुडा जेउता जाये, तेउतें जळचि एक तया आहे।
मग विरे अथवा राहे , तऱ्ही जळाचिमाजि ॥ २५५ ॥

कां पवनें परमाणु उचलले, ते पृथ्वीपणावेगळे नाहीं गेले।
आणि माघौतें जरी पडले, तरी पृथ्वीचिवरी ॥ २५६ ॥

तैसें भलतेथ भलतेणें भावें, भलतेंही न हो अथवा होआवें।
परि तें मी ऐसें आघवें, होऊनि ठेलें ॥ २५७ ॥

अगा हे जेव्हडी माझी व्याप्ति, तेव्हडीचि तयांचि प्रतीति।
ऐसे बहुधाकारीं वर्तती, बहुचि होउनि ॥ २५८ ॥

हें भानुबिंब आवडेतया, सन्मुख जैसें धनंजया।
तैसें ते विश्वा या, समोर सदा ॥ २५९ ॥

अगा तयांचिया ज्ञाना, पाठी पोट नाहीं अर्जुना।
वायु जैसा गगना, सर्वांगी असे ॥ २६० ॥

तैसा मी जेतुला आघवा, तेंचि तुक तयांचिया सद्भावा।
तरी न करितां पांडवा, भजन जहालें ॥ २६१ ॥

एऱ्हवीं तरी सकळ मीचि आहें, तरी कवणीं कें उपासिला नोहें।
एथ एकें जाणणेवीण ठाये, अप्राप्तासी ॥ २६२ ॥

परि तें असो येणें उचितें, ज्ञानयज्ञें यजितसांते।
उपासिती मातें, ते सांगितले ॥ २६३ ॥

अखंड सकळ हें सकळां मुखीं, सहज अर्पत असे मज एकीं।
कीं नेणणेयासाठीं मूर्खीं, न पविजेचि मातें ॥ २६४ ॥

     अहं क्रतुरहं यज्ञ: स्वधाहमहमौषधम्।
     मन्त्रोऽहमहमेवाज्यमहमग्निरहं हुतम् ॥ १६ ॥

तोचि जाणिवेचा उदयो जरी होये, तरी मुदल वेदु मीचि आहें।
आणि तो विधानातें जया विये, तो क्रतुही मीचि ॥ २६५ ॥

मग तया कर्मापासूनि बरवा, जो सांगोपांगु आघवा।
यज्ञु प्रगटे पांडवा, तोही मी गा ॥ २६६ ॥

स्वाहा मी स्वधा, सोमादि औषधी विविधा।
आज्य मी समिधा, मंत्रु मी हवि ॥ २६७ ॥

होता मी हवन कीजे, तेथ अग्नि तो स्वरुप माझें।
आणि हुतक वस्तू जें जें, तेही मीचि ॥ २६८ ॥

     पिताहमस्य जगतो माता धाता पितामह:।
     वेद्यं पवित्रमोंकार ऋक्साम यजुरेव च ॥ १७ ॥

पैं जयाचेनि अंगेसंगें, इये प्रकृतीस्तव अष्टांगे।
जन्म पाविजत असे जगें, तो पिता मी गा ॥ २६९ ॥

अर्धनारीनटेश्वरीं, जो पुरुष तोचि नारी।
तेविं मी चराचरीं, माताही होय ॥ २७० ॥

आणि जाहालें जग जेथ राहे, जेंणे जित वाढत आहे।
तें मीचि वाचूनि नोहे, आन निरुतें ॥ २७१ ॥

इयें प्रकृतिपुरुषें दोन्ही, उपजलीं जयाचिया अमनमनीं।
तो पितामह त्रिभुवनीं, विश्वाचा मी ॥ २७२ ॥

आणि आघवेयां जाणणेयांचिया वाटा, जया गांवा येती गा सुभटा।
जे वेदांचियां चोहटां, वेद्य जें म्हणिजे ॥ २७३ ॥

जेथ नाना मतां बुझावणी जाहाली, एकमेकां शास्त्रांची अनोळखी फिटली ।
चुकलीं ज्ञानें जेथ मिळों आलीं, जे पवित्र म्हणिजे ॥ २७४ ॥

पै ब्रह्मबीजा जाहला अंकुरु, घोषध्वनीनादाकारु।
तयांचें गा भुवन जो ॐकारु, तोही मी गा ॥ २७५ ॥

जया ॐकाराचिये कुशी, अक्षरें होती अउमकारेंसीं।
जियें उपजत वेदेंसीं, उठलीं तिन्हीं ॥ २७६ ॥

म्हणोनि ऋग्यजुःसामु, हे तिन्ही म्हणे मी आत्मारामु।
एंव मीचि कुलक्रमु, शब्दब्रह्माचा ॥ २७७ ॥

     गतिर्भर्ता प्रभु: साक्षी निवास: शरणं सुहृत्।
     प्रभव: प्रलय: स्थानं निधानं बीजमव्ययम् ॥ १८ ॥

हें चराचर आघवें, जिये प्रकृती आंत साठवे।
ते शिणली जेथ विसवे, ते परमगती मी ॥ २७८ ॥

आणि जयाचेनि प्रकृति जिये, जेणें अधिष्ठिली विश्व विये।
जो येऊनि प्रकृती इये, गुणातें भोगी ॥ २७९ ॥

तो विश्वश्रियेचा भर्ता, मीचि गा पंडुसुता।
मी गोसावी समस्ता, त्रैलोक्याचा ॥ २८० ॥

आकाशें सर्वत्र वसावें, वायूनें नावभरी उगें नसावें।
पावकें दहावें, वर्षावें जळें ॥ २८१ ॥

पर्वतीं बैसका न संडावी, समुद्रीं रेखा नोलांडावी।
पृथ्वीया भूतें वाहावीं, हे आज्ञा माझी ॥ २८२ ॥

म्या बोलविल्या वेदु बोले, म्यां चालविल्या सूर्यु चाले।
म्यां हालविल्या प्राणु हाले, जो जगातें चाळिता ॥ २८३ ॥

मियांचि नियमिलासांता, काळु ग्रासितसे भूतां।
इयें म्हणियागतें पंडुसुता, सकळें जयाचीं ॥ २८४ ॥

ऐसा जो समर्थु, तो मी जगाचा नाथु।
आणि गगनाऐसा साक्षिभूतु, तोहि मीचि ॥ २८५ ॥

इहीं नामरुपीं आघवा, जो भरला असे पांडवा।
आणि नामरुपांहि वोल्हावा, आपणचि जो ॥ २८६ ॥

जैसे जळाचे कल्लोळ, आणि कल्लोळ आथी जळ।
ऐसेनि वसवितसे सकळ, तो निवासु मी ॥ २८७ ॥

जो मज होय अनन्य शरण, त्याचें निवारीं मी जन्म मरण।
यालागीं शरणागता शरण्य, मीचि एकु ॥ २८८ ॥

मीचि एक अनेकपणें, वेगळालेनि प्रकृतीगुणें।
जीत जगाचेनि प्राणें, वर्तत असे ॥ २८९ ॥

जैसा समुद्र थिल्लर न म्हणतां, भलतेथ बिंबे सविता।
तैसा ब्रह्मादि सर्वां भूता, सुहृद तो मी ॥ २९० ॥

मीचि गा पांडवा, या त्रिभुवनासी वोलावा।
सृष्टिक्षयप्रभावा, मूळ तें मी ॥ २९१ ॥

बीज शाखांतें प्रसवे, मग तें रुखपण बीजीं सामावे।
तैसे संकल्पें होय आघवें, पाठीं संकल्पीं मिळे ॥ २९२ ॥

ऐसें जगाचें बीज जो संकल्पु, अव्यक्त वासनारुपु।
तया कल्पांतीं जेथ निक्षेपु, होय तें मी ॥ २९३ ॥

इयें नामरुपें लोटती, वर्णव्यक्ती आटती।
जातींचे भेद फिटती, जैं आकाश नाहीं ॥ २९४ ॥

तैं संकल्पु वासनासंस्कार, माघौतें रचावया आकार।
जेथ राहोनि असती अमर, तें निधान मी ॥ २९५ ॥

     तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च।
     अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन ॥ १९ ॥

मी सूर्याचेनि वेषें, तपें तैं हें शोषे।
पाठीं इंद्र होऊनि वर्षें, तैं पुढती भरे ॥ २९६ ॥

अग्नि काष्ठें खाये, तें काष्ठचि अग्नि होये।
तेवि मरतें मारितें पाहें, स्वरुप माझें ॥ २९७ ॥

यालागीं मृत्यूचां भागीं जें जें, तेंही पैं रुप माझें।
आणि न मरतें तंव सहजें, अविनाशु मी ॥ २९८ ॥

आता बहु बोलोनि सांगावें, तें एकिहेळां घे पां आघवें।
तरी सतासतही जाणावें, मीचि पैं गा ॥ २९९ ॥

म्हणोनि अर्जुना मी नसें, ऐसा कवणु ठाव असे।
परि प्राणियांचें दैव कैसे, जे न देखती मातें ॥ ३०० ॥

तरंग पाणियेंवीण सुकती, रश्मि वातीवीण न देखती।
तैसे मीचि ते मी नव्हती, विस्मो देखे ॥ ३०१ ॥

हें आतबाहेर मियां कोंदलें, जग निखिल माझेंचि वोतिलें।
कीं कैसें कर्म तयां आलें , जे मींचि नाही म्हणती ॥ ३०२ ॥

परि अमृतकुहां पडिजे, कां आपणयातें कडिये काढिजे।
ऐसें आथी काय कीजे, अप्राप्तासि ॥ ३०३ ॥

ग्रासा एका अन्नासाठीं, अंधु धांवताहे किरीटी।
आडळला चिंतामणि पायें लोटी, आंधळेपणे ॥ ३०४ ॥

तैसें ज्ञान जैं सांडुनि जाये, तैं ऐसी हे दशा आहे।
म्हणोनि कीजे तें केलें नोहे, ज्ञानेंवीण ॥ ३०५ ॥

आंधळेया गरुडाचे पांख आहाती, ते कवणा उपेगा जाती।
तैसें सत्कर्माचे उपखे ठाती, ज्ञानेंवीण ॥ ३०६ ॥

     त्रैविद्या मां सोमपा: पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते।
     ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकमश्नन्ति दिव्यान्दिवि देवभोगान् ॥ २० ॥

देख पां गा किरीटी, आश्रमधर्माचिया राहाटी।
विधिमार्गा कसवटी, जे आपणचि होती ॥ ३०७ ॥

यजन करितां कौतुकें, तिहीं वेदांचा माथा तुके।
क्रिया फळेंसि उभी ठाके, पुढां जयां ॥ ३०८ ॥

ऐसे दीक्षित जे सोमप, जे आपणचि यज्ञाचें स्वरुप।
तींहीं तया पुण्याचेनि नांवें पाप, जोडिलें देखें ॥ ३०९ ॥

जे श्रुतित्रयांते जाणोनि, शतवरी यज्ञ करुनि।
यजिलिया मातें चुकोनि, स्वर्गु वरिती ॥ ३१० ॥

जैसें कल्पतरुतळवटीं, बैसोनि झोळिये पाडी गांठी।
मग निदैव निघे किरीटी, दैन्यचि करुं ॥ ३११ ॥

तैसे शतक्रतूं यजिलें मातें, कीं ईप्सिताति स्वर्गसुखांतें।
आतां पुण्य कीं हें निरुतें, पाप नोहे ॥ ३१२ ॥

म्हणोनि मजवीण पाविजे स्वर्गु, तो अज्ञानाचा पुण्यमार्गु।
ज्ञानिये तयातें उपसर्गु, हानि म्हणती ॥ ३१३ ॥

एऱ्हवीं तरी नरकींचें दुःख, पावोनि स्वर्गा नाम कीं सुख, वांचूनि नित्यानंद गा निर्दोष, तें स्वरुप माझें ॥ ३१४ ॥

मज येतां पैं सुभटा, या द्विविधा गा अव्हांटा।
स्वर्गु नरकु या वाटा, चोरांचिया ॥ ३१५ ॥

स्वर्गा पुण्यात्मकें पापें येईजे, पापात्मकें पापें नरका जाइजे।
मग मातें जेणें पाविजे, तें शुद्ध पुण्य ॥ ३१६ ॥

आणि मजचिमाजीं असतां, जेणें मी दूरी होय पांडुसुता।
तें पुण्य ऐसें म्हणतां, जीभ न तुटे काई ॥ ३१७ ॥

परि हें असो आतां प्रस्तुत, ऐकें यापरि ते दीक्षित।
यजुनि मातें याचित, स्वर्गभोगु ॥ ३१८ ॥

मग मी न पविजे ऐसें, जें पापरुप पुण्य असे।
तेणें लाधलेनि सौरसें, स्वर्गा येती ॥ ३१९ ॥

जेथ अमरत्व हेंचि सिंहासन, ऐरावतासारिखें वाहन।
राजधानीभुवन, अमरावती ॥ ३२० ॥

जेथ महासिद्धींची भांडारें, अमृताचीं कोठारें।
जियें गांवीं खिल्लारें, कामधेनूंचीं ॥ ३२१ ॥

जेथ वोळगे देव पाइका, सैघं चिंतामणीचिया भूमिका, विनोदवनवाटिका, सुरतरुंचिया ॥ ३२२ ॥

गंधर्वगान गाणीं, जेथ रंभेऐशिया नाचणी।
उर्वशी मुख्य विलासिनी, अंतौरिया ॥ ३२३ ॥

मदन वोळगे शेजारे, जेथ चंद्र शिंपे सांबरें।
पवना ऐसें म्हणियारें, धांवणें जेथ ॥ ३२४ ॥

पैं बृहस्पति आपण, ऐसे स्वस्तीश्रियेचे ब्राह्मण।
ताटियेचे सुरगण, विकार जेथें ॥ ३२५ ॥

लोकपाळरांगेचे, राउत जिये पदीचे।
उचैःश्रवा खांचे, खोलणिये।। ३२६ ॥

हें बहु असो जे ऐसे, भोग इंद्रसुखासरिसे।
ते भोगिजती जंव असे, पुण्यलेशु ॥ ३२७ ॥

     ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति।
     एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते ॥ २१ ॥

मग तया पुण्याची पाउटी सरे, सवेंचि इंद्रपणाची उटी उतरे।
आणि येऊं लागती माघारें, मृत्युलोका ॥ ३२८ ॥

जैसा वेश्याभोगीं कवडा वेंचे, मग दारही चेपूं न ये तियेचें।
तैसें लाजिरवाणें दीक्षितांचें, काय सांगो ॥ ३२९ ॥

एवं थितिया मातें चुकले, जीहीं पुण्यें स्वर्ग कामिले।
तयां अमरपण तें वावों जालें, आतां मृत्युलोकु ॥ ३३० ॥

मातेचिया उदरकुहरीं, पचूनि विष्ठेचां दाथरीं।
उकडूनि नवमासवरी, जन्मजन्मोनि मरती ॥ ३३१ ॥

अगा स्वप्नीं निधान फावे, परि चेइलिया हारपे आघवें।
तैसें स्वर्गसुख जाणावें, वेदज्ञाचें ॥ ३३२ ॥

अर्जुना वेदु जऱ्ही जाहला, तरी मातें नेणतां वायां गेला।
कणु सांडूनि उपणिला, कोंडा जैसा ॥ ३३३ ॥

म्हणऊनि मज एकेंविण, हे त्रयीधर्म अकारण।
आतां मातें जाणोनि कांहीं नेण, तूं सुखिया होसी ॥ ३३४ ॥

     अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते।
     तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥ २२ ॥

पैं सर्वभावेंसी उखितें, जे वोपिले मज चित्तें।
जैसा गर्भगोळु उद्यमातें , कोणाही नेणे ॥ ३३५ ॥

तैसा मीवाचूनि कांही, आणिक गोमटेंचि नाहीं।
मजचि नाम पाहीं, जिणेया ठेविलें ॥ ३३६ ॥

ऐसे अनन्यगतिकें चित्तें, चिंतितसांते मातें।
जे उपासिती तयांतें, मीचि सेवीं ॥ ३३७ ॥

ते एकवटूनि जिये क्षणीं, अनुसरले गा माझिये वाहणी।
तेव्हांचि तयांची चिंतवणी, मजचि पडली ॥ ३३८ ॥

मग तीहीं जें जें करावे, तें मजचि पडिलें आघवें।
जैशी अजातपक्षांचेनि जीवें, पक्षिणी जिये ॥ ३३९ ॥

आपुली तहानभूक नेणे, तान्हया निकें तें माउलीसीचि करणें।
तैसे अनुसरले जे मज प्राणें, तयांचेन काइसेनिहि न लजें मी ॥ ३४० ॥

तया माझिया सायुज्याची चाड, तरि तेंचि पुरवीं कोड।
कां सेवा म्हणती तरी आड, प्रेम सुयें ॥ ३४१ ॥

ऐसा मनीं जो जो भावो, तो तो पुढां पुढां लागें तयां देवों।
आणि दिधलियाचा निर्वाहो, तोहि मीचि करीं ॥ ३४२ ॥

हा योगक्षेमु आघवा, तयांचा मजचि पडिला पांडवा।
जयांचियां सर्वभावां, आश्रयो मी ॥ ३४३ ॥

     येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विता:।
     तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम् ॥ २३ ॥

आतां आणिकही संप्रदायें, परि मातें नेणती समवायें।
जे अग्नि-इंद्र-सूर्य-सोमाये, म्हणऊनि यजिती ॥ ३४४ ॥

तेंही कीर मातेंचि होये, कां जे हें आघवें मीचि आहें।
परि ते भजती उजरी नव्हे, विषम पडे ॥ ३४५ ॥

पाहे पां शाखा पल्लव वृक्षाचे, हे काय नव्हती एकाचि बीजाचे।
परि पाणी घेणें मुळाचें, तें मुळींचि घापे ॥ ३४६ ॥

कां दहाहीं इंद्रियें आहाती, इयें जरी एकेचि देहींचीं होती।
आणि इहीं सेविले विषयो जाती, एकाचि ठाया ॥ ३४७ ॥

तरि करोनि रससोय बरवी, कानीं केविं भरावी।
फुलें आणोनि बांधावीं, डोळां केविं ॥ ३४८ ॥

तो रसु तो मुखेंचि सेवावा, परिमळु तो घ्राणेंचि घ्यावा।
तैसा मी तो यजावा, मीचि म्हणोनि ॥ ३४९ ॥

येर मातें नेणोनि भजन, तें वायांचि गा आनेंआन।
म्हणोनि कर्माचे डोळे ज्ञान, तें निर्दोष होआवें ॥ ३५० ॥

एऱ्हवीं पाहें पां पंडुसुता, या यज्ञोपहारां समस्तां।
मीवांचूनि भोक्ता, कवणु आहे ॥ ३५१ ॥

मी सकळां यज्ञांचा आदि, आणि यजना या मीचि अवधि।
कीं मातें चुकोनि दुर्बुद्धि, देवां भजले ॥ ३५२ ॥

गंगेचे उदक गंगे जैसें, अर्पिंजे देवपित्तरोद्देशें।
माझे मज देती तैसें, परि आनानीं भावीं ॥ ३५३ ॥

म्हणऊनि ते पार्था, मातें न पवतीचि सर्वथा।
मग मनीं वाहिली जे आस्था, तेथ आले ॥ ३५४ ॥

     यान्ति देवव्रता देवान्पितॄन्यान्ति पितृव्रता:।
     भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम् ॥ २५ ॥

मनें वाचा करणीं, जयांचीं भजनें देवांचिया वाहणी।
ते शरीर जातियेक्षणीं, देवचि जाले ॥ ३५५ ॥

अथवा पितरांचीं व्रतें, वाहती जयांचीं चित्तें।
जीवित सरलिया तयांतें, पितृत्व वरी ॥ ३५६ ॥

कां क्षुद्रदेवतादि भूतें, तियेंचि जयांचीं परमदैवतें।
जींहीं अभिचारिकीं तयांतें, उपासिलें ॥ ३५७ ॥

तयां देहांची जवनिक फिटली, आणि भूतत्वाची प्राप्ती जाहली।
एवं संकल्पवशें फळलीं, कर्में तयां ॥ ३५८ ॥

मग मीचि डोळां देखिला, जींहीं कानीं मीचि ऐकिला।
मनीं मी भाविला, वानिला वाचा ॥ ३५९ ॥

सर्वांगीं सर्वाठायीं, मीचि नमस्कारिला जिहीं।
दानपुण्यादिकें जें कांहीं, तें माझियाचि मोहरा ॥ ३६० ॥

जिहीं मातेंचि अध्ययन केलें, जे आंतबाहेर मियांचि धाले।
जयांचे जीवित्व जोडलें , मजचिलागीं ॥ ३६१ ॥

जे अहंकारु वाहत आंगीं, आम्ही हरीचे भूषावयालागीं।
जे लोभिये एकचि जगीं, माझेनि लोभें ॥ ३६२ ॥

जे माझेनि कामें सकाम, जे माझेनि प्रेमें सप्रेम।
जे माझिया भुली सभ्रम, नेणती लोक ॥ ३६३ ॥

जयांचीं जाणती मज शास्त्रें, मी जोडें जयाचेनि मंत्रें।
ऐसे जे चेष्टामात्रें, भजले मज ॥ ३६४ ॥

ते मरणाऐलीचकडे, मज मिळोनि गेले फुडे।
मग मरणीं आणिकीकडे, जातील केविं ॥ ३६५ ॥

म्हणोनि मद्याजी जे जाहाले, ते माझिया सायुज्या आले।
जिहीं उपचारमिषें दिधलें, आपणपें मज ॥ ३६६ ॥

पैं अर्जुना माझां ठायीं , आपणपेवीण सौरसु नाहीं।
मी उपचारीं कवणाही, नाकळें गा ॥ ३६७ ॥

एथ जाणिव करी तोचि नेणे, आथिलेंपण मिरवी तेंचि उणें।
आम्ही जाहलों ऐसें जो म्हणे, तो कांहींचि नव्हे ॥ ३६८ ॥

अथवा यज्ञदानादि किरीटी, कां तपें हन जे हुटहुटी।
ते तृणा एकासाठीं, न सरे एथ ॥ ३६९ ॥

पाहें पां जाणिवेचेनि बळें, कोण्ही वेदापासूनि असे आगळें।
कीं शेषाहूनि तोंडागळें, बोलकें आथी ॥ ३७० ॥

तोही आंथरुणातळवटी दडे, येरु नेति नेति म्हणोनि बहुडे।
एथ सनकादिक वेडे, पिसे जाहले ॥ ३७१ ॥

करितां तापसांची कडसणी, कवणु जवळां ठेविजैल शूळपाणी।
तोहि अभिमानु सांडूनि पायवणी, माथां वाहे ॥ ३७२ ॥

नातरी आथिलेपणें सरिसी, कवणी आहे लक्ष्मियेऐसी, श्रियेसारिखिया दासी, घरीं जियेतें ॥ ३७३ ॥

तियां खेळतां करिती घरकुली, तयां नामें अमरपुरें जरि ठेविलीं, तरि न होती काय बाहुलीं, इंद्रादिक तयांचीं ॥ ३७४ ॥

तयां नावडोनि जेव्हां मोडती, तेव्हां महेंद्राचे रंक होती।
तियां झाडां येउते जयां पाहती, ते कल्पवृक्ष ॥ ३७५ ॥

ऐसें जियेचियां जवळिकां, सामर्थ्य घरींचियां पाइकां।
ते लक्ष्मी मुख्यनायका, न मनेचि एथ ॥ ३७६ ॥

मग सर्वस्वें करुनि सेवा, अभिमान सांडूनि पांडवा,
ते पाय धुवावयाचिया दैवा, पात्र जाहाली ॥ ३७७ ॥

म्हणोनि थोरपण पऱ्हांचि सांडिजे, व्युत्पत्ति आघवी विसरिजे।
जैं जगा धाकुटें होइजे , तैं जवळीक माझी ॥ ३७८ ॥

अगा सहस्त्रकिरणाचिये दिठी, पुढा चंद्रुही लोपे किरीटी।
तेथ खद्योत का हुटहुटी, आपुलेनि तेजें ॥ ३७९ ॥

तैसें लक्ष्मियेचें थोरपण न सरे, जेथ शंभूचेंही तप न पुरे।
तेथ येर प्राकृत हेंदरें, केविं जाणों लाहे ॥ ३८० ॥

यालागीं शरीरसांडोवा कीजे, सकळगुणांचें लोण उतरिजे, संपत्तिमदु सांडिजे, कुरवंडी करुनी ॥ ३८१ ॥

     पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति।
     तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः ॥ २६ ॥

मग निस्सीमभावउल्हासें, मज अर्पावयाचेनि मिसें।
फळ आवडे तैसें, भलतयाचें हो ॥ ३८२ ॥

भक्तु माझियाकडे दावी, आणि मी दोन्ही हात वोडवीं।
मग देठुं न फेडितां सेवीं, आदरेंशी ॥ ३८३ ॥

पैं गा भक्तीचेनि नांवें , फूल एक मज द्यावें।
तें लेखें तरि म्यां तुरंबावें, परि मुखींचि घालीं ॥ ३८४ ॥

हें असो कायसीं फुलें, पानचि एक आवडे तें जाहलें।
तें साजुकही न हो सुकलें, भलतैसें ॥ ३८५ ॥

परि सर्वभावें भरलें देखें, आणि भुकेला अमृतें तोखे।
तैसें पत्रचि परि तेणें सुखें , आरोगूं लागें ॥ ३८६ ॥

अथवा ऐसेंही एक घडे, जे पालाही परि न जोडे।
तरि उदकाचें तंव सांकडें, नव्हेल कीं ॥ ३८७ ॥

तें भलतेथ निमोलें, न जोडितां आहे जोडलें।
तेंचि सर्वस्व करुनि अर्पिलें, जेणें मज ॥ ३८८ ॥

तेणें वैकुठापासोनि विशाळें, मजलागीं केलीं राऊळें।
कौस्तुभाहोनि निर्मळें, लेणीं दिधलीं ॥ ३८९ ॥

दूधाचीं शेजारें, क्षीराब्धीऐसीं मनोहरे।
मजलागीं अपारें, सृजिलीं तेणें ॥ ३९० ॥

कर्पूर चंदन अगरु, ऐसेया सुगंधाचा महामेरु।
मज हातीं लाविला दिनकरु, दीपमाळे ॥ ३९१ ॥

गरुडासारिखीं वाहनें, मज सुरतंरुचीं उद्यानें।
कामधेनूंचीं गोधनें, अर्पिलीं तेणें ॥ ३९२ ॥

मज अमृताहूनि सुरसें, बोनीं वोगरिलीं बहुवसें।
ऐसा भक्तांचेनि उदकलेशें, परितोषें गा ॥ ३९३ ॥

हें सांगावें काय किरीटी, तुम्हींचि देखिलें आपुलिया दिठी।
मी सुदामयाचिया सोडीं गाठीं, पव्हयालागीं ॥ ३९४ ॥

पैं भक्ति एकी मी जाणें, तेथ सानें थोर न म्हणें।
आम्ही भावाचे पाहुणे, भलतेया ॥ ३९५ ॥

येर पत्र पुष्प फळ, तें भजावया मिस केवळ।
वांचूनि आमुचा लाग निष्फळ , भक्तितत्व ॥ ३९६ ॥

म्हणोनि अर्जुना अवधारीं, तूं बुद्धि एकी सोपारी करीं।
तरी सहजें आपुलिया मनोमंदिरीं, न विसंबें मातें ॥ ३९७ ॥

     यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्।
     यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् ॥ २७ ॥

जे जे कांहीं व्यापार करिसी, कां भोग हन भोगिसी।
अथवा यज्ञीं यजसी, नानाविधीं ॥ ३९८ ॥

नातरी पात्रविशेषें दानें, कां सेवकां देसी जीवनें।
तपादि साधनें, व्रतें करिसी ॥ ३९९ ॥

तें क्रियाजात आघवें, जें जैसें निपजेल स्वभावें।
तें भावना करोनि करावें, माझिया मोहरा ॥ ४०० ॥

परि सर्वथा आपुलां जीवीं, केलियाची शंका कांहींचि नुरवीं।
ऐसीं धुवोनि कर्मे द्यावीं, माझियां हातीं ॥ ४०१ ॥

     शुभाशुभफलैरेवं मोक्ष्यसे कर्मबन्धनै:।
     संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि ॥ २८ ॥

मग अग्निकुंडी बीजें घातलीं, तियें अंकुरदशे जेविं मुकलीं।
तेवि न फळतीचि मज अर्पिलीं, शुभाशुभें ॥ ४०२ ॥

अगा कर्मे जैं उरावें, तैं तिहीं सुखदुःखीं फळावें।
आणि तयातें भोगावया यावें, देहा एका ॥ ४०३ ॥

तें उगाणिलें मज कर्म, तेव्हांचि पुसिलें मरण जन्म।
जन्मासवें श्रम, वरचिलही गेले ॥ ४०४ ॥

म्हणऊनि अर्जुना यापरि, पाहेचा वेळु नव्हेल भारी,
हे संन्यासयुक्ति सोपारी, दिधली तुज ॥ ४०५ ॥

या देहाचिया बांदोडी न पडिजे, सुखदुःखाचिया सागरीं न बुडिजे, सुखें सुखरुपा घडिजे, माझियाचि अंगा ॥ ४०६ ॥

     समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रिय:।
     ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम् ॥ २९ ॥

तो मी पुससी कैसा, तरि जो सर्वभूतीं सदा सरिसा।
जेथ आपपरु ऐसा, भागु नाहीं ॥ ४०७ ॥

जे ऐसिया मातें जाणोनि, अहंकाराचा कुरुठा मोडोनि।
जे जीवें कर्मे करुनि, भजती मातें ॥ ४०८ ॥

ते वर्तत दिसती देहीं, परि ते देहीं ना माझां ठायीं।
आणि मी तयांचा हृदयीं, समग्र असें ॥ ४०९ ॥

सविस्तर वटत्व जैसें, बीजकणिकेमाजीं असे।
आणि बीजकणु वसे, वटीं जेवीं ॥ ४१० ॥

तेवीं आम्हां तयां परस्परें, बाहेरी नामाचींचि अंतरें।
वांचुनि आंतुवट वस्तुविचारें, मी तेचि ते ॥ ४११ ॥

आतां जायांचें लेणें, जैसें आंगावरी आहाचवाणें।
तैसें देह धरणें, उदास तयांचें ॥ ४१२ ॥

परिमळु निघालिया पवनापाठीं, मागें वोस फूल राहे देठीं।
तैसें आयुष्याचिये मुठी, केवळ देह ॥ ४१३ ॥

येर अवष्टंभु जो आघवा, तो आरुढोनि मद्भावा।
मजचि आंतु पांडवा, पैठा जाहला ॥ ४१४ ॥

     अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक्।
    साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः ॥ ३० ॥

ऐसें भजतेनि प्रेमभावें, जयां शरीरही पाठीं न पवे।
तेणें भलतया व्हावें, जातीचिया ॥ ४१५ ॥

आणि आचरण पाहातां सुभटा, तो दुष्कृताचा सेल वांटा।
परि जीवित वेचिलें चोहटां, भक्तीचिया कीं ॥ ४१६ ॥

अगा अंतींचिया मती, साचपण पुढिले गती।
म्हणोनि जीवित जेणें भक्ती, दिधलें शेखीं ॥ ४१७ ॥

तो आधीं जरी अनाचारी, तरी सर्वोत्तमुचि अवधारीं।
जैसा बुडाला महापूरीं, न मरतु निघाला ॥ ४१८ ॥

तयाचें जीवित ऐलथडिये आलें, म्हणोनि बुडालेपण जेवीं वायां गेलें,
तेवीं नुरेचि पाप केलें, शेवटलिये भक्ती ॥ ४१९ ॥

यालागीं दुष्कृती जऱ्ही जाहला, तरि अनुतापतीर्थीं न्हाला।
न्हाऊनि मजआंतु आला, सर्वभावें ॥ ४२० ॥

तरि आतां पवित्र तयाचेंचि कुळ, अभिजात्य तेंचि निर्मळ।
जन्मलेया फळ, तयासीच जोडलें ॥ ४२१ ॥

तो सकळही पढिन्नला, तपें तोचि तपिन्नला।
अष्टांग अभ्यासिला, योगु तेणें ॥ ४२२ ॥

हें असो बहुत पार्था, तो उतरला कर्मे सर्वथा।
जयाची अखंड गा आस्था, मजचिलागीं ॥ ४२३ ॥

अवघिया मनोबुद्धीचिया राहटी, भरोनि एकनिष्ठेचिया पेटी।
जेणें मजमाजीं किरीटी, निक्षेपिली ॥ ४२४ ॥

     क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति।
     कौन्तेय प्रति जानीहि न मे भक्त: प्रणश्यति ॥ ३१ ॥

तो आतां अवसरें मजसारिखा होइल, ऐसाही भाव तुज जाइल।
हां गा अमृताआंत राहील, तया मरण कैचें ॥ ४२५ ॥

पै सूर्य जो वेळु नुदैजे, तया वेळा कीं रात्र म्हणिजे।
तेवीं माझिये भक्तीविण जें कीजे, तें महापाप नोहे ॥ ४२६ ॥

म्हणोनि तयाचिया चित्ता, माझी जवळीक पांडुसुता।
तेव्हांचि तो तत्वता, स्वरुप माझें ॥ ४२७ ॥

जैसा दीपें दीपु लाविजे, तेथ आदील कोण हें नोळखिजे।
तैसा सर्वस्वें जो मज भजे, तो मी होऊनि ठाके ॥ ४२८ ॥

मग माझी नित्य शांती, तया दशा तेचि कांती।
किंबहुना जिती, माझेनि जीवें, ४२९ ॥

एथ पार्था पुढतपुढती, तेंचि तें सांगो किती।
जरी मियां चाड तरी भक्ती, न विसंबिजे गा ॥ ४३० ॥

अगा कुळाचिया चोखटपणा नलगा, अभिजात्य झणीं श्लाघा, व्युत्पत्तीचा वाउगा, सोसु कां वहावा ॥ ४३१ ॥

कां रुपे वयसा माजा, आथिलेपणें कां गाजा।
एक भाव नाहीं माझा, तरी पाल्हाळ तें ॥ ४३२ ॥

कणेंविण सोपटें, कणसें लागलीं आथी एक दाटें।
काय करावें गोमटें, वोस नगर ॥ ४३३ ॥

नातरी सरोवर आटलें, रानीं दुःखिया दुःखी भेटलें।
कां वांझ फुलीं फुललें, झाड जैसें ॥ ४३४ ॥

तैसें सकळ तें वैभव, अथवा कुळजातीगौरव।
जैसें शरीर आहे सावेव, परि जीवचि नाहीं ॥ ४३५ ॥

तैसें माझिये भक्तीविण, जळो तें जियालेंपण।
अगा पृथ्वीवरी पाषाण, नसती काई ॥ ४३६ ॥

पैं हिंवराची दाट साउली, सज्जनीं जैसी वाळिली।
तैसीं पुण्यें डावलूनि गेलीं, अभक्तांतें ॥ ४३७ ॥

निंब निंबोळियां मोडोनि आला, तरी तो काउळियांसीचि सुकाळु जाहला।
तैसा भक्तिहीनु वाढिन्नला, दोषांचिलागीं ॥ ४३८ ॥

कां षड्रस खापरीं वाढिले, वाढूनि चोहटां रात्री सांडिले।
ते सुणियांचेचि ऐसे झाले, जियापरी ॥ ४३९ ॥

तैसें भक्तीहीनाचें जिणें, जो स्वप्नींही परि सुकृत नेणे।
तेणे संसारदुःखासी आवंतणें, वोगरिलें गा ॥ ४४० ॥

म्हणोनि कुळ उत्तम नोहावें, जाती अंत्याही व्हावें।
वरि देहाचेनि नांवें, पशूचेंही लाभो ॥ ४४१ ॥

पाहें पां सावजें हातिरुं धरिलें, तेणें तया काकुळती मातें स्मरिलें।
कीं तयाचें पशुत्व वावो जाहलें, पातलिया मातें ॥ ४४२ ॥

     मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्यु: पापयोनय:।
     स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम् ॥ ३२ ॥

अगा नांवें घेता वोखटीं, जे आघवेया अधमांचिये शेवटीं।
तिये पापयोनीही किरीटी, जन्मले जे ॥ ४४३ ॥

ते पापयोनि मूढ, मूर्ख ऐसे जे दगड।
परि माझां ठायीं दृढ, सर्वभावें ॥ ४४४ ॥

जयांचिये वाचे माझे आलाप, दृष्टी भोगी माझेंचि रुप।
जयांचें मन संकल्प, माझाचि वाहे ॥ ४४५ ॥

माझिया कीर्तीविण, जयांचे रिते नाहीं श्रवण।
जयां सर्वांगीं भूषण, माझी सेवा ॥ ४४६ ॥

जयांचें नाव विषो नेणे, जाणीव मजचि एकातें जाणे।
जया ऐसें लाभे तरी जिणें, एऱ्हवीं मरण ॥ ४४७ ॥

ऐसा आघवाचि परि पांडवा , जिहीं आपुलिया सर्वभावा, जियावयालागीं वोलावा, मीचि केला ॥ ४४८ ॥

ते पापयोनीही होतु कां, ते श्रुताधीतही न होतुं कां।
परि मजसीं तुकितां तुका, तुटी नाहीं ॥ ४४९ ॥

पाहें पां भक्तिचेनि आथिलेपणें, दैत्यीं देवां आणिलें उणें।
माझें नृसिंहत्व लेणें, जयाचिये महिमे ॥ ४५० ॥

तो प्रल्हादु गा मजसाठीं, घेतां बहुतें सदा किरीटी।
कां जें मियां द्यावें ते गोष्टी, तयाचिया जोडे ॥ ४५१ ॥

एऱ्हवीं दैत्यकुळ साचोकारें, परि इंद्रिही सरी न लाहे उपरें।
म्हणोनि भक्ति गा एथ सरे, जाति अप्रमाण ॥ ४५२ ॥

राजाज्ञेचीं अक्षरें आहाती, तियें चामा एका जया पडती।
तया चामासाठीं जोडती, सकळ वस्तु ॥ ४५३ ॥

वांचूनि सोनें रुपें प्रमाण नोहे, एथ राजाज्ञाचि समर्थ आहे।
तेंचि चाम एक जैं लाहे, तेणें विकती आघवीं ॥ ४५४ ॥

तैसें उत्तमत्व तैंचि तरे, तैंचि सर्वज्ञता सरे।
जैं मनोबुद्धि भरे, माझेनि प्रेमें ॥ ४५५ ॥

म्हणोनि कुळ जाति वर्ण, हें आघवेंचि गा अकारण।
एथ अर्जुना माझेपण, सार्थक एक ॥ ४५६ ॥

तेंचि भलतेणें भावें, मन मजाआंतु येतें होआवें।
आलें तरी आघवें, मागील वावो ॥ ४५७ ॥

जैसे तवंचि वहाळ वोहळ, जंव न पवती गंगाजळ।
मग होऊनि ठाकती केवळ, गंगारुप ॥ ४५८ ॥

कां खैर चंदन काष्ठें, हे विवंचना तंवचि घटे।
जंव न घापती एकवटें, अग्नीमाजीं ॥ ४५९ ॥

तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया, कां शूद्र अंत्यादि इया।
जाती तंवचि वेगळालिया, जंव न पवती मातें ॥ ४६० ॥

मग जाती व्यक्ती पडे बिंदुलें, जेव्हां भाव होती मज मीनले।
जैसे लवणकण घातले, सागरामाजीं ॥ ४६१ ॥

तंववरी नदानदींचीं नांवें, तंवचि पूर्वपश्चिमेचे यावे।
जंव न येती आघवे, समुद्रामाजीं ॥ ४६२ ॥

हेंचि कवणें एकें मिसें, चित्त माझां ठायीं प्रवेशे।
येतुलें हो मग आपैसें, मी होणे असे ॥ ४६३ ॥

अगा वरी फोडावयाचि लागीं, लोहो मिळो कां परिसाचां आंगीं।
कां जे मिळतिये प्रसंगीं, सोनेंचि होईल ॥ ४६४ ॥

पाहें पां वालभाचेनि व्याजें, तिया व्रजांगनांचीं निजें।
मज मीनलिया काय माझें, स्वरुप नव्हतीचि ॥ ४६५ ॥

नातरी भयाचेनि मिसें, मातें न पविजेचि काय कंसें।
कीं अखंड वैरवशें, चैद्यादिकीं ॥ ४६६ ॥

अगा सोयरेपणेंचि पांडवा, माझें सायुज्य यादवां।
कीं ममत्वें वासुदेवा-, दिकां सकळां ॥ ४६७ ॥

नारदा ध्रुवा अक्रूरा, शुका हन सनत्कुमारा।
यां भक्ती मी धनुर्धरा, प्राप्यु जैसा ॥ ४६८ ॥

तैसाचि गोपीसी कामें, तया कंसा भयसंभ्रमें।
येरा घातकेयां मनोधर्में, शिशुपालादिकां।। ४६९ ॥

अगा मी एकुलाणीचें खागें, मज येवों ये भलतेनि मार्गे।
भक्ती कां विषयें विरागें, अथवा वैरें ॥ ४७० ॥

म्हणोनि पार्था पाहीं, प्रवेशावया माझां ठायीं।
उपायांची नाहीं, केणि एथ ॥ ४७१ ॥

आणि भलतिया जाती जन्मावें, मग भजिजे कां विरोधावें।
परि भक्त कां वैरिया व्हावें, माझियाचि ॥ ४७२ ॥

अगा कवणें एके बोलें, माझेपण जऱ्ही जाहालें।
तरी मी होणें आलें, हाता निरुतें।। ४७३ ॥

यापरि पापयोनीही अर्जुना, कां वैश्य शूद्र अंगना।
मातें भजतां सदना, माझिया येती ॥ ४७४ ॥

     किं पुनर्ब्राह्मणा: पुण्या भक्ता राजर्षयस्तथा।
     अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम् ॥ ३३ ॥

मग वर्णांमाजीं छत्रचामर, स्वर्ग जयांचें अग्रहार।
मंत्रविद्येसि माहेर, ब्राह्मण जे ॥ ४७५ ॥

जेथ अखंड वसिजे यागीं, जे वेदांची वज्रांगी।
जयाचिये दिठीचां उत्संगीं , मंगळ वाढे ॥ ४७६ ॥

जे पृथ्वीतळींचे देव, जे तपोवतार सावयव।
सकळ तीर्थांसी दैव, उदयलें जे ॥ ४७७ ॥

जयाचिये आस्थेचिये वोले, सत्कर्म पाल्हाळीं गेलें।
संकल्पें सत्य जियालें, जयांचेनि ॥ ४७८ ॥

जयांचेनि गा बोलें, अग्नीसि आयुष्या जाहालें ।
म्हणोनि समुद्रें पाणी आपुलें, दिधलें यांचिया प्रीती ॥ ४७९ ॥

मियां लक्ष्मी डावलोनि केली परौती, फेडोनि कौस्तुभ घेतला हातीं, मग वोढविली वक्षस्थळाची वाखती, चरणरजां ॥ ४८० ॥

आझूनि पाउलांची मुद्रा, मी हृदयीं वाहें गा सुभद्रा।
जे आपुलिया दैवसमुद्रा, जतनेलागीं ॥ ४८१ ॥

जयांचा कोप सुभटा, काळाग्निरुद्राचा वसौटा।
जयांचां प्रसादीं फुकटा, जोडती सिद्धी ॥ ४८२ ॥

ऐसे पुण्यपूज्य जे ब्राह्मण, आणि माझां ठायीं आर्तिंनिपुण।
आतां मातें पावती हें कवण, समर्थणें ॥ ४८३ ॥

पाहें पां चंदनाचेनि अंगानिळें, शिवतिले निंब होते जे जवळे।
तिंहीं निर्जिवींही देवांची निडळें, बैसणीं केलीं ॥ ४८४ ॥

मग तो चंदनु तेथ न पवे, ऐसें मनीं कैसेनि धरावें।
अथवा पातला हें समर्थावें, तेव्हां कायि साच ॥ ४८५ ॥

जेथ निववील ऐसिया आशा, हरें चंद्रमा आधा ऐसा।
वाहिजत असे शिरसा, निरंतर ॥ ४८६ ॥

तेथ निवविता आणि सगळा, परिमळें चंद्राहूनि आगळा।
तो चंदनु केविं अवलीळा, सर्वांगी न बैसे ॥ ४८७ ॥

कां रथ्योदकें जियेचिये कासे, लागलिया समुद्र जालीं अनायासें।
तिये गंगेसि काय अनारिसें, गत्यंतर असे ॥ ४८८ ॥

म्हणोनि राजर्षि कां ब्राह्मण, जयां गती मती मीचि शरण।
तयां त्रिशुद्धी मीच निर्वाण, स्थितिही मीचि ॥ ४८९ ॥

यालागीं शतजर्जरे नावे, रिगोनि केविं निश्चिंत होआवें।
कैसेनि उघडिया असावें, शस्त्रवर्षीं ॥ ४९० ॥

अंगावरी पडतां पाषाण, न सुवावें केविं वोडण।
रोगें दाटलिया आणि उदासपण, वोखदेंसीं ॥ ४९१ ॥

जेथ चहूंकडे जळत वणवा, तेथूनि न निगिजे केविं पांडवा।
तेविं लोका येऊनिया सोपद्रवा, केविं न भजिजे मातें ॥ ४९२ ॥

अगा मातें न भजावयालागीं, कवण बळ पां आपुलां आंगीं।
काइ घरीं कीं भोगीं, निश्चिंती केली ॥ ४९३ ॥

नातरी विद्या कीं वयसा, यां प्राणियांसि हा ऐसा।
मज न भजतां भरवसां, सुखाचा कोण ॥ ४९४ ॥

तरी भोग्यजात जेतुलें, तें एका देहाचिया निकिया लागलें।
आणि येथ देह तंव असे पडिलें, काळाचां तोंडीं ॥ ४९५ ॥

बाप दुःखाचें केणें सुटलें, जेथ मरणाचे भरे लोटले।
तिये मृत्युलोकींचिये शेवटिले, येणें जाहालें हाटवेळे ॥ ४९६ ॥

आतां सुखेंसि जीविता, कैची ग्राहिकी कीजेल पांडुसुता।
काय राखोंडी फुंकिता, दीपु लागे ॥ ४९७ ॥

अगा विषाचे कांदे वाटुनी, जो रसु घेइजे पिळुनी।
तया नाम अमृत ठेउनी, जैसें अमर होणें ॥ ४९८ ॥

तेविं विषयांचें जें सुख, तें केवळ परम दुःख।
परि काय कीजे मूर्ख, न सेवितां न सरे ॥ ४९९ ॥

कां शीस खांडूनि आपुलें, पायींचां खतीं बांधिलें।
तैसें मृत्युलोकींचें भलें, आहे आघवें ॥ ५०० ॥

म्हणोनि मृत्युलोकीं सुखाची कहाणी, ऐकिजेल कवणाचां श्रवणीं, कैंची सुखनिद्रा आंथरुणीं, इंगळाचां ॥ ५०१ ॥

जिये लोकीचा चंद्र क्षयरोगी, जेथ उदयो होय अस्तालागीं।
दुःख लेऊनि सुखाची आंगी, सळित जगातें ॥ ५०२ ॥

जेथे मंगळाचां अंकुरीं, सवेंचि अमंगळाची पडे पोरी।
मृत्यु उदराचां परिवरीं, गर्भु गिंवसी ॥ ५०३ ॥

जें नाहीं तयांतें चिंतवी, तंव तेंचि नेइजे गंधर्वीं।
गेलियाची कवणे गांवीं , शुद्धी न लभे ॥ ५०४ ॥

अगा गिंवसितां आघवा वाटी, परतलें पाउलचि नाहीं किरीटी।
सैंघ निमालियांचियाचि गोठी, तिंये पुराणें जेथिंचीं ॥ ५०५ ॥

जेथींचिये अनित्यतेची थोरी, करितया ब्रह्मयाचें आयुष्यवेरी।
कैसें नाहीं होणें अवधारीं, निपटूनियां ॥ ५०६ ॥

ऐसी लोकींची जिये नांदणूक, तेथ जन्मले आथि जे लोक।
तयांचिये निश्चिंतीचे कौतुक, दिसत असे ॥ ५०७ ॥

पैं दृष्टादृष्टीचिये जोडी, लागीं भांडवल न सुटे कवडी।
जेथ सर्वस्वें हानि तेथ कोडी, वेंचिती गा ॥ ५०८ ॥

जो बहुवें विषयविलासें गुफें, तो म्हणती उवायें पडिला सापें।
जो अभिलाषभारें दडपे, तयातें सज्ञान म्हणती ॥ ५०९ ॥

जयाचें आयुष्य धाकुटें होय, बळ प्रज्ञा जिरौनि जाय।
तयाचे नमस्कारिती पाय, वडिल म्हणुनि ॥ ५१० ॥

जंव जंव बाळ बळिया वाढे, तंव तंव भोजें नाचती कोडें।
आयुष्य निमालें आंतुलियेकडे, ते ग्लानीचि नाहीं ॥ ५११ ॥

जन्मलिया दिवसदिवसें, हों लागे काळाचियाचि ऐसें।
कीं वाढती करिती उल्हासें, उभविती गुढिया ॥ ५१२ ॥

अगा मर हा बोलु न साहती, आणि मेलिया तरी रडती।
परि असतें जात न गणिती, गहिंसपणें ॥ ५१३ ॥

दर्दुर सापें गिळिजतु आहे उभा, कीं तो मासिया वेटाळी जिभा।
तैसे प्राणिये कवणा, वाढविती तृष्णा ॥ ५१४ ॥

अहा कटा हें वोखटें, मृत्युलोकींचें उफराटें।
एथ अर्जुना जरी अवचटें, जन्मलासी तूं ॥ ५१५ ॥

तरि झडझडोनि वहिला निघ, इये भक्तीचिये वाटे लाग।
जिया पावसी अव्यंग, निजधाम माझें ॥ ५१६ ॥

     मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु।
     मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायण: ॥ ३४ ॥

तूं मन हें मीचि करीं, माझां भजनीं प्रेम धरीं।
सर्वत्र नमस्कारीं, मज एकातें ॥ ५१७ ॥

माझेनि अनुसंधानें देख, संकल्पु जाळणें निःशेख।
मद्याजी चोख, याचि नांव ॥ ५१८ ॥

ऐसा मियां आथिला होसी, तेथ माझियाचि स्वरुपा पावसी।
हें अंतःकरणींचें तुजपासीं, बोलिजत असे ॥ ५१९ ॥

अगा आवघिया चोरिया आपुलें, जें सर्वस्व आम्ही असे ठेविलें।
तें पावोनि सुख संचले, होऊनि ठासी ॥ ५२० ॥

ऐसें सांवळेनि परब्रह्में, भक्तकामकल्पद्रुमें।
बोलिलें आत्मारामें, संजयो म्हणे ॥ ५२१ ॥

अहो ऐकिजत असे कीं अवधारा, तंव इया बोला निवांत म्हातारा, जैसा म्हैसा नुठी कां पुरा, तैसा उगाचि असे ॥ ५२२ ॥

तेथ संजयें माथा तुकिला, अहा अमृताचा पाऊस वर्षला।
कीं हा एथ असतुचि गेला, सेजिया गांवा ॥ ५२३ ॥

तऱ्ही दातारु हा आमुचा, म्हणोनि हें बोलतां मैळेल वाचा।
काइ झालें ययाचा, स्वभावोचि ऐसा ॥ ५२४ ॥

परि बाप भाग्य माझें, जे वृत्तांतु सांगावयाचेनि व्याजें।
कैसा रक्षिलों मुनिराजें, श्रीव्यासदेवें ॥ ५२५ ॥

येतुलें हें वाडें सायासें, जंव बोलत असे दृढें मानसें।
तंव न धरवेचि आपुलिया ऐसें, सात्विकें केलें ॥ ५२६ ॥

चित्त चाकाटलें आटु घेत, वाचा पांगुळली जेथिंची तेथ, आपादकंचुकित, रोमांच आले ॥ ५२७ ॥

अर्धोन्मीलित डोळे, वर्षताति आनंदजळें।
आंतुलिया सुखोर्मीचेनि बळें, बाहेरि कांपे ॥ ५२८ ॥

पै आघवांचि रोममूळीं, आली स्वेदकणिका निर्मळी।
लेइला मोतियांचीं कडियाळीं, आवडे तैसा ॥ ५२९ ॥

ऐसा महासुखाचेनि आर्तिंरसे, जेथ आटणी होईल जीवदशे।
तेथे निरोविलें व्यासें, तें नेदीच हों ॥ ५३० ॥

आणि कृष्णार्जुनाचें बोलणें, घों करी आलें श्रवणें।
कीं देहस्मृतीचा तेणें, वापसा केला ॥ ५३१ ॥

तेव्हां नेत्रींचें जळ विसर्जी, सर्वांगींचा स्वेदु परिमार्जी।
तेवींचि अवधान म्हणे हो जी, धृतराष्ट्रातें।। ५३२ ॥

आतां कृष्णवाक्यबीजा निवाडु, आणि संजय सात्विकाचा बिवडु, म्हणोनि श्रोतया होईल सुरवाडु, प्रमेयपिकाचा ॥ ५३३ ॥

अहो अळुमाळु अवधान देयावें, येतुलेनि आनंदाचे राशीवर बैसावें, बाप श्रवणेंद्रिया दैवें, घातली माळ ॥ ५३४ ॥

म्हणोनि विभूतींचा ठावो, अर्जुना दावील सिद्धांचा रावो।
तो ऐका म्हणे ज्ञानदेवो, निवृत्तीचा ॥ ५३५ ॥

॥ इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्याराजगुह्ययोगो नाम नवमोऽध्यायः ॥

ॐ श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु।।