भारत की संस्कृति के लिए... भाषा की उन्नति के लिए... साहित्य के प्रसार के लिए

ज्ञानेश्वरी / अध्याय दुसरा / संत ज्ञानेश्वर

Kavita Kosh से
यहाँ जाएँ: भ्रमण, खोज

    संजय उवाच : तं तथा कृपयाविष्टमश्रूपूर्णाकुलेक्षणम्।
                   विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः ॥ १॥

मग संजयो म्हणे रायातें, आइकें तो पार्थु तेथें।
शोकाकुल रुदनातें, करितुसे ॥ १॥

तें कुळ देखोनि समस्त, स्नेह उपनलें अद्भुत।
तेणें द्रवले असे चित्त, कवणेपरी ॥ २ ॥

जैसें लवण जळें झळंबलें, ना तरी अभ्र वातें हाले।
तैसे सधीर परी विरमलें, हृदय तयाचें ॥ ३॥

म्हणोनि कृपा आकळिला, दिसतसे अति कोमाइला।
जैसा कर्दमीं रुपला, राजहंस ॥ ४ ॥

तयापरी तो पांडुकुमरु, महामोहें अतिजर्जरु।
देखोनि, शार्गङधरु, काय बोले ॥ ५ ॥

          श्रीभगवानुवाच : कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम्।
                         अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तीकरमर्जुन ॥ २ ॥

म्हणे अर्जुना आदि पाहीं, हें उचित काय इये ठायीं।
तूं कवण हें कायी, करीत आहासी ॥ ६ ॥

तुज सांगे काय जाहलें, कवण उणें आलें।
करितां काय ठेलें, खेदु कायिसा ॥ ७ ॥

तूं अनुचिता चित्त नेदिसी, धीरु कंहीच न संडिसी।
तुझेनि नामे अपयशीं, दिशा लंघिजे ॥ ८ ॥

तू शूरवृत्तीचा ठावो, क्षत्रियांमाजीं रावो।
तुझिया लाठेपणाचा आवो, तिहीं लोकीं ॥ ९ ॥

तुवा संग्रामीं हरु जिंतिला, निवात्कवचांचा ठावो फेडिला।
पवाडा तुवां केला, गंधर्वासी ॥ १० ॥

हें पाहता तुझेनि पाडें, दिसे त्रैलोक्यही थोकडें।
ऐसें पौरुष चोखडें, पार्था तुझे ॥ ११ ॥

तो तूं कीं आजि एथें, सांडुनिया वीरवृत्तीतें।
अधोमुख रुदनातें, करितु आहासी ॥ १२ ॥

विचारीं तूं अर्जुनु, कीं कारुण्यें कीजसी दीनु।
सांग पां अंधकारे, भानु ग्रासिला आथी ॥ १३ ॥

ना तरी पवनु मेघासी बिहे, कीं अमृतासी मरण आहे।
पाहे पा इंधनचि गिळोनि जाये, पावकातें ॥ १४ ॥

की लवणेंचि जळ विरे, संसर्गें काळकूट मरे।
सांग महाफणी दर्दुरें, गिळिजे कायी ॥ १५ ॥

सिंहासी झोंबे कोल्हा, ऐसा अपाडु आथी कां जाहला।
परी तो त्वां साच केला, आजि एथ ॥ १६ ॥

म्हणोनि अझुनि अर्जुना, झणें चित्त देसी या हीना।
वेगीं धीर करूनियां मना, सावधान होईं ॥ १७ ॥

सांडी हे मूर्खपण, उठीं घे धनुष्यबाण,
संग्रामीं हें कवण, कारुण्य तुझे ॥ १८ ॥

हां गा तू जाणता, तरी न विचारीसी कां आता।
सांगे झुंजावेळें सदयता, उचित कायी ॥ १९ ॥

हे असतिये कीर्तीसी नाशु, आणि पारत्रिकासी अपभ्रंशु।
म्हणे जगन्निवासु, अर्जुनातें ॥ २० ॥

     क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत् त्वय्युपपद्यते।
     क्षुद्रं ह्रदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप ॥ ३ ॥

म्हणोनि शोक न करीं, तूं पुरता धीरु धरीं।
हे शोच्यता अव्हेरीं, पंडुकुमरा ॥ २१ ॥

तुज नव्हे हें उचित, येणें नासेल जोडले बहुत।
तूं अझुनिवरी हित, विचारी पां ॥ २२ ॥

येणें संग्रामाचेनि अवसरें, एथ कृपाळुपण नुपकरे।
हे आतांचि काय सोयरे, जाहले तुज ॥ २३ ॥

तूं आधींचि काय नेणसी, कीं गोत्र नोळखसी।
वायांचि काय करिसी, अतिशो आतां ॥ २४ ॥

आजिंचे हें काय झुंज, काय जन्मा नवल तुज।
हें परस्परें तुम्हां व्याज, सदाचि आथि ॥ २५ ॥

तरी आतां काय जाहलें, कायि स्नेह उपनले।
हें नेणिजे परि कुडे केले, अर्जुना तुवा ॥ २६ ॥

मोह धरिलिया ऐसें होईल, जे असती प्रतिष्ठा जाईल।
आणि परलोकही अंतरेल, ऐहिकेंसी ॥ २७ ॥

हृदयाचे ढिलेपण, एथ निकयासी नव्हे कारण।
हें संग्रामीं पतन जाण, क्षत्रीयांसी ॥ २८ ॥

ऐसेनि तो कृपावंतु, नानापरी असे शिकवितु।
हे ऐकोनि पंडुसुतु, काय बोले ॥ २९ ॥

     अर्जुन उवाचः कथं च भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन।
                इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन ॥ ४॥

देवा हें येतुलेवरी, बोलावे नलगे अवधारीं।
आधीं तूंचि चित्ती विचारीं, संग्रामु हा ॥ ३० ॥

हें झुंज नव्हे प्रमादु, एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधु।
हा उघडा लिंगभेदु, वोढवला आम्हा ॥ ३१ ॥

देखें मातापितरें अर्चिजती, सर्वस्वें तोष पावविजती,
तियें पाठीं केवीं वधिजती, आपुला हातीं ॥ ३२ ॥

देवा संतवृंदु नमस्कारिजे, कां घडे तरी पूजिजे।
हें वांचूनि केवीं निंदिजे, स्वयें वाचा ॥ ३३ ॥

तैसे गोत्रगुरु आमुचे, हे पूजनीय आम्हां नियमांचे।
मज बहुत भीष्मद्रोणांचे, वर्ततसे ॥ ३४ ॥

जयालागीं मनें विरु, आम्ही स्वप्नींही न शको धरूं।
तया प्रत्यक्ष केवीं, घातु देवा ॥ ३५ ॥

वर जळो हें जियालें, एथ आघवेयांसी हेंचि काय जाहले।
जे यांचां वधीं अभ्यासिलें, मिरविजे आम्हीं ॥ ३६ ॥

मी पार्थु द्रोणाचा केला, येणें धनुर्वेदु मज दिधला।
तेणें उपकारें काय आभारैला, वधीं तयातें ॥ ३७ ॥

जेथींचिया कृपा लाभिजे वरु, तेथेंचि मने व्यभिचारु।
तरी काय मी भस्मासुरु, अर्जुन म्हणे ॥ ३८ ॥

     गुरूनहत्वा हि महानुभवान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके।
     हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुंजीय भोगान् रुधिरप्रदिग्धान् ॥ ५ ॥

देवा समुद्र गंभीर आइकिजे, वर तोहि आहाच देखिजे।
परी क्षोभु मनीं नेणिजे, द्रोणाचिये ॥ ३९ ॥

हें अपार जें गगन, वर तयाही होईल मान।
परि अगाध भलें गहन, हृदय यांचे ॥ ४० ॥

वरी अमृतही विटे, कीं काळवशें वज्र फुटे।
परि मनोधर्मु न लोटे, विकरविला हा ॥ ४१ ॥

स्नेहालागीं माये, म्हणिपे तें कीरु होये।
परि कृपा ते मूर्त आहे, द्रोणीं इये ॥ ४२ ॥

हा कारुण्याची आदि, सकळ गुणांचा निधि।
विद्यासिंधु निरवधि, अर्जुन म्हणे ॥ ४३ ॥

हा येणें मानें महंतु, वरी आम्हांलागी कृपावंतु।
आतां सांग पां येथ घातु, चिंतूं येईल ॥ ४४ ॥

ऐसे हे रणीं वधावे, मग आपण राज्यसुख भोगावें।
तें मना न ये आघवें, जीवितेंसीं ॥ ४५ ॥

हें येणें मानें दुर्भर, जे याहीहुनि भोग सधर।
ते असतु येथवर, भिक्षा मागतां भली ॥ ४६ ॥

ना तरी देशत्यागें जाइजे, का गिरिकंदर सेविजे।
परी शस्त्र आतां न धरिजे, इयांवरी ॥ ४७ ॥

देवा नवनिशतीं शरीं, वावरोनि यांचां जिव्हारीं।
भोग गिंवसावे रुधिरीं, बुडाले जे ॥ ४८ ॥

ते काढूनि काय कीजती, लिप्त केवीं सेविजती।
मज न ये हे उपपत्ति, याचिलागीं ॥ ४९ ॥

ऐसे अर्जुन तिये अवससरीं, म्हणे श्रीकृष्णा अवधारीं।
परि ते मना न येचि मुरारी, आइकोनियां ॥ ५० ॥

हें जाणोनि पार्थु बिहाला, मग पुनरपि बोलों लागला,
म्हणे देवो कां चित्त या बोलां, देतीचिना ॥ ५१ ॥

     न चैतद् विद्मः करतन् नो गरीयो यद् वा जयेम यदि वा नो जयेयुः।
     यानेव हत्वा न जिजीविषामस्तेऽवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः ॥ ६ ॥

येर्ह वीं माझां चित्तीं जें होते, तें मी विचारूनि बोलिलों एथें।
परि निकें काय यापरौते, तें तुम्ही जाणा ॥ ५२ ॥

पै विरु जयांसी ऐकिजे, आणि या बोलाचि प्राणु सांडिजे।
ते एथ संग्रामव्याजें, उभे आहाती ॥ ५३ ॥

आतां ऐसेयांतें वधावे, कीं अव्हेरुनिया निघावें।
या दोहोंमाजी काइ करावे, तें नेणों आम्ही ॥ ५४ ॥

     कार्पण्यदोषोपहत्स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसंमूढचेताः।
     यत् श्रेयः स्यान् निश्चितं ब्रूहि तन् मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् ॥ ७॥

आम्हां काय उचित, तें पाहतां न स्फुरे एथ।
जे मोहें येणें चित्त, व्याकुळ माझे ॥ ५५ ॥

तिमिरावरुद्ध जैसें, दृष्टीचे तेज भ्रंशे।
मग पांसीच असतां न दिसे, वस्तुजात ॥ ५६ ॥

देवा मज तैसे जाहले, जें मन भ्रांती ग्रासिलें।
आतां काय हित आपुलें, तेंही नेणे ॥ ५७ ॥

तरी श्रीकृष्णा तुवां जाणावें, निकें तें आम्हां सांगावें।
जे सखा सर्वस्व आघवें, आम्हांसी तूं ॥ ५८ ॥

तूं गुरु बंधु पिता, तूं आमची इष्ट देवता।
तूंचि सदा रक्षिता, आपदीं आमुतें ॥ ५९ ॥

जैसा शिष्यांते गुरु, सर्वथा नेणे अव्हेरु।
कीं सरितांते सागरु, त्यजी केवीं ॥ ६०॥

नातरी अपत्यातें माये, सांडुनि जरी जाये।
तरी ते कैसेनिं जिये, ऐकें कृष्णा ॥ ६१ ॥

तैसा सर्वांपरी आम्हांसी, देवा तूंचि एक आहासी।
आणि बोलिलें जरी न मानिसी, मागील माझें ॥ ६२ ॥

तरी उचित काय आम्हां, जे व्यभिचरेना धर्मा।
तें झडकरी पुरुषोत्तमा, सांगें आतां ॥ ६३ ॥

     न हि प्रपश्यामि ममापुनुद्याद् यच्छोकमुछोषणमिन्द्रियाणाम्।
     अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् ॥ ८ ॥

हें सकळ कुळ देखोनि, जो शोकु उपजलासे मनीं।
तो तुझिया वाक्यावांचुनि, न जाय आणिकें ॥ ६४ ॥

एथ पृथ्वीतळ आपु होईल, हें महेंद्रपदही पाविजेल।
परि मोह हा न फिटेल, मानसींचा ॥ ६५ ॥

जैसीं बीजें सर्वथा आहाळलीं, तरी सुक्षेत्री जर्ही पेरिलीं।
तरी न विरुढती सिंचलीं, आवडे तैसीं ॥ ६६ ॥

ना तरी आयुष्य पुरलें आहे, तरी औषधें काही नोहे।
एथ एकचि उपेगा जाये, परमामृत ॥ ६७ ॥

तैसे राज्यभोगसमृद्धि, उज्जीवन नोहे जीवबुद्धि।
एथ जिव्हाळा कृपानिधि, कारुण्य तुझें ॥ ६८ ॥

ऐसें अर्जुन तेथ बोलिला, जंव क्षण एक भ्रांति सांडिला।
मग पुनरपि व्यापिला, उर्मीं तेणें ॥ ६९ ॥

कीं मज पाहता उर्मी नोहे, हें अनारिसें गमत आहे।
तो ग्रासिला महामोहें, काळसर्पें ॥ ७० ॥

सवर्म हृदयकल्हारीं, तेथ कारुण्यवेळेचां भरीं।
लागला म्हणोनि लहरी, भांजेचि ना ॥ ७१ ॥

हें जाणोनि ऐसी प्रौढी, जो दृष्टीसवें विष फेडी।
तो धावया श्रीहरी गारुडी, पातला कीं ॥ ७२ ॥

तैसिया पंडुकुमरा व्याकुळा, मिरवतसे श्रीकृष्ण जवळा।
तो कृपावशें अवलीळा, रक्षील आतां ॥ ७३ ॥

म्हणोनि तो पार्थु, मोहफणिग्रस्तु।
म्यां म्हणितला हा हेतु, जाणोनियां ॥ ७४ ॥

मग देखा तेथ फाल्गुनु, घेतला असे भ्रांती कवळूनु।
जैसा घनपडळीं भानु, आच्छादिजे ॥ ७५ ॥

तयापरी तो धर्नुधरू, जाहलासे दुःखे जर्जरु।
जैसा ग्रीष्मकाळीं गिरिवरु, वणवला कां ॥ ७६ ॥

म्हणोनि सहजे सुनिळु, कृपामृते सजळु।
तो वोळलासे श्रीगोपाळु, महामेघु ॥ ७७ ॥

तेथ सुदर्शनाची द्युति, तेचि विद्युल्लता झळकती।
गंभीर वाचा ते आयती, गर्जनेची ॥ ७८ ॥

आतां तो उदार कैसा वर्षेल, तेणे अर्जुनाचळु निवेल।
मग नवी विरुढी फुटेल, उन्मेषाची ॥ ७९ ॥

ते कथा आइका, मनाचिया आराणुका।
ज्ञानदेवो म्हणे देखा, निवृत्तिदासु ॥ ८० ॥

     संजय उवाच: एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेशः परंतपः।
                न योत्स्य इति गोविंदमुक्त्वा तूष्णीं बभूव ह ॥ ९ ॥

ऐसें संजयो सांगतु, म्हणे राया तो पार्थु।
पुनरपि शोकाकुलितु, काय बोले ॥ ८१ ॥

आइकें सखेदु बोले श्रीकृष्णातें, आतां नाळवावें तुम्हीं मातें।
मी सर्वथा न झुंजें येथें, भरंवसेनि ॥ ८२ ॥

ऐसें येकि हेळां बोलिला, मग मौन धरोनि ठेला।
तेथ श्रीकृष्णा विस्मो पातला, देखोनि तयाते ॥ ८३ ॥

     तमुवाच हृषीकेशः प्रहसन्निव भारत।
     सेनयोरुभयोर्मध्ये विषीदंतमिदं वचः ॥ १० ॥

मग आपुला चित्तीं म्हणे, एथ हें काय आदरिलें येणें।
अर्जुन सर्वथा कांही नेणे, काय कीजे ॥ ८४ ॥

हा उमजे आतां कवणेपरी, कैसेनि धीरु स्वीकारी।
जैसा ग्रहाते पंचाक्षरी, अनुमानी कां ॥ ८५ ॥

ना तरी असाध्य देखोनि व्याधी, अमृतासम दिव्य औषधी।
वैद्य सूचि निरवधि, निदानींची ॥ ८६ ॥

तैसा विवरितु असे श्रीअनंतु, तया दोन्हीं सैन्याआंतु।
जयापरी पार्थु, भ्रांति सांडी ॥ ८७ ॥

तें कारण मनीं धरिलें, मग सरोष बोलों आदरिले।
जैसें मातेच्या कोपीं थोकलें, स्नेह आथी ॥ ८८ ॥

कीं औषधाचिया कडुवटपणीं, जैसी अमृताची पुरवणी।
ते आहाच न दिसे परी गुणीं, प्रकट होय ॥ ८९ ॥

तैसे वरिवरि पाहतां उदासें, आंत तरी अतिसुरसें।
तियें वाक्यें हृषीकेशें, बोलों आदरिलीं ॥ ९० ॥


     श्रीभगवानुवाच: अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे।
                   गतासूनगतासूंश्च नानुशोचंति पंडितः ॥ ११ ॥

मग अर्जुनाते म्हणितलें, आम्ही आजि हें नवल देखिलें।
जें तुवां येथ आदरिलें, माझारींचि ॥ ९१ ॥

तूं जाणता तरी म्हणविसी, परी नेणीवेतें न संडिसी।
आणि शिकवूं म्हणों तरी बोलसी, बहुसाल नीति ॥ ९२ ॥

जात्यंधा लागे पिसें, मग तें सैरा धांवे जैसें।
तुझे शहाणपण तैसें, दिसतसे ॥ ९३ ॥

तूं आपणपें तरी नेणसी, परी या कौरवांते शोचूं पहासी,
हा बहु विस्मय आम्हांसी, पुढतपुढती ॥ ९४ ॥

तरी सांग पां मज अर्जुना, तुजपासोनि स्थिती या त्रिभुवना।
हे अनादि विश्वरचना, तें लटकें कायी ॥ ९५ ॥

एथ समर्थु एक आथीं, तयापासूनि भूतें होती।
तरी हें वायाचि काय बोलती, जगामाजीं ॥ ९६ ॥

हो कां सांप्रत ऐसें जहालें, जे हे जन्ममृत्यू तुवा सृजिले।
आणि नाशु पाविले, तुझेनि कायी ॥ ९७ ॥

तूं भ्रमलेपणें अहंकृती, यांसी घातु न करिसी चितीं।
तरी सांगे कायि हे होती, चिरंतन ॥ ९८ ॥

कीं तूं एक वधिता, आणि सकळ लोकु हा मरता।
ऐसी भ्रांति झणें चित्ता, येवो देसी ॥ ९९ ॥

अनादिसिद्ध हें आघवें, होत जात स्वभावें।
तरी तुवा का शोचावे, सांग मज ॥ १०० ॥

परी मूर्खपणे नेणसी, न चिंतावें तें चिंतसी।
आणि तूंचि नीति सांगसी, आम्हाप्रति ॥ १०१ ॥

देखें जे विवेकी जे होती, ते दोहींतेही न शोचती।
जे होय जाय हे भ्रांती, म्हणऊनियां ॥ १०२ ॥


     न त्वेवाहं जातुं नासं न त्वं नेमे जनाधिपाः।
     न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् ॥ १२ ॥

अर्जुना सांगेन आइक, एथ आम्ही तुम्ही देख।
आणि हे भूपति अशेख, आदिकरुनी ॥ १०३ ॥

नित्यता ऐसेचि असोनि, ना तरी निश्चित क्षया जाऊनि।
हे भ्रांति वेगळी करूनी, दोन्हीं नाहीं ॥ १०४ ॥

हे उपजे आणि नाशे, ते मायावशें दिसे।
येर्ह वीं तत्वता वस्तु जे असे, ते अविनाशचि ॥ १०५ ॥

जैसें पवनें तोय हालविलें, आणि तरंगाकार जाहलें।
तरी कवण कें जन्मलें, म्हणों ये तेथ ॥ १०६ ॥

तेंचि वायूचे स्फुरण ठेलें, आणि उदक सहज सपाटलें।
तरी आता काय निमालें, विचारीं पां ॥ १०७ ॥

     देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा।
     तथा देहांतरप्राप्तिर्धीरस्त्तत्र न मुह्यति ॥ १३ ॥

आइकें शरीर तरी एक, परी वयसा भेद अनेक।
हें प्रत्यक्षचि देख, प्रमाण तूं ॥ १०८ ॥

एथ कौमारत्व दिसे, मग तारुण्यीं तें भ्रंशे।
परी देहचि न नाशे, एकेकासवें ॥ १०९ ॥

तैसीं चैतन्याचां ठायीं, इयें शरीरांतरे होति जाति पाहीं।
ऐसें जाणे जया नाहीं, व्यामोहदुःख ॥ ११० ॥

     मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुखदुःखदाः।
     आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ॥ १४ ॥

एथ नेणावया हेंचि कारण, जें इंद्रियांआधीनपण।
तिहीं आकळिजे अंतःकरण, म्हणऊनि भ्रमे ॥ १११ ॥

इंद्रियें विषय सेविती, तेथ हर्ष शोकु उपजती।
ते अंतर आप्लविती, संगें येणें ॥ ११२ ॥

जयां विषायांचां ठायीं, एकनिष्ठता कहीं नाहीं।
तेथ दुःख आणि कांहीं, सुखहि दिसे ॥ ११३ ॥

देखें हे शब्दाची व्याप्ति, निंदा आणि स्तुति।
तेथ द्वेषाद्वेष उपजति, श्रवणद्वारें ॥ ११४ ॥

मृदु आणि कठीण, जे स्पर्शाचे दोन्ही गुण।
जे वपूचेनि संगे कारण संतोषखेदां ॥ ११५ ॥

भ्यासुर आणि सुरेख, हें रुपाचें स्वरूप देख।
जें उपजवी सुखदुःख, नेत्राद्वारें ॥ ११६ ॥

सुगंधु आणि दुर्गंधु, हा परिमळाचा भेदु।
जो घ्राणसंगे विषादु -, तोषु देता ॥ ११७ ॥

तैसाचि द्विविध रसु, उपजवी प्रीतित्रासु।
म्हणूनि हा अपभ्रंशु, विषयसंगु ॥ ११८ ॥

देखें इंद्रियां आधीन होईजे।तें शीतोष्णांते पाविजे।
आणि सुखदुःखी आकळिजे, आपणपें ॥ ११९ ॥

या विषयावांचूनि कांही, आणीक सर्वथा रम्य नाहीं।
ऐसा स्वभावोचि पाहीं, इंद्रियांचा ॥ १२० ॥

हे विषय तरी कैसे, रोहिणीचें जळ जैसें।
कां स्वप्नींचा आभासे, भद्रजाति ॥ १२१ ॥

देखें अनित्य तियापरी, म्हणऊनि तूं अव्हेरीं।
हा सर्वथा संगु न धरीं, धनुर्धरा ॥ १२२ ॥

     यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषषर्भ।
     समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते ॥ १५ ॥

हे विषय जयाते नाकळिती, तयाते सुखदुःखें दोन्ही न पवती।
आणि गर्भवासुसंगती, नाहीं तया ॥ १२३ ॥

तो नित्यरूपु पार्था, वोळखावा सर्वथा।
जो या इंद्रियार्था, नागवेचि ॥ १२४ ॥

     नासंतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः।
     उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्वदर्शिभिः ॥ १६ ॥

आतां अर्जुना आणिक कांही एक, सांगेन मी आइक।
जें विचारें परलोक, वोळखिती ॥ १२५ ॥

या उपाधिमाजि गुप्त, चैतन्य असे सर्वगत।
तें तत्वज्ञ संत, स्वीकारिती ॥ १२६ ॥

सलिलीं पय जैसें, एक होऊन मीनलें असे।
परीं निवडूनि राजहंसें, वेगळें कीजे ॥ १२७ ॥

कीं अग्निमुखें किडाळ, तोडोनियां चोखाळ।
निवडिती केवळ, बुद्धिमंत ॥ १२८ ॥

ना तरी जाणिवेच्या आयणी, करितां दधिकडसणी।
मग नवनीत निर्वाणीं, दिसे जैसें ॥ १२९ ॥

कीं भूस बीज एकवट, उपणितां राहे घनवट।
तेथ उडे तें फलकट, जाणों आले ॥ १३० ॥

तैसें विचारितां निरसलें, तें प्रपंचु सहजें सांडवलें।
मग तत्वता तत्व उरलें, ज्ञानियांसी ॥ १३१ ॥

म्हणोनि अनित्याचां ठायीं, तयां आस्तिक्यबुद्धि नाहीं।
निष्कर्ष दोहींही, देखिला असे ॥ १३२ ॥

     अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमैदं तत्।
     विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति ॥ १७ ॥

देखें सारासार विचारितां, भ्रांति जे पाहीं असारता।
तरी सार तें स्वभावता, नित्य जाणें ॥ १३३ ॥

हा लोकत्रयाकारु, तो जयाचा विस्तारु।
तेथ नाम वर्ण आकारु, चिन्ह नाही ॥ १३४ ॥

जो सर्वदा सर्वगतु, जन्मक्षयातीतु।
तया केलियाहि घातु, कदाचि नोहे ॥ १३५ ॥

     अन्तवंतः इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः।
     अनाशिनोऽप्रमेयस्य तस्याद् युध्यस्व भारत ॥ १८ ॥

आणि शरीरजात हे आघवें, हें नाशवंत स्वभावें।
म्हणोनि तुवा झुंजावें, पंडुकुमरा ॥ १३६ ॥

     य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम्।
     उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ॥ १९ ॥

तूं धरूनि देहाभिमानातें, दिठी सूनि या शरीरातें।
मी मारिता हे मरते, म्हणत आहासी ॥ १३७ ॥

तरी अर्जुना तूं हें नेणसी, जरी तत्वता विचारिसी।
तरी वधिता तूं नव्हेसी, हे वध्य नव्हती ॥ १३८ ॥

     न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता न भूयः।
     अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ॥ २० ॥

     वेदाविनाशिनं नित्यं य एनमजव्ययम्।
     कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्ति कम् ॥ २१ ॥

जैसें स्वप्नामाजिं देखिजे, तें स्वप्नींचि साच आपजे।
मग चेऊनियां पाहिजे, तंव कांही नाहीं ॥ १३९ ॥

तैसी हे जाण माया, तूं भ्रमत आहासी वायां।
शस्त्रें हाणितलिया छाया, जैसी आंगी न रुपे ॥ १४० ॥

कां पूर्ण कुंभ उलंडला, तेथ बिंबाकारु दिसे भ्रंशला।
परी भानु नाहीं नासला, तयासवें ॥ १४१ ॥

ना तरी मठीं आकाश जैसें, मठाकृती अवतरले असे।
तो भंगलिया आपैसे, स्वरूपचि ॥ १४२ ॥

तैसें शरीराचां लोपीं, सर्वथा नाशु नाहीं स्वरूपीं।
म्हणऊनि तूं हें नारोपीं, भ्रांति बापा ॥ १४३॥

     वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि।
     तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नावानि देही ॥ २२॥

जैसें जीर्ण वस्त्र सांडिजे, मग नूतन वेढिजे।
तैसे देहांतराते स्वीकारिजे, चैतन्यनाथें ॥ १४४ ॥

     नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
     न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ २३॥

     अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च।
     नित्य सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः ॥ २४ ॥

हा अनादि नित्यसिद्धु, निरुपाधि विशुद्धु।
म्हणऊनि शस्त्रादिकीं छेदु, न घडे यया ॥ १४५ ॥

     अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते।
     तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि ॥ २५ ॥

हा प्रळयोदके नाप्लवे, अग्निदाहो न संभवे।
एथ महाशोषु न प्रभवे, मारुताचा ॥ १४६ ॥

अर्जुना हा नित्यु, अचळु हा शाश्वतु।
सर्वत्र सदोदितु, परिपूर्णु हा ॥ १४७ ॥

हा तर्काचिये दिठी, गोचर नोहे किरिटी।
ध्यान याचिये भेटी, उत्कंठा वाहे ॥ १४८ ॥

हा सदा दुर्लभु मना, आपु नोहे साधना।
निःसीमु हा अर्जुना, पुरुषोत्तमु ॥ १४९ ॥

हा गुणत्रयरहितु, व्यक्तीसी अतीतु।
अनादि अविकृतु, सर्वरूप ॥ १५० ॥

अर्जुना ऐसा जाणावा, हा सकळात्मकु देखावा।
मग सहजे शोकु आघवा, हरेल तुझा ॥ १५१ ॥

     अथ चैनं नित्यजात नित्यं वा मन्यसे मृतं।
     तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि ॥ २६ ॥

अथवा ऐसा नेणसी, तूं अंतवंतचि हें मानिसी।
तर्हीऐ शोचूं न पवसी, पंडुकुमरा ॥ १५२ ॥

जे आदि-स्थिती- अंतु, हा निरंतर असे नित्यु।
जैसा प्रवाहो अनुस्यूतु, गंगाजळाचा ॥ १५३ ॥

तें आदि नाहीं खंडले, समुद्रीं तरी असे मिनलें।
आणि जातचि मध्यें उरले, दिसे जैसें ॥ १५४॥

इये तिन्हीं तयापरी, सरसींच सदा अवधारीं।
भूतांसी कवणीं अवसरीं, ठाकती ना ॥ १५५ ॥

म्हणोनि हे आघवें, एथ तुज न लगे शोचावें।
जे स्थितीची हे स्वभावें, अनादि ऐसी ॥ १५६ ॥

ना तरी हे अर्जुना, न येचि तुझिया मना।
जे देखोनि लोकु अधीना, जन्मक्षया ॥ १५७ ॥

तरी येथ कांही, तुज शोकासि कारण नाहीं।
जे जन्ममृत्यु हे पाहीं, अपरिहर ॥ १५८ ॥

     जातस्य हि धृवो मृत्युर्धृवं जन्म मृतस्य च।
     तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥ २७ ॥

उपजे तें नाशे, नाशलें पुनरपि दिसे।
हें घटिकायंत्र तैसें, परिभ्रमे गा ॥ १५९ ॥

ना तरी उदो अस्तु आपैसे, अखंडित होत जात जैसें।
हें जन्ममरण तैसें, अनिवार जगीं ॥ १६० ॥

महाप्रळय अवसरे, हें त्रैलोक्यही संहरे।
म्हणोनि हा परिहरे, आदि अंतु ॥ १६१ ॥

तूं जरी हे ऐसें मानसी, तरी खेदु कां करिसी।
काय जाणतचि नेणसी, धनुर्धरा ॥ १६२ ॥

एथ आणिकही एक पार्था, तुज बहुतीं परी पाहतां।
दुःख करावया सर्वथा, विषो नाहीं ॥ १६३ ॥

     अव्यक्तादिनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत।
     अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ॥ २८ ॥

जें समस्तें इयें भूते, जन्मा आदि अमूर्ते।
मग पातलीं व्यक्तीतें, जन्मलेया ॥ १६४ ॥

तियें क्षयासि जेथ जाती, तेथ निभ्रांत आने नव्हती।
देखें पूर्व स्थितीच येती, आपुलिये ॥ १६५ ॥

येर मध्यें जें प्रतिभासे, तें निद्रिता स्वप्न जैसें।
तैसा आकारु हा मायावशें, सत्स्वरूपीं ॥ १६६ ॥

ना तरी पवनें स्पर्शिलें नीर, पढियासे तरंगाकार।
का परापेक्षा अळकांर-, व्यक्ति कनकीं ॥ १६७ ॥

तैसें सकळ हें मूर्त, जाण पां मायाकारित।
जैसें आकाशीं बिंबत, अभ्रपटल ॥ १६८ ॥

तैसें आदीचि जें नाही, तयालागीं तूं रुदसि कायी।
तूं अवीट तें पाहीं, चैतन्य एक ॥ १६९ ॥

जयाचि आर्तीचि भोगित, विषयी त्यजिले संत।
जयालागीं विरक्त, वनवासिये ॥ १७० ॥

दिठी सूनि जयातें, ब्रह्मचर्यादि व्रतें।
मुनीश्वर तयातें आचरताती ॥ १७१ ॥

     आश्चर्यवत् पश्चति कश्चिदेनमाश्चर्यवद् वदति तथैव चान्यः।
     आश्चर्यवत् चैनमन्यः शृणोति, शृत्वाऽप्येनं वेद न चैव कश्चित् ॥ २९ ॥

एक अंतरी निश्चळ, जें निहाळितां केवळ।
विसरले सकळ, संसारजात ॥ १७२ ॥

एकां गुणानुवादु करितां, उपरती होऊनि चिता।
निरवधि तल्लीनता, निरंतर ॥ १७३ ॥

एक ऐकतांचि निवाले, ते देहभावीं सांडले।
एक अनुभवें पातले, तद्रुपता ॥ १७४ ॥

जैसा सरिता ओघ समस्त, समुद्रामाजिं मिळत।
परी माघौते न समात, परतले नाहीं ॥ १७५ ॥

तैसिया योगीश्वरांचिया मती, मिळणीसवें एकवटती।
परी जे विचारूनि पुनरावृत्ति, भजतीचिना ॥ १७६ ॥

     देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत।
     तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि ॥ ३० ॥

जें सर्वत्र सर्वही देहीं, जया करितांही घातु नाहीं।
तें विश्वात्मक तूं पाहीं, चैतन्य एक ॥ १७७ ॥

याचेनिचि स्वभावें, हें होत जात आघवें।
तरी सांग काय शोचावें, एथ तुवां ॥ १७८ ॥

एर्हसवीं तरी पार्था, तुज कां नेणों न मनें चित्ता।
परी किडाळ हें शोचितां, बहुतीं परीं ॥ १७९ ॥

     स्वधर्मपि चावेक्ष्य न विकंपितुमर्हसि।
     धर्म्याद्धि युद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते ॥ ३१ ॥

तूं अझुनि कां न विचारिसी, काय हें चिंतितु आहासी।
स्वधर्मु तो विसरलासी, तरावें जेणें ॥ १८० ॥

या कौरवां भलतें जाहलें, अथवा तुजचि कांही पातलें।
कीं युगचि हें बुडालें, जर्हीं एथ ॥ १८१ ॥

तरी स्वधर्मु एक आहे, तो सर्वथा त्याज्य नोहे।
मग तरिजेल काय पाहे, कृपाळुपणें ॥ १८२ ॥

अर्जुना तुझें चित्त, जर्हीु जाहलें द्रवीभूत।
तर्हीन हें अनुचित, संग्रामसमयीं ॥ १८३ ॥

अगा गोक्षीर जरी जाहलें, तरी पथ्यासि नाही म्हणितलें।
ऐसेनिहि विष होय सुदलें, नवज्वरीं देतां ॥ १८४ ॥

तैसे आनीं आन करितां, नाशु होईल हिता।
म्हणऊनि तूं आतां, सावध होई ॥ १८५ ॥

वायांचि व्याकुळ कायी, आपुला निजधर्मु पाहीं।
जो आचरिता बाधु नाहीं, कवणे काळीं ॥ १८६ ॥

जैसें मार्गेंचि चालतां, अपावो न पवे सर्वथा।
कां दीपाधारें वर्ततां, नाडळिजे ॥ १८७ ॥

म्हणोनि यालागीं पाहीं, तुम्हां क्षत्रियां आणीक कांही।
संग्रामावांचूनि नाहीं, उचित जाणें ॥ १८९ ॥

निष्कपटा होआवें, उसिणा घाई जुंझावें।
हें असो काय सांगावे, प्रत्यक्षावरी ॥ १९० ॥

     यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृत्तम्।
     सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभंते युद्धमीदृशम् ॥ ३२ ॥

अर्जुना झुंज देखें आतांचें, हें हो काय दैव तुमचे।
कीं निधान सकळ धर्माचें, प्रगटले असे ॥ १९१ ॥

हा संग्रामु काय म्हणिपे, कीं स्वर्गुचि येणें रूपें।
मूर्त कां प्रतापे, उदो केला ॥ १९२ ॥

ना तरी गुणाचेनि पतिकरें, आर्तिंचेनि पडिभरें।
हें कीर्तीचि स्वयंवरे, आली तुज ॥ १९३ ॥

क्षत्रियें बहुत पुण्य कीजे, तें झुंज ऐसें हें लाहिजे।
जैसें मार्गें जातां आडळिजे, चिंतामणीसी ॥ १९४ ॥

ना तरी जांभया पसरे मुख, तेथ अवचटें पडे पीयूख।
तैसा संग्रामु हा देख, पातला असे ॥ १९५ ॥

     अथ चेत् त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि।
     ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्यसिं ॥ ३३ ॥

आतां हा ऐसा अव्हेरिजे, मग नाथिले शोचूं बैसिजे।
तरी आपण आहाणा होईजे, आपणपेयां ॥ १९६ ॥

पूर्वजांचे जोडलें, आपणचि होय धाडिलें।
जरी आजि शस्त्र सांडिले, रणीं इये ॥ १९७ ॥

असती कीर्ति जाईल, जग अभिशापु देईल।
आणि गिंवसित पावतील, महादोष ॥ १९८ ॥

जैसी भ्रतारेहीन वनिता, उपहृती पावे सर्वथा।
तैशी दशा जीविता, स्वधर्मेंवीण ॥ १९९ ॥

ना तरी रणीं शव सांडिजे, तें चौमेरीं गिधीं विदारिजे।
तैसे स्वधर्महीन अभिभविजे, महादोषी ॥ २०० ॥

     अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यंति तेऽव्याम्।
     संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते ॥ ३४ ॥

म्हणोनि स्वधर्म हा सांडसील, तरी पापा वरपडा होसील।
आणि अपेश तें न वचेल, कल्पांतावरी ॥ २०१ ॥

जाणतेनि तंवचि जियावे, जंव अपकीर्ति आंगा न पवे।
आणि सांग पां केवी निगावें, एथोनियां ॥ २०२ ॥

तूं निर्मत्सरु सदयता, येथूनि निघसी कीर माघौता।
परी ते गति समस्तां, न मनेल ययां ॥ २०३ ॥

हें चहूंकडून वेढितील, बाणवरी घेतील।
तेथ पार्था न सुटिजेल, कृपाळुपणे ॥ २०४ ॥

ऐसेनिही प्राण्संकटे, जरी विपायें पां निघणें घटे।
तरी तें जियालेंही वोखटें, मरणाहुनी ॥ २०५ ॥

     भयाद् रणादुपरं मंस्यते त्वां महारथाः।
     येषां त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् ॥ ३५ ॥

तूं आणिकही एक न विचारिसी, एथ संभ्रमे झुंजो आलासी।
आणि सकणवपणे निघालासी, मागुता जरी ॥ २०६ ॥

तरी तुझें तें अर्जुना, या वैरियां दुर्जनां
कां प्रत्यया येईल मना, सांगे मज ॥ २०६ ॥

     अवाच्यवादांश्च बहून् वदिष्यंति तवाहिताः।
     निंदंतस्तव सामर्थ्य ततो दुःखतरं नु किम् ॥ ३६ ॥

हे म्हणतील गेला रे गेला, अर्जुन आम्हां बिहाला।
हा सांगें बोलु उरला, निका कायी ॥ २०८ ॥

लोक सायासें करूनि बहुतें, कां वेंचिती आपुली जीवितें।
परी वाढविती कीर्तीतें, धनुर्धरा ॥ २०९ ॥

ते तुज अनायसें, अनकळित जोडिली असे।
हें अद्वितीय जैसें, गगन आहे ॥ २१० ॥

तैसी कीर्ती निःसीम, तुझां ठायीं निरुपम।
तुझे गुण उत्तम, तिहीं लोकीं ॥ २११॥

दिगंतीचे भूपति, भाट होऊनि वाखाणिती।
जे ऐकिलिया दचकती, कृतांतादिक ॥ २१२ ॥

ऐसा महिमा घनवट, गंगा तैसी चोखट।
जयां देखी जगीं सुभट, वांठ जाहली ॥ २१३ ॥

ते पौरुष तुझें अद्भुत, आइकोनियां हे समस्त।
जाहले आथि विरक्त, जीवितेंसी ॥ २१४ ॥

जैसा सिंहाचिया हांका, युगांतु होय मदमुखा।
तैसा कौरवां अशेखां, धाकु तुझा॥ २१५ ॥

जैसे पर्वत वज्रांते, ना तरी सर्प गरुडातें।
तैसा अर्जुना हे तूंते, मानिती सदा ॥ २१६ ॥

ते अगाधपण जाईल, मग हिणावो अंगा येईल।
जरी मागुता निघसील, न झुंजतचि ॥ २१७ ॥

आणि हे पळतां पळों नेदिती, धरूनि अवकळा करिती।
न गणित कुटी बोलती, आइकतां तुज ॥ २१८ ॥

मग ते वेळी हियें फुटावें, आंता लाठेपणे कां न झुंजावे।
हें जिंतले तरी भोगावें, पृथ्वीतल ॥ २१९ ॥

     हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्षसे महीम्।
     तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥ ३७ ॥

ना तरी रणीं एथ, झुंजतां वेंचलें जीवित।
तरी स्वर्गसुख अनकळित, पावसील ॥ २२० ॥

म्हणोनि ये गोठी, विचारु न करीं किरिटी।
आतां धनुष्य घेऊनि उठी, झुंजें वेगीं ॥ २२१ ॥

देखें स्वधर्मु हा आचरतां, दोषु नासे असता।
तुज भ्रांति हे कवण चित्ता, एथ पातकाची ॥ २२२ ॥

सांगे प्लवेंचि काय बुडिजे, कां मार्गीं जातां आडळिजे।
परी विपायें चालो नेणिजे, तरी तेंही घडे ॥ २२३ ॥

अमृतें तरीचि मरीजे, जरी विखेंसी सेवीजे।
तैसा स्वधर्में दोषु पाविजे, हेतुकपणे ॥ २२४ ॥

म्हणोनि तुज पार्था, हेतु सांडोनि सर्वथा।
क्षात्रवृत्ती झुंजतां, पाप नाही ॥ २२५ ॥

     सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ।
     ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ॥ ३८ ॥

सुखीं संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावें।
आणि लाभालाभ न धरावे, मनामाजीं ॥ २२६ ॥

एथ विजयपण होईल, कां सर्वथा देह जाईल।
हें आधींचि कांही पुढील, चिंतावेना ॥ २२७ ॥

आपणयां उचिता, स्वधर्मातेंचि रहाटतां।
जे पावें तें निवांता, साहोनि जावें ॥ २२८ ॥

ऐसेया मनें होआवें, तरी दोषु न घडे स्वभावें।
म्हणोनि आतां झुंजावें, निभ्रांत तुवां ॥ २२९ ॥

     एषाऽतेभिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु।
     बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि ॥ ३९ ॥

हे सांख्यस्थिति मुकुलित, सांगितली तुज एथ।
आतां बुद्धियोगु निश्चित, अवधारीं पां ॥ २३० ॥

जया बुद्धियुक्ता, आहालिया पार्था।
कर्मबंधु सर्वथा, बांधू न पावे ॥ २३१ ॥

जैसे वज्रकवच लेईजे, मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे।
परी जैतेंसी उरिजे, अचुंबिता ॥ २३२ ॥

     नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते।
     स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् ॥ ४० ॥

तैसें ऐहिक तरी न नशे, आणि मोक्षु तो उरला असे।
जेथ पूर्वानुक्रम दिसे, चोखाळत ॥ २३३ ॥

कर्माधारे राहाटिजे, परी कर्मफळ न निरीक्षिजे।
जैसा मंत्रज्ञु न बधिजे, भूतबाधा ॥ २३४ ॥

तियापरी जे सुबुद्धि, आपुलाल्या निरवधि।
हां असतांचि उपाधि, आंकळू न सके ॥ २३५ ॥

जेथ न संचरे पुण्यपाप, जे सूक्ष्म अति निष्कंप।
गुणत्रयादि लेप, न लगती जेथ ॥ २३६ ॥

अर्जुना ते पुण्यवशें, जरी अल्पचि हृदयीं बुद्धि प्रकाशे।
तरी अशेषही नाशे, संसारभय ॥ २३७ ॥

     व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन।
     बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयोऽव्यवस्थिताम् ॥ ४१ ॥

जैसी दीपकळिका धाकुटी, परी बहु तेजातें प्रगटी।
तरी सद्बुद्धि हे थेकुटी, म्हणों नये ॥ २३८ ॥

पार्था बहुतीं परी, हे अपेक्षिजे विचारशूरी।
जे दुर्लभ चराचरीं, सद्वासना ॥ २३९ ॥

आणिकासारिखा बहुवसु, जैसा न जोडे परिसु।
कां अमृताचा लेशु, दैवगुणें ॥ २४० ॥

तैसी दुर्लभ जे सद्बुद्धि, जिये परमात्माचि अवधि।
जैसा गंगेसी उदधि, निरंतर ॥ २४१ ॥

तैसी ईश्वरावांचूनि कांही, जिये आणिक लाणी नाहीं।
ते एकचि बुद्धि पाहीं, अर्जुना जगीं ॥ २४२ ॥

येरी ते दुर्मति, जे बहुधा असे विकरती।
तेथ निरंतर रमती, अविवेकिये ॥ २४३ ॥

म्हणोनि तया पार्था, स्वर्ग संसार नरकावस्था।
आत्मसुख सर्वथा, दृष्ट नाहीं ॥ २४४ ॥

     यामिनां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः।
     वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः ॥ ४२ ॥

वेदाधारें बोलती, केवळ कर्म प्रतिष्ठिती।
परी कर्मफळीं आसक्ती, धरूनियां ॥ २४५ ॥

म्हणती संसारी जन्मिजे, यज्ञादि कर्म कीजें।
मग स्वर्गसुख भोगिजे, मनोहर ॥ २४६ ॥

एथ हें वांचूनि कांही, आणिक सर्वथा सुखचि नाही।
ऐसें अर्जुना बोलती पाहीं, दुर्बुद्धि ते ॥ २४७ ॥

     कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम्।
     क्रियाविषेश्बहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति ॥ ४३ ॥

देखें कामना अभिभूत, होऊनि कर्में आचरत।
ते केवळ भोगीं चित्त, देऊनियां ॥ २४८ ॥

क्रियाविशेषें बहुतें, न लोपितीं विधीतें।
निपुण होऊनि धर्मातें, अनुष्ठिती ॥ २४९ ॥

     भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसाम्।
     व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते ॥ ४४ ॥

परि एकचि कुडें करिती, जे स्वर्गकामु मनीं धरिती।
यज्ञपुरुषा चुकती, भोक्ता जो ॥ २५० ॥

जैसा कर्पुराचा राशि कीजे, मग अग्नि लाऊनि दीजे।
कां मिष्टानीं संचरविजे, काळकूट ॥ २५१ ॥

दैवें अमृतकुंभ जोडला, तो पायें हाणोनि उलंडिला।
तैसा नासिती धर्म निपजला, हेतुकपणें ॥ २५२ ॥

सायासें पुण्य अर्जिजे, मग संसारु का अपेक्षिजे।
परी नेणती ते काय कीजे, अप्राप्त देखें ॥ २५३ ॥

जैसे रांधवणी रससोय निकी, करुनियां मोले विकी।
तैसा भोगासाठी अविवेकी, धाडिती धर्मु ॥ २५४ ॥

म्हणोनि हे पार्था, दुर्बुद्धि देख सर्वथा।
तयां वेदवादरतां, मनीं वसे ॥ २५५ ॥

     त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन।
     निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ॥ ४५ ॥

तिन्हीं गुणीं आवृत्त, हे वेद जाणे निभ्रांत।
म्हणोनि उपनिषदादि समस्त, सात्विक ते ॥ २५६ ॥

येर रजतमात्मक, जेथ निरुपिजे कर्मादिक।
जे केवळ स्वर्गसूचक, धनुर्धरा ॥ २५७ ॥

म्हणोनि तूं जाण, हे सुखदुःखासीच कारण।
एथ झणे अंतःकरण, रिगों देसी ॥ २५८ ॥

तूं गुणत्रयातें अव्हेरीं, मी माझें हें न करीं।
एक आत्मसुख अंतरी, विसंब झणीं ॥ २५९ ॥

     यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके।
     तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः ॥ ४६ ॥

जरी वेदें बहुत बोललें, विविध भेद सूचिले।
तर्हीे आपण हित आपुलें, तेंचि घेपे ॥ २६० ॥

जैसा प्रगटलिया गभस्ती, अशेषही मार्ग दिसती।
तरी तेतुलेही काय चालिजती, सांगे मज ॥ २६१ ॥

का उदकमय सकळ, जर्ही जाहलें असे महीतळ।
तरी आपण घेपे केवळ, आर्तीचजोगें ॥ २६२ ॥

तैसे ज्ञानिये जे होती, ते वेदार्थाते विवरिती।
मग अपेक्षित तें स्वीकारिती, शाश्वत जें ॥ २६३ ॥

     कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
     मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥ ४७ ॥

म्हणौनि आइकें पार्था, याचिवरी पाहतां।
तुज उचित होय आतां, स्वकर्म हें ॥ २६४ ॥

आम्हीं समस्तही विचारिलें, तंव ऐसेंचि हें मना आलें।
जे न संडिजे तुवा आपुलें, विहित कर्म ॥ २६५ ॥

परी कर्मफळीं आस न करावी, आणि कुकर्मी संगति न व्हावी।
हे सत्क्रियाचि आचरावी, हेतूविण ॥ २६६ ॥

     योगस्थ कुरू कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय।
     सिद्ध्यसिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥ ४८ ॥

तूं योगयुक्त होऊनी, फळाचा संग सांडुनी।
मग अर्जुना चित्त देऊनी, करीं कर्में ॥ २६७ ॥

परी आदरिले कर्म दैवें, जरी समाप्तीतें पावे।
तरी विशेषें तेथ तोषावें, हेही नको ॥ २६८ ॥

कां निमित्तें कोणे एकें, तें सिद्धी न वचतां ठाकें।
तरी तेथिंचेनि अपरितोखें, क्षोभावें ना ॥ २६९ ॥

आचरता सिद्धी गेलें, तरी काजाचि कीर आलें।
परी ठेलियाही सगुण जहालें, ऐसेंचि मानीं ॥ २७० ॥

देखें जेतुलालें कर्म निपजे, तेतुलें आदिपुरुषीं जरी अर्पिजे।
तरी परीपूर्ण सहजें, जहालें जाणे ॥ २७१ ॥

देखें संतासंती कर्मीं, हें जे सरिसेपण मनोधर्मीं।
तेचि योगस्थिति उत्तमीं, प्रशंसिजे ॥ २७२ ॥

     दूरेण ह्यत्वरं कर्म बुद्धियोगाद्धनंजय।
     बुद्धौ शरणमन्विछ कृपणाः फलहेतवः ॥ ४९ ॥

     बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत्दुष्कृते।
     तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलं ॥ ५० ॥

अर्जुना समत्व चित्ताचें, तेचिं सार जाण योगाचें।
जेथ मना आणि बुद्धीचें, ऐक्य आथी ॥ २७३ ॥

तो बुद्धियोग विवरितां, बहुतें पाडे पार्था।
दिसे हा अरुता, कर्मभागु ॥ २७४ ॥

परि तेंचि कर्म आचरिजे, तरीच हा योगु पाविजे।
जें कर्मशेष सहजे, योगस्थिति ॥ २७५ ॥

म्हणोनि बुद्धियोगु सधरु, तेथ अर्जुना होई स्थिरु।
मनिं करी अव्हेरु, फळहेतूचा ॥ २७६ ॥

जे बुद्धियोगा योजिले, तेचि पारंगत जाहले।
इहीं उभय संबंधी सांडिले, पापपुण्यीं ॥ २७७ ॥

     कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः।
     जन्मबंधविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम् ॥ ५१ ॥

ते कर्मी तरी वर्तती, परी कर्मफळा नातळती।
आणि यातायाति लोपती, अर्जुना तयां ॥ २७८ ॥

मग निरामयभरित, पावती पद अच्युत।
ते बुद्धियोगयुक्त, धनुर्धरा ॥ २७९ ॥

     यदा ते मोहकलिलं बुद्धुर्व्यतितरिष्यति।
     तदा गंतासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च ॥ ५२ ॥

तूं ऐसा तैं होसी, जैं मोहातें या सांडिसी।
आणि वैराग्य मानसीं, संचरेल ॥ २८० ॥

मग निष्कळंक गहन, उपजेल आत्मज्ञान।
तेणे निचाडें होईल मन, अपैसें तुझे ॥ २८१ ॥

तेथ आणिक कांही जाणावे, कां मागिलातें स्मरावें।
हें अर्जुनां आघवें, पारुषेल ॥ २८२ ॥

     श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला।
     समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि ॥ ५३ ॥

इंद्रियांचिया संगती, जिये पसरु असे मती।
ते स्थिर होईल मागुती, आत्मस्वरूपीं ॥ २८३ ॥

समाधिसुखीं केवळ, जैं बुद्धि होईल निश्चळ।
तैं पावसी तूं सकळ, योगस्थिति ॥ २८४ ॥

     अर्जुन उवाच: स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव।
     स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत ब्रजेत किम् ॥ ५४ ॥

तेथ अर्जुन म्हणे देवा, हाचि अभिप्रावो आघवा।
मी पुसेन आतां सांगावा, कृपानिधि ॥ २८५ ॥

मग अच्युत म्हणे सुखें, जें किरीटी तुज निकें।
तें पूस पां उन्मेखें, मनाचेनि ॥ २८६ ॥

या बोला पार्थें, म्हणितलें सांग पां श्रीकृष्णातें।
काय म्हणिपे स्थितप्रज्ञातें, वोळखों केवीं ॥ २८७ ॥

आणि स्थिरबुद्धि जो म्हणिजे, तो कैसां चिन्हीं जाणिजे।
जो समाधिसुख भुंजिजे, अखंडित ॥ २८८ ॥

तो कवणे स्थिती असे, कैसेनि रूपी विलसे।
देवा सांगावें हें ऐसें, लक्ष्मीपती ॥ २८९ ॥

तव परब्रह्मअवतरणु, जो षड्गुणाधिकरणु।
तो काय तेथ नारायणु, बोलतु असे ॥ २९० ॥

     श्रीभगवानुवाच: प्रजहाति यदा कामान् सर्वान्पार्थ मनोगतान्।
                आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते ॥ ५५ ॥

म्हणे अर्जुना परियेसीं, हा अभिलाषु प्रौढ मानसीं।
तो अंतराय स्वसुखेसीं, करीत असे ॥ २९१ ॥

जो सर्वदा नित्यतृप्तु, अंतःकरणभरितु।
परि विषयामाजि पतितु, जेणें संगे कीजे ॥ २९२ ॥

तो कामु सर्वथा जाये, जयाचे आत्मतोषीं मन राहें।
तोचि स्थितप्रज्ञु होये, पुरुष जाणे ॥ २९३ ॥

     दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः।
     वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनीरुच्यते ॥ ५६ ॥

नाना दुःखी प्राप्तीं, जयासी उद्वेगु नाहीं चित्तीं।
आणि सुखाचिया आर्ती, अडपैजेना ॥ २९४ ॥

अर्जुना तयाचां ठायीं, कामक्रोधु सहजें नाहीं।
आणि भयातें नेणें कहीं, परिपूर्ण तो ॥ २९५ ॥

ऐसा जो निरवधि, तो जाण पां स्थिरबुद्धि।
जो निरसूनि उपाधि, भेदरहितु ॥ २९६ ॥

     यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम्।
     नाभिननंदंति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ५७ ॥

जो सर्वत्रा सदा सरिसा, परिपूर्ण चंद्रु कां जैसा।
अधमोत्तम प्रकाशा -, माजीं न म्हणे ॥ २९७ ॥

ऐसी अनवच्छिन्न समता, भूतामत्रीं सदयता।
आणि पालटु नाहीं चित्ता, कवणे वेळे ॥ २९८ ॥

गोमटें कांही पावे, तेणे संतोषें तेणें नाभिभवे।
जो ओखटेनि नागवे, विषादासी ॥ २९९ ॥

ऐसा हरिखशोकरहितु, जो आत्मबोधभरितु।
तो पां जाण प्रज्ञायुक्तु, धनुर्धरा ॥ ३०० ॥

     यदा संहरते चायं कूर्मोऽङगानीव सर्वशः।
     इंद्रियाणींद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ५८ ॥

कां कूर्म जियापरी, उवाइला अवेव पसरी।
ना इच्छावशें आवरी, आपुले आपण ॥ ३०१ ॥

तैसीं इंद्रिये आपैतीं होतीं, जयाचें म्हणितलें करिती।
तयाची प्रज्ञा जाण स्थिती, पातलीं असे ॥ ३०२ ॥

     विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः।
     रसवर्ज्यं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते ॥ ५९ ॥

आतां अर्जुना आणिकही एक, सांगेन ऐकें कवतिक।
या विषयांते साधक, त्यजिती नियमें ॥ ३०३ ॥

श्रोत्रादि इंद्रिये आवरती, परि रसने नियमु न करिती।
ते सहस्रधा कवळिजती, विषयीं इहीं ॥ ३०४ ॥

जैसी वरिवरि पालवी खुडिजे, आणि मुळीं उदक घालिजे।
तरी कैसेनि नाशु निपजे, तया वृक्षा ॥ ३०५ ॥

तो उदकाचेनि बळें अधिकें, जैसा आडवोनि आंगे फांके।
तैसा मानसी विषो पोखे, रसनाद्वारें ॥ ३०६ ॥

येरां इंद्रिया विषय तुटे, तैसा नियमूं न ये रस हटें।
जे जीवन हें न घटे, येणेंविण ॥ ३०७ ॥

मग अर्जुना स्वभावे, ऐसियाही नियमातें पावे।
जैं परब्रह्म अनुभवें, होऊनि जाईजे ॥ ३०८ ॥

तैं शरीरभाव नासती, इंद्रिये विषय विसरती।
सोहंभावप्रतीति, प्रकट होय ॥ ३०९ ॥

     यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः।
     इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥ ६० ॥

येर्हरवीं तरी अर्जुना, हें आया नये साधना।
जे रहाटताती जतना, निरंतर ॥ ३१० ॥

जयातें अभ्यासाची घरटी, यमनियमांची ताटी।
जे मनाते सदा मुठी, धरूनि आहाती ॥ ३११ ॥

तेही किजती कासाविसी, या इंद्रियांची प्रौढी ऐसी।
जैसी मंत्रज्ञातें विवसी, भुलवी कां ॥ ३१२ ॥

देखे विषय हे तैसे, पावती ऋद्धिसिद्धीचेनि मिषें।
मग आकळती स्पर्शें , इंद्रियांचेनि ॥ ३१३ ॥

तिये संधी मन जाये, मग अभ्यासां ठोठावलें ठाये।
ऐसें बळकटपण आहे, इंद्रियांचे ॥ ३१४ ॥

     तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः।
     वशे हि यस्येंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ६१ ॥

म्हणोनि आइकें पार्था, यांते निर्दळी जो सर्वथा।
सर्व विषयीं आस्था, सांडूनिया ॥ ३१५ ॥

तोचि तूं जाण, योगनिष्ठेसी कारण।
जयाचे विषयसुखे, अंतःकरण झकवेना ॥ ३१६ ॥

जो आत्मबोधयुक्तु, होऊनि असे सततु।
जो मातें हृदयाआंतु, विसंबेना ॥ ३१७ ॥

एर्हावीं बाह्य विषय तरी नाहीं, परी मानसीं होईल जरी कांही।
तरी साद्यंतुचि हा पाहीं, संसारु असे ॥ ३१८ ॥

जैसा कां विषाचा लेशु, घेतलिया होय बहुवसु।
मग निभ्रांत करी नाशु, जीवितासी ॥ ३१९ ॥

तैसी या विषयांची शंका, मनीं वसती देखा।
घातु करी अशेखा, विवेकजाता ॥ ३२० ॥

     ध्यायतो विषयान्पुंसः सङगस्तेषूपजायते।
     सङगात्संजायते कामः कामात्क्रोधोभिजायते ॥ ६२ ॥

     क्रोधाद् भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः।
     स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥ ६३ ॥

जरी हृदयीं विषय स्मरती, तरी निसंगाही आपजे संगती।
संगी प्रगटे मूर्ति, अभिलाषाची ॥ ३२१ ॥

जेथ कामु उपजला, तेथ क्रोधु आधींचि आला।
क्रोधीं असे ठेविला, संमोह जाणे ॥ ३२२ ॥

संमोहा जालिया व्यक्ति, तरी नाशु पावे स्मृति।
चंडवातें ज्योति, आहत जैसी ॥ ३२३ ॥

कां अस्तमानीं निशी, जैसी सूर्यतेजातें ग्रासी।
तैसी दशा स्मृतिभ्रंशीं, प्राणियांसी ॥ ३२४ ॥

नग अज्ञानांध केवळ, तेणे आप्लविजे सकळ।
तेथ बुद्धि होय व्याकुळ, हृदयामाजीं ॥ ३२५ ॥

जैसें जात्यंधा पळणी पावे, मग ते काकुळती सैरा धांवे।
तैसे बुद्धीसि होती भवें, धनुर्धरा ॥ ३२६ ॥

ऐसा स्मृतिभ्रंशु घडे, मग सर्वथा बुद्धि अवघडे।
तेथ समूळ हें उपडे, ज्ञानजात ॥ ३२७ ॥

चैतन्याचां भ्रंशी, शरीरा दशा जैशी।
पुरुषा बुद्धिनाशीं, होय देखें ॥ ३२८ ॥

म्हणोनि आइकें अर्जुना, जैसा विस्फुल्लिंग लागे इंधना।
मग प्रौढ जालिया त्रिभुवना, पुरों शके ॥ ३२९ ॥

तैसें विषयांचे ध्यान, जरी विपायें वाहे मन।
तरी येसणे हें पतन, गिंवसीत पावे ॥ ३३० ॥

     रागद्वेषवियुकतैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन्।
     आत्मवशैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥ ६४ ॥

म्हणोनि विषय हे आघवे, सर्वथा मनौनि सांडावे।
मग रागद्वेष स्वभावें, नाशतील ॥ ३३१ ॥

पार्था आणिकही एक, जरी नाशिले रागद्वेष।
तरी इंद्रियां विषयीं बाधक, रमतां नाही ॥ ३३२ ॥

जैसा सूर्य आकाशगतु, रश्मिकरीं जगातें स्पर्शतु।
तरी संगदोषें काय लिंपतु, तेथिंचेनि ॥ ३३३ ॥

तैसा इंद्रियार्थी उदासीन, आत्मरसेंचि निर्भिन्न।
जो कामक्रोधविहीन, होऊनि असे ॥ ३३४ ॥

तरी विषयांतुही कांही, आपणपेवाचुनि नाहीं।
मग विषय कवण कायी, बाधीतील कवणा ॥ ३३५ ॥

जरी उदकें उदकीं बुडीजे, कां अग्नि आगी पोळिजे।
तरीं विषयसंगे आप्लविजे, परिपूर्ण तो ॥ ३३६ ॥

ऐसा आपणचि केवळ, होऊनि असे निखळ।
तयाचि प्रज्ञा अचळ, निभ्रांत मानीं ॥ ३३७ ॥

     प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते।
     प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते ॥ ६५ ॥

देखें अखंडित प्रसन्नता, आथी जेथ चित्ता।
तेथे रिगणें नाहीं समस्तां, संसारदुःखां ॥ ३३८ ॥

जैसा अमृताचा निर्झरु, प्रसवे जयाचा जठरु।
तया क्षुधेतृष्णेचा अडदरु, कहींचि नाहीं ॥ ३३९ ॥

तैसें हृदय प्रसन्न होये, तरी दुःख कैचें कें आहे।
तेथ बुद्धि आपैसी राहे, परमात्मरूपीं ॥ ३४० ॥

जैसा निर्वातीचा दीपु, सर्वथा नेणे कंपु।
तैसा स्थिरबुद्धि स्वस्वरूपु , योगयुक्तु ॥ ३४१ ॥

     नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना।
     न चाभावयतः शांतिरशांतस्य कुतः सुखम् ॥ ६६ ॥

ये युक्तीचि कडसणी, नाहीं जयाचां अंतःकरणीं।
तो आकळिलां जाण गुणीं, विषयादिकीं ॥ ३४२ ॥

तया स्थिरबुद्धि पार्था, कहीं नाहीं सर्वथा।
आणि स्थैर्याची आस्था, तेही नुपजे ॥ ३४३ ॥

निश्चळत्वाची भावना, जरी नव्हेचि देखें मना।
तरी शांति केवी अर्जुना, आपु होय ॥ ३४४ ॥

आणि जेथ शांतिचा जिव्हाळा नाहीं, तेथ सुख विसरोनि न रिगे कहीं।
जैसा पापियाचां ठायीं, मोक्षु न वसे ॥ ३४५ ॥

देखें अग्निमाजी धापती, तियें बीजें जरी विरुढती।
तरी अशांत सुखप्राप्ती, घडों शके ॥ ३४६ ॥

म्हणोनि अयुक्तपण मनाचे, तेंचि सर्वस्व दुःखाचें।
या कारणें इंद्रियांचें, दमन निकें ॥ ३४७ ॥

     इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोऽनुविधीयते।
     तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि ॥ ६७ ॥

ये इंद्रियें जें जें म्हणती, तें तेंचि जे पुरुष करिती।
ते तरलेचि न तरिती, विषयसिंधु ॥ ३४८ ॥

जैसी नाव थडिये ठाकितां, जरी वरपडी होय दुर्वाता।
तरी चुकलाही मागौता, अपावो पावे ॥ ३४९ ॥

तैसी प्राप्तेंही पुरुषें, इंद्रियें लाळिलीं जरी कौतुकें।
तरी आक्रमिला देख दुःखे, सांसारिकें ॥ ३५० ॥

     तस्माद् यस्य महाबाहो निगृहितानि सर्वशः।
     इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ६८ ॥

म्हणोनि आपुलीं आपणपेया, जरी ये इंद्रिये येती आया।
तरी अधिक कांही धनंजया, सार्थक असे ॥ ३५१ ॥

देखे कूर्म जियापरी, उवाइला अवयव पसरी।
ना तरी इच्छावशें आवरी, आपणपेंचि ॥ ३५२ ॥

तैसीं इंद्रिये आपैती होती, जयाचें म्हणितलें करिती।
तयाची प्रज्ञा जाण स्थिती, पातली असे ॥ ३५३ ॥

आता आणिक एक गहन, पूर्णाचें चिन्ह।
अर्जुना तुज सांगेन, परिस पां ॥ ३५४ ॥

     या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी।
     यस्यां जाग्रति भूतानां सा निशा पश्यतो मुनेः ॥ ६९ ॥

देखे भूतजात निदेलें, तेथेंचि जया पाहलें।
आणि जीव जेथ चेइले, तेथ निद्रित तो ॥ ३५५ ॥

तैसा तो निरुपाधि, अर्जुना तो स्थिरबुद्धि।
तोचि जाणे निरवधि, मुनीश्वर ॥ ३५६ ॥

     आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत्।
     तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी ॥ ७० ॥

पार्था आणिकही परी, तो जाणो येईल अवधारीं।
जैसी अक्षोभता सागरीं, अखंडित ॥ ३५७ ॥

जरी सरिताओघ समस्त, परिपूर्ण होऊनि मिळत।
तरी अधिक नोहे ईषत्, मर्यादा न संडी ॥३५८ ॥

ना तरी ग्रीष्मकाळीं सरिता, शोषूनि जाति समस्ता।
परी न्यून नव्हे पार्था, समुद्रु जैसा ॥ ३५९ ॥

तैसा प्राप्तीं ऋद्धिसिद्धी, तयासि क्षोभु नाहीं बुद्धी।
आणि न पवतां न बाधी, अधृति तयातें ॥ ३६० ॥

सांगे सूर्याचां घरी, प्रकाशु काय वातीवेरी।
की न लविजे तरी अंधारीं, कोंडेल तो ॥ ३६१ ॥

देखें ऋद्धिसिद्धि तयापरी, आली गेली से न करी।
तो विगुंतला असे अंतरीं, महासुखीं ॥ ३६२ ॥

जो आपुलेनि नागरपणें, इंद्रभुवनातें पाबळें म्हणे।
तो केवि रंजे पालविणें, भिल्लांचेनि ॥ ३६३ ॥

जो अमृतासि ठी ठेवी, तो जैसा कांजी न सेवी।
तैसा स्वसुखानुभवी, न भोगी ऋद्धि ॥ ३६४ ॥

पार्था नवल हें पाहीं, जेथ स्वर्गसुख लेखनीय नाही।
तेथ ऋद्धिसिद्धि कायी, प्राकृता होती ॥ ३६५ ॥

     विहाय कामान्यः सर्वान्पुमांश्चरति निस्पृहः।
     निर्ममो निरहंकरः स शान्तिमधिगच्छति ॥ ७१ ॥

ऐसा आत्मबोधें तोषला, जो परमानंदें पोखला।
तोचि स्थिरप्रज्ञु भला, वोळख तूं ॥ ३६६ ॥

तो अहंकाराते दंडुनी, सकळ काम सांडोनि।
विचरे विश्व होऊनि, विश्वाचिमाजीं ॥ ३६७ ॥

     एष ब्राह्मो स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति।
     स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ॥ ७२ ॥

हे ब्रह्मस्थिती निःसीम, जे अनुभवितां निष्काम।
पातलें परब्रह्म, अनायासें ॥ ३६८ ॥

जे चिद्रूपीं मिळतां, देहांतीची व्याकुळता।
आड ठाकों न शके चित्ता, प्राज्ञा जया ॥ ३६९ ॥

तेचि हे स्थिति, स्वमुखें श्रीपति।
सांगत अर्जुनाप्रति, संजयो म्हणे ॥ ३७० ॥

ऐसे कृष्णवाक्य ऐकिलें, तेथ अर्जुने मनीं म्हणितलें।
आतां आमुचियाचि काजा आलें, उपपत्ति इया ॥ ३७१ ॥

जे कर्मजात आघवें, एथ निराकारिलें देवें।
तरी पारुषलें म्यां झुंजावें, म्हणूनियां ॥ ३७२ ॥

ऐसा श्रीअच्युताचिया बोला, चित्तीं धनुर्धरु उवायिला।
आतां प्रश्नु करील भला, आशंकोनियां ॥ ३७३ ॥

तो प्रसंगु असे नागरु, जो सकळ धर्मासि आगरु।
कीं विवेकामृतसागरु, प्रांतहीनु ॥ ३७४ ॥

जो आपणपे सर्वज्ञनाथु, निरुपिता होईल श्रीअनंतु।
ते ज्ञानदेवो सांगेल मातु, निवृत्तीदासु ॥ ३७५ ॥

॥ दुसरा अध्याय समाप्त ॥