भारत की संस्कृति के लिए... भाषा की उन्नति के लिए... साहित्य के प्रसार के लिए

ज्ञानेश्वरी / अध्याय आठवा / संत ज्ञानेश्वर

Kavita Kosh से
यहाँ जाएँ: भ्रमण, खोज

     अर्जुन उवाचः किं तद् ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम।
                अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते ॥ १ ॥

मग अर्जुनें म्हणितलें, हां हो जी अवधारिले।
जे म्यां पुसिले, ते निरूपिजो ॥ १॥

सांगा कवण तें ब्रह्म, काइसया नाम कर्म।
अथवा अध्यात्म, काय म्हणिपे ॥ २॥

अधिभूत तें कैसे, एथ अधिदैव तें कवण असे।
हें उघड मी परियेसें, तैसें बोला ॥ ३॥

     अधियज्ञः कथं कोऽत्र देहेऽस्मिन् मधुसूदन।
     प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः ॥ २ ॥

देवा अधियज्ञ तो काई, कवण पां इये देही।
हें अनुमानासि कांही, दिठी न भरे ॥ ४॥

आणि नियता अंतःकरणी, तूं जाणिजसी देहप्रयाणी।
तें कैसेनि हें शारंगपाणी, परिसवा मातें ॥ ५॥

देखा धवळारी चिंतामणीचा, जरी पहुडला होय दैवाचा।
तरी वोसणताही बोल तयाचा, परी सोपु न वचे ॥ ६॥

तैसें अर्जुनाचिया बोलासवें, आलें तेंचि म्हणितलें देवे।
परियेसें गा बरवे, जें पुसिले तुवां ॥ ७॥

किरीटी कामधेनूचा पाडा, वरी कल्पतरूचा आहे मांदोडा।
म्हणोनि मनोरथसिद्धीचिया चाडा, तो नवल नोहे ॥ ८॥

कृष्ण कोपोनि ज्यासि मारी, तो पावे परब्रह्मसाक्षात्कारी।
मा कृपेने उपदेशु करी, तो कैशापरी न पवेल ॥ ९॥

जैं कृष्णाचेया होइजे आपण, तैं कृष्ण होय आपुले अंतःकरण।
मग संकल्पाचे आंगण, वोळगती सिद्धी ॥ १०॥

परि ऐंसे जें प्रेम, अर्जुनींचि आथि निस्सीम।
म्हणऊनि तयाचे काम, सदा सफळ ॥ ११॥

या कारणे श्रीअनंते, तें मनोगत तयाचें पुसतें।
होईल जाणूनि आइतें, वोगरूनि ठेविलें ॥ १२॥

जें अपत्य थानी निगे, त्याची भूक ते मातेसीचि लागे।
एऱ्हवीं तें शब्दें काय सांगे, मग स्तन्य दे येरी ॥ १३॥

म्हणोनि कृपाळुवा गुरूचिया ठायी, हे नवल नोहे कांही।
परि तें असो आइका काई, जें देव बोलते जाहले ॥ १४॥

     अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते।
     भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञित ॥ ३॥

मग म्हणितले सर्वेश्वरें, जें आकारी इये खोंकरें।
कोंदलें असत न खिरे, कवणे काळी ॥ १५॥

एऱ्हवीं सपूरपण तयाचें पहावें, तरि शून्यचि नव्हे स्वभांवें।
वरि गगनाचेनि पालवे, गाळूनि घेतलें ॥ १६॥

जें ऐसेंही परि विरूळें, इये विज्ञानाचिये खोळे।
हालवलेंही न गळे, ते परब्रह्म ॥ १७॥

आणि आकाराचेनि जालेपणें, जन्मधर्मातें नेणे।
आकारलोपीं निमणें, नाहीं कहीं ॥ १८॥

ऐशिया आपुलियाची सहज स्थिती, जया ब्रह्माची नित्यता असती।
तया नाम सुभद्रापति, अध्यात्म गा ॥ १९॥

मग गगनी जेविं निर्मळें, नेणों कैंची एक वेळे।
उठती घनपटळे, नानावर्णे ॥२०॥

तैसे अमूर्तीं तिये विशुध्दे, महदादि भूतभेदें।
ब्रह्मांडाचे बांधे, होंचि लागती ॥ २१॥

पैं निर्विकल्पाचिये बरडी, कीं आदिसंकल्पाची फुटे विरूढी।
आणि ते सवेंचि मोडोनि ये ढोंढी, ब्रह्मगोळकांची ॥ २२॥

तया एकैकाचे भीतरीं पाहिजे, तंव बीजाचाचि भरिला देखिजे।
माजीं होतियां जातियां नेणिजे, लेख जीवां ॥ २३॥

मग तयागोळकांचे अंशांश, प्रसवती आदिसंकल्प असमसहास।
हें असो ऐसी बहुवस, सृष्टी वाढे ॥ २४॥

परि दुजेनविण एकला, परब्रह्मचि संचला।
अनेकत्वाचा आला, पूर जैसा ॥ २५॥

तैसें समविषमत्व नेणों कैचें, वांयांचि चराचर रचे।
पाहतां प्रसवतिया योनीचे, लक्ष दिसती ॥ २६॥

येरी जीवभावाचिय पालविये, कांही मर्यादा करूं नये।
पाहिजे कवण हें आघवें विये, तंव मूळ तें शून्य ॥ २७॥

म्हणूनि कर्ता मुदल न दिसे, आणि शेखीं कारणही कांही नसे।
माजीं कार्यचि आपैसें, वाढोंचि लागे ॥ २८॥

ऐसा करितेनवीण गोचरू, अव्यक्तीं हा आकारू।
निपजे जो व्यापारू, तया नाम कर्म ॥ २९॥

     अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम।
     अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर ॥ ४॥

आतां अधिभूत जें म्हणिपे, तेंहि सांगों संक्षेपें।
तरी होय आणि हारपे, अभ्र जैसें ॥ ३०॥

तैसें असतेपण आहाच, नाहीं होइजे हें साच।
जयांतें रूपा आणिती पांचपांच, मिळोनियां ॥ ३१ ॥

भूतांतें अधिकरूनि असे, आणि भूतसंयोगें तरि दिसे।
जे वियोगवेळे भ्रंशे, नामरूपादिक ॥ ३२ ॥

तयातें अधिभूत म्हणिजे, मग अधिदैवत पुरूष जाणिजे।
जेणें प्रकृतीचें भोगीजे, उपार्जिलें ॥ ३३ ॥

जो चेतनेचा चक्षु, जो इंद्रियदेशीचा अध्यक्षु।
जो देहास्तमनीं वृक्षु, संकल्पविहंगमाचा ॥ ३४ ॥

जो परमात्माचि परि दुसरा, जो अहंकारनिद्रा निदसुरा।
म्हणोनि स्वप्नींचिया बोरबारा, संतोषें शिणे ॥ ३५॥

जीव येणें नांवें, जयातें आळविजे स्वभावे।
तें अधिदैवत जाणावें, पंचायतनींचें ॥ ३६॥

आतां इयेचि शरीरग्रामीं, जो शरीरभावातें उपशमी।
तो अधियज्ञु एथ गा मी, पांडुकुमरा ॥ ३७॥

येर अधिदैवाधिभूत, तेहि मीचि कीर समस्त।
परि पंधरें किडाळा मिळत, तें काय सांके नोहे ॥ ३८॥

तरि ते पंधरेपण न मैळे, आणि किडाळाचियाही अंशा न मिळे।
परि जंव असे तयाचेनि मेळें, तव सांकेंचि म्हणिजे ॥ ३९॥

तैसें अधिभूतादि आघवे, हें अविद्येचेनि पालवें।
झांकलें तंव मानावें, वेगळें ऐसें ॥ ४०॥

तेचि अविद्येची जवनिका फिटे, आणि भेदभावाची अवघि तुटे।
मग म्हणों एक होऊनि जरी आटे, तरी काय दोनी होती ॥ ४१॥

पैं केशांचा गुंडाळा, वरि ठेविली स्फटिकशिळा।
ते वरि पाहिजे डोळां, तवं भेदिली गमती ॥ ४२॥

पाठीं केश परौते नेले, आणि भेदलेपण काय नेणों जाहालें।
तरि डांक देऊनि सांदिले, शिळेतें काई ॥ ४३॥

ना ते अखंडचि आयती, परि संगें भिन्न गमली होती।
ते सारिलिया मागौती, जैसी कां तैसी।। ४४॥

तेवींचि अहंभावो जाये, तरी ऐक्य तें आधींचि आहे।
हेंचि साचें जेथ होये, तो अधियज्ञु मी ॥ ४५॥

पैं गा आम्हीं तुज, सकळ यज्ञ कर्मज।
सांगीतलें कां जें काज, मनी धरूनि ॥ ४६॥

तो हा सकळ जीवांचा विसांवा, नैष्कर्म्यसुखाचा ठेवा।
परि उघड करूनि पांडव, दाविजत असे ॥ ४७॥

पहिलें वैराग्याइंधनपरिपूर्ती, इंद्रियानळी प्रदीप्तीं।
विषयद्रव्याचिया आहुती, देऊनिया ॥ ४८॥

मग वज्रासन तेचि उर्वी, शोधूनि आधारमुद्रा बरवी।
वेदिका रचे मांडवी, शरीराच्या ॥ ४९॥

तेथ संयमाग्नीचीं कुंडे, इंद्रियद्रव्याचेनि पवाडें।
यजिजती उदंडे, युक्तिघोषे ॥ ५० ॥

मग मनप्राण आणि संयमु, हाचि हवनसंपदेचा संभ्रमु।
येणें संतोषविजे निर्धूमु, ज्ञानानळु ॥ ५१॥

ऐसेनि हें सकळ ज्ञानी समर्पे, मग ज्ञान तें ज्ञेयीं हारपे।
पाठीं ज्ञेयचि स्वरूपें, निखिल उरे ॥ ५२ ॥

तया नांव गा अधियज्ञु, ऐसें बोलिला जंव सर्वज्ञु।
तंव अर्जुन अतिप्राज्ञु, तया पातलें तें ॥ ५३॥

हें जाणोनि म्हणितलें देवें, पार्था परिसतु आहासि बरवें।
याकृष्णाचिया बोलासवें, येरू सुखाचा जाहला ॥ ५४॥

देखा बालकाचिया धणी धाइजे, कां शिष्याचेनि जाहलेपणें होइजे।
हें सद्गुरूचि एकलेनि जाणिजे, कां प्रसवतिया ॥ ५५॥

म्हणोनि सात्विकां भावांची मांदी, कृष्णाआंगीं अर्जुनाआधीं।
न समातसे परी बुद्धी, सांवरूनि देवें ॥ ५६॥

मग पिकलिया सुखाचा परिमळु, कीं निवालिया अमृताचा कल्लोळु।
तैसा कोंवळा आणि रसाळु, बोलु बोलिला ॥ ५७॥

म्हणे परिसणेयांच्या राया, आइके बापा धनंजया।
ऐसी जळों सरलिया माया, तेथ जाळितें तेंही जळे ॥ ५८॥

     अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम्,
     यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः ॥ ५॥

जें आतांचि सांगितलें होतें, अगा अधियज्ञ म्हणितला जयातें।
जे आदीचि तया मातें, जाणोनि अंतीं ॥ ५९॥

ते देह झोळ ऐसें मानुनी, ठेले आपणपें आपण होऊनी।
जैसा मठ गगना भरूनी, गगनींचि असे ॥ ६०॥

यें प्रतीतीचिया माजघरीं, तया निश्चयाची वोवरी।
आली म्हणोनि बाहेरी, नव्हेचि से ॥ ६१॥

ऐसें सबाह्य ऐक्य संचलें, मीचि होऊनि असतां रचिलें।
बाहेरि भूतांचीं पांचही खवलें, नेणतांचि पडिलीं ॥ ६२॥

आतां उभयां उभेपण नाहीं जयाचें, मा पडिलिया गहन कवण तयाचें।
म्हणोनि प्रतीतीचिये पोटींचें, पाणी न हाले ॥ ६३॥

ते ऐक्याची आहे वोतिली, कीं नित्यतेचिया हृदयीं घातली।
जैसी समरससमुद्रीं धुतली, रूळेचिना ॥ ६४॥

पैं अथावीं घट बुडाला, तो आंतबाहेरी उदकें भरला।
पाठीं दैवगत्या जरी फुटला, तरी उदक काय फुटे ॥ ६५॥

ना तरी सर्पे कवच सांडिलें, कां उबारेनें वस्त्र फेडिलें।
तरी सांग पां काय मोडलें, अवेवामाजीं ॥ ६६॥

तैसा आकार हा आहाच भ्रंशे, वांचूनि वस्तु ते सांचलीचि असे।
तेचि बुद्धि जालिया विसुकुसे, कैसेनि आतां ॥ ६७॥

म्हणोनि यापरी मातें, अंतकाळीं जाणत सांते।
जे मोकलिती देहातें, तें मीचि होती ॥ ६८॥

एऱ्हवीं तरी साधारण, उरीं आदळलिया मरण।
जो आठव धरी अंतःकरण, तेंचि होइजे ॥ ६९॥

जैसा कवण एक काकुळती, पळतां पवनगती।
दुपाउलीं अवचितीं, कुहामाजी पडियेला ॥ ७०॥

आतां तया पडणयाआरौतें, पडण चुकवावया परौतें।
नाहीं म्हणोनि तेथें, पडावेंचि पडे ॥ ७१॥

तेंवि मृत्यूचेनि अवसरें एकें, जें येऊनि जीवासमोर ठाके।
तें होणें मग न चुके, भलतयापरी ॥ ७२॥

आणि जागता जंव असिजे, तंव जेणें ध्यानें भावना भाविजे।
डोळा लागतखेवों देखिजे, तेंचि स्वप्नीं ॥ ७३॥

     यं यं वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरम्।
     तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः ॥ ६ ॥

तेविं जितेनि अवसरें, जें आवडोनि जीवीं उरे।
तेंचि मरणाचिये मेरे, फार हों लागे ॥ ७४॥

आणि मरणीं जया जें आठवे, तो तेचि गतीतें पावे।
म्हणोनि सदां स्मरावें, मातेंचि तुवां ॥ ७५॥

     तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च।
     मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम् ॥ ७ ॥

डोळां जें देखावें, कां कानी हन ऐकावें,
मनीं जें भावावें, बोलावें वाचे ॥ ७६॥

तें आतं बाहेरि आघवें, मीचि करूनि घालावें।
मग सर्वीं काळीं स्वभावें, मीचि आहें ॥ ७७॥

अर्जुना ऐसें जाहलिया, मग न मरिजे देह गेलिया।
मा संग्रामु केलिया, भय काय तुज ॥ ७८॥

तूं मनबुद्धि साचेंसीं, जरी माझिया स्वरूपीं अर्पिसी।
तरी मातेंचि गा पावसी, हे माझी भाक ॥ ७९॥

हेंच कायिसया वरी होये, ऐसा जरी संदेहो वर्ततु आहे।
तरी अभ्यासूनि आदीं पाहें, मग नव्हे तरी कोपें ॥ ८०॥

     अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना।
     परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुन्तयन् ॥ ८॥

येणेंचि अभ्यासेंसिं योगु, चित्तासि करीं पां चांगु।
अगा उपायबळें पंगु, पहाड ठाकी ॥ ८१॥

तेविं सदभ्यासें निरंतर, चित्तासि परमपुरूषाची मोहर।
लावें मग शरीर, राहो अथवा जावो ॥ ८२ ॥

जें नानागतीतें पाववितें, तें चित्त वरील आत्मयातें।
मग कवण आठवी देहातें, गेलें की आहे ॥ ८३॥

पैं सरितेचिनि ओघें, सिंधुजळा मीनलें ओघें।
तें काय वर्तत आहे मागें, म्हणोनि पाहों येते ॥ ८४॥

ना तें समुद्रचि होऊन ठेलें, तेविं चित्ताचें चैतन्य जाहालें।
जेथ यातायात निमालें, घनानंद जें ॥ ८५॥

     कविं पुराणमनुशासितारमणोरणीयांसमनुस्मरेद्।
     सर्वस्य धातरमचिन्त्यरूपमादित्यवर्णं तमसः परस्तात् ॥ ९ ॥

जयाचें आकारावीण असणें, जया जन्म ना निमणें।
जें आघवेंचि आघवेपणें, देखत असे ॥ ८६॥

जें गगनाहून जुनें, जं परमाणूहूनि सानें।
जयाचेनि सान्निधानें, विश्व चळे ॥ ८७॥

जें सर्वांतें यया विये, विश्व सर्व जेणें जिये,
हेतु जया बिहे, अचिंत्य जें ॥ ८८॥

देखे वोळंबा इंगळु न चरे, तेजीं तिमिर न शिरे।
जें दिहाचें आंधारें, चर्मचक्षूसीं ॥ ८९॥

सुसडा सूर्यकणांच्या राशी, जो नित्य उदो ज्ञानियांसी।
अस्तमानाचें जयासी, आडनांव नाहीं ॥ ९०॥

     प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव।
     भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् स तं परं पुरुषमुपैति दिव्यम् ॥ १० ॥

तया अव्यंगवाणेया ब्रह्मातें, प्रयाणकाले प्राप्ते।
जो स्थिरावलेनि चित्तें, जाणोनि स्मरे ॥ ९१॥

बाहेरी पद्मासन रचुनी, उत्तराभिमुख बैसोनि।
जीवीं सुख सूनि, कर्मयोगाचें ॥ ९२॥

आंतु मिनलेनि मनोधर्मे, स्वरूपप्राप्तीचेनि प्रेमें।
आपेंआप संभ्रमें, मिळावया ॥ ९३॥

आकळलेनि योगें, मध्यमा मध्यमार्गे।
अग्निस्थानैनि निगे, ब्रह्मरंघ्रा ॥ ९४॥

तेथ अचेत चित्ताचा सांगातु, आहाचवाणा दिसे मांडतु।
जेथ प्राण गगनाआंतु, संचरे कां ॥ ९५ ॥

परी मनाचेनि स्थैयैं धरिला, भक्तीचिया भावना भरला।
योगबळें आवरला, सज्ज होउनी ॥ ९६॥

तो जडाजडातें विरवितु, भ्रूलतांमाजी संचरतु।
जैसा घंटानाद लयस्थु, घंटेसींच होय ॥ ९७॥

कां झांकलिय घटींचा दिवा, नेणिजे काय जाहला केव्हां।
या रीती जो पांडवा, देह ठेवी ॥ ९८॥

तो केवळ परब्रह्म, जया परमपुरूष ऐसें नाम।
तें माझें निजधाम, होऊनि ठाके ॥ ९९॥

      यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः।
     यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति यत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये ॥ ११॥

सकळां जाणणेयां जे लाणी, तिये जाणिवेची जे खाणी।
तयां ज्ञानियांचिये आयणी, जयातें अक्षर म्हणिपे ॥ १००॥

चंडवातेंही न मोडे, तें गगनचि कीं फुडें।
वांचूनि जरे होईल मेहुडें, तरी उरेल कैंचे ॥ १०१॥

तेविं जाणणेया जें आकळिलें, तें जाणवलेपणेंचि उमाणलें।
मग नेणवेचि तया म्हणितलें, अक्षर सहजें ॥ १०२॥

म्हणोनि वेदविद नर, म्हणती जयातें अक्षर।
जें प्रकृतीसी पर, परमात्मरूप।। १०३॥

आणि विषयांचें विष उलंडूनि, जे सर्वेंद्रियां प्रायश्चित देऊनि।
आहाति देहाचिया बैसोनि, झाडातळी ॥ १०४॥

ते यापरी विरक्त, जयाची निरंतर वाट पाहात।
निष्कामासि अभिप्रेत, सर्वदा जें ॥ १०५॥

जयाचिया आवडी, न गणिती ब्रह्मचर्यादि सांकडी।
निष्ठुर होऊनि बापुडी, इंद्रिये करिती ॥ १०६॥

ऐसें जें पद, दुर्लभ आणि अगाध।
जयाचिये थडिये वेद, चुबुकळिले ठेले ॥ १०७॥

तें तें पुरूष होती, जे यापरी लया जाती।
तरी पार्था हेचि स्थिती, एक वेळ सांगो ॥ १०८॥

तेथ अर्जुनें म्हणितलें स्वामी, हेंचि म्हणावया होतों पां मी।
तंव सहजें कृपा केली तुम्ही, तरी बोलिजो कां ॥ १०९॥

परि बोलावें तें अति सोहोपें, तेथें म्हणितलें त्रिभुवनदीपें।
तुज काय नेणों संक्षेपें, सांगेन ऐक ॥ ११०॥


तरी मना या बाहेरिलीकडे, यावयाची साविया सवे मोडे।
हें हृदयाचिया डोहीं बुडे, तैसें कीजे ॥ १११॥

     सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरूध्य च।
     मूर्ध्न्याधायात्मनः प्राणमास्थितो योगधारणाम् ॥ १२॥

परी हें तरीच घडे, जरी संयमाची अखंडें।
सर्वद्वारी कवाडें, कळासती ॥ ११२॥

तरी सहजें मन कोंडलें, हृदयींचि असेल उगलें।
जैसें करचरणीं मोडलें, परिवरू न संडी ॥ ११३॥

तैसें चित्त राहिल्या पांडवा, प्राणाचा प्रणवुचि करावा।
मग अनुवृत्तिपंथें आणावा, मूर्ध्निवरी ॥११४॥

तेथ आकाशीं मिळे न मिळे , तैसा धरावा धारणाबळें।
जंव मात्रात्रय मावळे, अर्धबिंबीं ॥ ११५॥

तंववरी तो समीरु, निराळी कीजे स्थिरू।
मग लग्नीं जेविं ॐकारू, बिंबींचे विलसे ॥ ११६॥

     ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन्।
     यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम् ॥ १३॥

तैसें ॐ हें स्मरों सरे, आणि तेथेंचि प्राणु पुरे।
मग प्रणवांतीं उरे, पूर्णघन जें ॥ ११७॥

म्हणोनि प्रणवैकनाम, हें एकाक्षर ब्रह्म।
जो माझें स्वरूप परम, स्मरतसांता ॥१ १८॥

यापरी त्यजी देहातें, तो त्रिशुद्धी पावे मातें।
जया पावनया परौतें, आणिक पावणें नाहीं ॥ ११९॥

तेथे अर्जुना जरी विपायें, तुझ्या जीवीं हन ऐसें जाये।
ना हें स्मरण मग होये, कायसयावरी अंती ॥ १२०॥

इंद्रियां अनुघडु पडलिया, जीवितचें सुख बुडालिया।
आंतुबाहेरी उघडलिया, मृत्युचिन्हें ॥ १२१॥

ते वेळीं बैसवेंचि कवणें, मग कवण निरोधी करणें।
तेथे काह्याचेनि अंतकःरणें, प्रणव स्मरावा ॥ १२२॥

तरि गा ऐशिया ध्वनी, झणें थारा देशी हो मनीं।
पैं नित्य सेविला मी निदानीं, सेवकु होयें ॥ १२३॥

     अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः।
     तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः ॥ १४॥

     मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम्।
     नाप्नुवंति महात्मानः संसिद्धिं परमां गताः ॥ १५ ॥

जे विषयांसि तीळांजळी देऊनी, प्रवृत्तीवरी निगड वाउनी।
मातें हृदयीं सूनी, भोगताती ॥ १२४॥

परि भोगितया आराणुका, भेटणें नाहीं क्षुधादिकां।
तेथ चक्षुरादि रंकां, कवण पाडु ॥ १२५॥

ऐसे निरंतर एकवटले, जे अंतःकरणी मजशीं लिगटले।
मीचि होऊनि आटले, उपासैती ॥ १२६॥

तयां देहावसान जैं पावे, तैं तिहीं मातें स्मरावें।
मग म्यां जरी पावावें, तरि उपास्ति ते कायसी ॥ १२७॥

पैं रंकु एक आडलेपणें, काकुळती अंती धांवा गा धांवा म्हणे।
तरि तयाचिये ग्लानी धांवणे, काय न घडे मज ॥ १२८॥

आणि भक्तांही तेचि दशा, तरी भक्तीचा सोसु कायसा।
म्हणऊनि हा ध्वनी ऐसा, न वाखाणावा ॥ १२९॥

तिहीं जे वेळीं मी स्मरावा, ते वेळीं स्मरला कीं पावावा।
तो आभारूही जीवा, साहवेचि ना ॥ १३०॥

तें ऋणवैपण देखोनि आंगी, मी आपुलियाचि उत्तीर्णत्वालागीं।
भक्तांचिया तनुत्यागीं, परिचर्या करीं ॥ १३१॥

देहवैकल्याचा वारा, झणें लागेल या सकुमारां।
म्हणोनि आत्मबोधाचे पांजिरां, सूयें तयांतें ॥ १३२॥

वरि आपुलिया स्मरणाची उवाइली, हींवाऐसी करीं साउली।
ऐसेनि नित्य बुद्धि संचली, मी आणीं तयांतें ॥ १३३॥

म्हणोनि देहांतींचें सांकडें, माझियां कहींचि न पडे।
मी आपुलियांतें आपुलीकडे, सुखेंचि आणीं ॥ १३४॥

वरचील देहाची गंवसणी फेडुनी, आहाच अहंकाराचे रज झाडुनी।
शुद्ध वासना निवडुनी, आपणापां मेळवी ॥ १३५॥

आणि भक्तां तरी देहीं, विशेष एकवंकीचा ठाव नाहीं।
म्हणऊनि अव्हेरू करितां कांही, वियोग ऐसा न वाटे ॥ १३६॥

ना तरी देहांतींचि मियां यावें, मग आपणपें यांतें न्यावें।
हेंही नाहीं जे स्वभावें, ते आधींचि मज मीनले ॥ १३७॥

येरी शरीराचिया सलिलीं, असतेपण हे साउले।
वांचूनि चंद्रिका ते ठेली, चंद्रींचि आहे।। १३८॥

ऐसे जे नित्ययुक्त, तयांसि सुलभ मी सतत।
म्हणाऊनि देहांतीं निश्चित, मीचि होती ॥ १३९॥

मग क्लेशतरूची वाडी, जे तापत्रयाग्नीची सगडी।
जे मृत्युकाकासि कुरोंडी, सांडिली आहे ॥ १४०॥

जें दैन्याचें दुभतें, जें महाभयातें वाढवितें।
जें सकळ दुःखाचें पुरतें, भांडवल ॥ १४१॥

जें दुर्मतीचें मूळ, जें कुमार्गाचें फळ।
जें व्यामोहाचें केवळ, स्वरूपचि ॥ १४२॥

जें संसाराचें बैसणें, जें विकाराचें उद्यानें।
जें सकळ रोगांचें भाणें, वाढिलें आहे ॥ १४३॥

जें काळाचा खिचउशिटा, जें आशेचा आंगवठा।
जन्ममरणाचा वोलिंवटा, स्वभावें जें ॥ १४४॥

जें भुलीचें भरींव, जें विकल्पाचें वोतींव।
किंबहुना पेंव, विंचुवांचें ॥ १४५॥

जें व्याघ्राचें क्षेत्र, जें पण्यांगनेचें मैत्र।
जें विषयविज्ञानयंत्र, सुपूजित ॥ १४६॥

जें लांवेचा कळवळा, निवालिया विषोदकाचा गळाळा।
जें विश्वासु आंगवळा, संवचोराचा ॥ १४७॥

जें कोढियाचें खेंव, जें काळसर्पाचें मार्दव।
गोरियाचें स्वभाव, गायन जें ॥ १४८॥

जें वैरियाचा पाहुणेर, जें दुर्जनाचा आदर।
हें असो जें सागर, अनर्थाचा ॥ १४९॥

जें स्वप्नीं देखिलें स्वप्न, जें मृगजळें सासिन्नलें वन।
जें धूम्ररजांचें गगन, ओतलें आहे ॥ १५०॥

ऐसें जें हें शरीर, तें ते न पवतीचि पुढती नर।
जे होऊनि ठेले अपार, स्वरूप माझें ॥ १५१॥

     आब्रह्मभुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन।
     मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते ॥ १६॥

एऱ्हवीं ब्रह्मपणाचिय भडसे, न चुकतीचि पुनरावृत्तीचे वळसे।
परि निवटलियाचें जैसें, पोट न दुखे ॥ १५२॥

ना तरी चेइलियानंतरें, न बुडिजे स्वप्नींचेनि महापूरें।
तेवीं मातें पावलें ते संसारें, लिंपतीचि ना ॥ १५३॥

एऱ्हवीं जगदाकाराचें सिरें, जें चिरस्थायीयांचे धुरे।
ब्रह्मभुवन गा चवरें, लोकाचळाचें ॥ १५४॥

जिये गांवींचा पहारू दिवोवरी, एका अमरेंद्राचें आयुष्य न धरी।
विळोनि पांतीं उठी एकसरी, चवदाजणांची ॥ १५५॥

     सहस्त्रयुगपर्यंतमहर्यद् ब्रह्मणो विदुः।
     रात्रिं युगसहस्त्रान्तां तेऽहोरात्रविदो जनाः ॥ १७॥

जैं चौकडिया सहस्त्र जाये, तैं ठायेठावो विळुचि होये।
आणि तैसेंचि सहस्त्र भरिये पाहें, रात्री जेथ ॥ १५६॥

येवढें अहोरात्र जेथिंचें, तेणें न लोटती जे भाग्याचे।
देखती ते स्वर्गींचे, चिरंजीव ॥ १५७॥

येरां सुरगणांची नवाई, विशेष सांगावी तेथ काई।
मुद्दल इंद्राचीचि दशा पाहीं, जे दिहाचे चौदा ॥ १५८॥

परि ब्रह्मयाचियाहि आठां पहारांतें, आपुलिया डोळां देखते।
जे आहाति गा तयांतें, अहोरात्रविद म्हणिपे ॥ १५९॥

     अव्यक्ताद् व्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्यहरागमे।
     रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके ॥ १८॥

     भूतग्रामः स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते।
     रात्र्यागमेऽवशः पार्थ प्रभवत्यहरागमे ॥ १९ ॥

तये ब्रह्मभुवनीं दिवसें पाहे, ते वेळीं गणना केंही न समाये।
ऐसें अव्यक्ताचें होये, व्यक्त विश्व ॥ १६०॥

पुढती दिहाची चौपाहारी फिटे, आणि हा आकारसमुद्र आटे।
पाठीं तैसाचि मग पाहांटे, भरों लागे ॥ १६१॥

शारदीयेचिये प्रवेशीं, अभ्रें जिरती आकाशीं।
मग ग्रीष्मांतीं जैशीं, निगती पुढती ॥ १६२॥

तैसी ब्रह्मदिनाचिये आदी, हे भूतसृष्टीची मांदी।
मिळे जंव सहस्त्रावधी, निमित्त पुरे ॥ १६३॥

पाठीं रात्रीचा अवसरू होये, आणि विश्व अव्यक्तीं लया जाये।
तोही युगसहस्त्र मोटका पाहे, आणि तैसेंचि रचे ॥ १६४॥

हें सांगावया काय उपपत्ति, जें जगाचा प्रळयो आणि संभूति।
इथे ब्रह्मभुवनींचिया होती, अहोरात्रमाजीं ॥ १६५॥

कैसें थोरिवेचें मान पाहें पां, हो सृष्टिबीजाचा साटोपा।
परि पुनरावृत्तीचिया मापा, शीग जाहला ॥ १६६॥

एऱ्हवीं त्रैलोक्य हें धनुर्धरा, तिये गांवींचा गा पसारा।
तो हा दिनोदयीं एकसरां, मांडतु असे ॥ १६७॥

पाठीं रात्रीचा समो पावे, आणि अपैसाचि सांटवे।
म्हणिये जेथींचें तेथ स्वभावें, साम्यासि ये ॥ १६८॥

जैसें वृक्षपण बीजासि आलें, कीं मेघ हें गगन जाहालें।
तैसें अनेकत्व जेथ सामावलें, तें साम्य म्हणिपे ॥ १६९॥

     परस्तस्मात्तु भावोऽन्योऽव्यक्तोऽव्यक्तात्सनातनः।
     यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति ॥ २०॥

तेथ समविषम न दिसे कांही, म्हणोनि भूतें हे भाष नाही।
जेविं दूधचि जाहालिया दहीं, नामरूप जाय ॥ १७० ॥

तेंविं आकारलोपासरिसें, जगाचें जगपण भ्रंशे।
परि जेथ जाहालें तें जैसें, तैसेंचि असे ॥ १७१॥

तैं तया नांव सहज अव्यक्त, आणि आकारा वेळीं तेंचि व्यक्त।
हें एकास्तव एक सूचित, एऱ्हवीं दोनी नाही ॥ १७२॥

जैसें आटलिया स्वरूपें, आटलेपण ते खोटी म्हणिपे।
पुढती तो घनाकारू हारपे, जे वेळीं अळंकार होती ॥ १७३॥

हीं दोन्ही जैशीं होणीं, एकीं साक्षीभूत सुवर्णी।
तैसी व्यक्ताव्यक्ताची कडसणी, वस्तूच्या ठायी ॥ १७४॥

तें तरी व्यक्त ना अव्यक्त, नित्य ना नाशवंत।
या दोहीं भावाअतीत, अनादिसिध्द ॥ १७५॥

जें हें विश्वचि होऊनि असे, परि विश्वपण नासिलेनि न नासे।
अक्षरें पुसिल्या न पुसे, अर्थु जैसा ॥ १७६।।

पाहें पां तरंग तरी होत जात, परि तेथ उदक तें अखंड असत।
तेवीं भूताभावीं नाशिवंत, अविनाश जें ॥ १७७॥

ना तरी आटतिये अळंकारी, नाटतें कनक असे जयापरी।
तेवीं मरतिये जीवाकारीं, अमर जें आहे ॥ १७८॥

     अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिम्।
     यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥ २१॥

     पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभस्त्वनन्या।
     यस्यातःस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम् ॥ २२ ॥

जयातें अव्यक्त म्हणों ये कोडें, म्हणतां स्तुति हें ऐसें नावडे ॥
जें मनबुद्धी न सांपडे, म्हणऊनियां ॥ १७९॥

आणि आकारा आलिया जयाचें, निराकारपण न वचे।
आकारलोपें न विसंचे, नित्यता गा ॥ १८०॥

म्हणोनि अक्षर जें म्हणिजे, तेवीचि म्हणतां बोधुही उपजे।
जयापरौता पैसु न देखिजे, या नाम परमगति ॥ १८१॥

परि आघवा इहीं देहपुरीं, आहे निजेलियाचे परी।
जे व्यापारू करवी ना करी, म्हणऊनियां ॥ १८२॥

एऱ्हवीं जे शारीरचेष्टा, त्यांमाजीं एकही न ठके गा सुभटा।
दाही इंद्रियांचिया वाटा, वाहतचि आहाति ॥ १८३॥

उकलूं विषयांचा पेटा, होता मनाचां चोहटा।
तो सुखदुःखाचा राजवांटा, भीतराहि पावे ॥ १८४॥

परि रावो पहुडलिया सुखें, जैसा देशींचा व्यापारू न ठके।
प्रजा आपुलालेनि अभिलाखें, करितचि असती ॥ १८५॥

तैसें बुद्धीचें हन जाणणें, कां मनाचें घेणेंदेणें।
इंद्रियांचें करणें, स्फुरण वायूचें ॥ १८६॥

हे देहक्रिया आघवी, न करितां होय बरवी।
जैसा न चलवितेनि रवी, लोकु चाले ॥ १८७॥

अर्जुना तयापरी, सुतला ऐसा आहे शरीरीं।
म्हणोनि पुरूषु गा अवधारीं, म्हणिपे जयातें ॥ १८८॥

आणि प्रकृति पतिव्रते, पडिला एकपत्नीव्रतें।
येणेंही कारणें जयातें, पुरूषु म्हणों ये ॥ १८९॥

पैं वेदाचें बहुवसपण, देखेचिना जयाचें आंगण।
हें गगनाचें पांघरूण, होय देखा ॥ १९०॥

ऐसें जाणूनि योगीश्वर, जयातें म्हणती परात्पर।
जें अनन्यगतीचें घर, गिंवसीत ये ॥ १९१॥

जे तनू वाचा चित्ते, नाइकती दुजिये गोष्टीतें।
तयां एकनिष्ठेचें पिकतें, सुक्षेत्र जें ॥ १९२।।

हें त्रैलोक्यचि पुरूषोत्तम, ऐसा साच जयाचा मनोधर्मु।
तया आस्तिकाचा आश्रमु, पांडवा गा ॥ १९३॥

जें निगर्वाचें गौरव, जें निर्गुणाची जाणीव।
जें सुखाची राणीव, निराशांसी ॥ १९४॥

जें संतोषियां वाढिलें ताट, जें अचिंता अनाथाचें मायपोट।
भक्ती उजू वाट, जया गांवा ॥ १९५॥

हें एकैक सांगोनि वायां, काय फार करूं धनंजया।
पैं गेलिया जया ठाया, तो ठावोचि होइजे ॥ १९६॥

हिंवाचिया झुळुका, जैसें हिंवचि पडे उष्णोदका।
कां समोर हालिया अर्का, तमचि प्रकाशु ॥ १९७॥

तैसा संसारू जया गांवा, गेला सांता पांडवा।
होऊनि ठाके आघवा, मोक्षाचाचि ॥ १९८॥

तरी अग्नीमाजीं आलें, जैसें इंधनचि अग्नि जहालें
पाठीं न निवडेचि कांही केलें, काष्ठपण ॥ १९९॥

ना तरी साखरेचा माघौता, बुध्दिमंतपणेंही करितां।
परि ऊंस नव्हे पांडुसुता, जियापरी ॥ २००॥

लोहाचें कनक जहालें, हें एकें परिसेंचि केलें।
आतां आणिक कैंचें तें गेलें, लोहत्व आणी ॥ २०१॥

म्हणोनि तूप होऊनि माघौतें, जेवीं दूधपण न येचि निरूतें।
तेविं पावोनियां जयातें, पुनरावृत्ति नाहीं ॥ २०२॥

तें माझें परम, साचोकारें निजधाम।
हें आंतुवट तुज वर्म, दाविजत असें।। २०३॥

     यत्र काले त्वानावृत्तिमावृत्तिं चैव योगिनः।
     प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ ॥ २३॥

तेवींचि आणिकेंही एके प्रकारें, जाणतां आहे सोपारें।
तरि देह सांडितेनि अवसरें, जेथ मिळती योगी ॥ २०४॥

अथवा अवचटें ऐसें घडे, जे अनवसरें देह सांडे।
तरि माघौतें येणें घडे, देहासीचि ॥ २०५॥

म्हणोनि काळशुद्धी जरी देह ठेवीती, तरी ठेवितखेवीं ब्रह्मचि होती।
एऱ्हवीं अकाळीं तरी येती, संसारा पुढती ॥ २०६॥

तैसें सायुज्य आणि पुनरावृत्ति, या दोन्ही अवसराअधीन आहाती।
तो अवसरू तुजप्रती, प्रसंगें सांगों ॥ २०७॥

तरि ऐकें गा सुभटा, पातलिया मरणाचा माजिवटा।
पांचै आपुलालिया वाटा, निघती अंती ॥ २०८॥

ऐसा वरिपडिला प्रयाणकाळी, बुद्धीतें भ्रमु न गिळी।
स्मृति नव्हे आंधळी, न मरे मन ॥ २०९॥

हा चेतनावर्गु आघवा, मरणी दिसे टवटवा।
परि अनुभविलिया ब्रह्मभावा, गवसणी होऊनि ॥ २१०॥

ऐसा सावध हा समवावो, आणि निर्वाणवेऱ्ही निर्वाहो।
हे तरीच घडे जरी सावावो, अग्नीचा आथी ॥ २११॥

पाहें पां वारेन कां उदकें, जैं दिवियांचें दिवेपण झांके।
तैं असतीच काय देखे, दिठी आपुली ॥ २१२॥

तैसें देहांतींचेनि विषमवातें, देह आंतबाहेरि श्लेष्माआतें।
तैं विझोनि जाय उजितें, अग्नीचें तें ॥ २१३॥

ते वेळीं प्राणासि पाणु नाहीं, तेथ बुद्धि असोनि करील काई।
म्हणोनि अग्नीवीण देहीं, चेतना न थरे ॥ २१४॥

अगा देहींचा अग्नि जरी गेला, तरी देह नव्हे चिखलु वोला।
वायां आयुष्यवेळु आपुला, अंधारे गिंवसी ॥ २१५॥

आणि मागील स्मरण आघवें, तें तेणें अवसरें सांभाळावें।
मग देह त्यजूनि मिळावें, स्वरूपीं कीं ॥ २१६॥

तंव तया देहश्लेष्माचे चिखलीं, चेतनाचि बुडोनि गेली।
तेथ मागिली पुढिली हे ठेली, आठवण ॥ २१७॥

म्हणोनि आधीं अभ्यासु जो केला, तो मरण न येतां निमोनि गेला।
जैसें ठेवणें न दिसतां मालवला, दीपु हातींचा ॥ २१८॥

आतां असो हें सकळ, जाण पां ज्ञानासि अग्नि मूळ।
तया अग्नीचें प्रयाणीं बळ, संपूर्ण आथी ॥ २१९॥

     अग्निर्ज्योतिरहः शुक्लः षण्मासा उत्तरायणम्।
     तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः ॥ २४॥

आंतु अग्निज्योतीचा प्रकाशु, बाहेरी शुक्लपक्षु आणि दिवसु।
आणि सा मासांमाजीं मासु, उत्तरायण ॥ २२०॥

ऐशिया समयोगाची निरूती, लाहोनि जे देह ठेविती।
ते परब्रह्मचि होती, ब्रह्मविद ॥ २२१॥

अवधारीं गा धनुर्धरा, येथवरी सामर्थ्य यया अवसरा।
तेवींचि हा उजू मार्ग स्वपुरा, यावया पैं ॥ २२२॥

एथ अग्नि हें पहिलें पायतरें, ज्योतिर्मय हें दुसरें।
दिवस जाणें तिसरें, चौथें शुक्लपक्ष ॥ २२३॥

आणि सामास उत्तरायण, तें वरचील गा सोपान।
येणें सायुज्यसिद्धिसदन, पावती योगी ॥ २२४॥

हा उत्तम काळु जाणिजे, यातें अर्चिरादि मार्गु म्हणिजे।
आतां अकाळु तोही सहजें, सांगेन आईक ॥ २२५॥

     धूमो रात्रिस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनम्।
     तत्र चान्द्रमसं ज्योतिर्योती प्राप्य निवर्तते ॥ २५॥

तरि प्रयाणाचिया अवसरें, वात श्लेष्मां श्लेष्मां।
तेणें अंतःकरणीं आंधारें, कोंदले ठाके ॥ २२६ ॥

सर्वेंद्रियां लांकुड पडे, स्मृती भ्रमामाजीं बुडे।
मन होय वेडें, कोंडे प्राण ॥ २२७॥

अग्नीचें अग्निपण जाये, मग तो धूमचि अवघा होये।
तेणें चेतना गिंवसिली ठाये, शरीरींची ॥ २२८॥

जैसें चंद्राआड आभाळ, सदट दाटे सजळ।
मग गडद ना उजाळ, ऐसें झांवळें होये ॥ २२९॥

कां मरे ना सावध, ऐसें जीवितासि पडे स्तब्ध।
आयुष्य मरणाची मर्याद-, वेळु ठाकी ॥ २३०॥

ऐसी मनबुद्धिकरणीं, सभोंवतीं धूमाकुळाची कोंडणी।
तेथ जन्में जोडलिये वाहणी, युगचि बुडे ॥ २३१।।

हां गा हातींचें जे वेळीं जाये, ते वेळीं आणिका लाभाची गोठी कें आहे।
म्हणऊनि प्रयाणीं तंव होये, येतुली दशा ॥ २३२॥

ऐसी देहाआंतु स्थिति, बाहेरि कृष्णपक्षु वरि राती।
आणि सा मासही वोडवती, दक्षिणायन ॥ २३३॥

इये पुनरावृतीचीं घराणीं, आघवीं एकवटती जयाचिया प्रयाणीं।
तो स्वरूपसिद्धीची काहाणी, कैसेनि आइके ॥ २३४॥

ऐसा जयाचा देह पडे, तया योगी म्हणोनि चंद्रवरी जाणें घडे।
मग तेथूनि मागुता बहुडे, संसारा ये ॥ २३५ ॥

आम्हीं अकाळ जो पांडवा, म्हणितला तो हा जाणावा।
आणि हाचि धूम्रमार्ग गांवा, पुनरावृत्तीचिया ॥ २३६॥

येर तो अर्चिरादि मार्गु, तो वसता आणि असलगु।
साविया स्वस्थु चांगु, निवृतीवरी ॥ २३७॥

     शुक्लकृष्णे गती ह्येते जगतः शाश्वते मते।
     एकया यात्यनावृत्तिमन्यया वर्तते पुनः ॥ २६॥

ऐशिया अनादि या दोन्ही वाटा, एकी उजू एकी अव्हांटा।
म्हणवूनि बुद्धिपूर्वक सुभटा, दाविलिया तुज ॥ २३८॥

कां जे मार्गामार्ग देखावे, साच लटिकें वोळखावें।
हिताहित जाणावें, हिताचिलागीं ॥ २३९।।

पाहे पां नाव देखतां बरवी, कोणी आड घाली काय अथावीं।
कां सुपंथ जाणोनियां अडवीं, रिगवत असे।। २४०॥

जो विष अमृत वोळखे, तो अमृत काय सांडू शके।
तेविं जो उजू वाट देखे, तो अव्हांटा न वचे ॥ २४१॥

म्हणोनि फुडें, पारखावें खरें कुडें।
पारखिलें तरे न पडे, अवसरें कहीं ॥ २४२॥

एऱ्हवीं देहांतीं थोर विषम, या मार्गाचें आहे संभ्रम।
जन्में अभ्यासिलियाचें हन काम, जाईल वायां ॥ २४३॥

जरी अर्चिरादि मार्गु चुकलियां, अवचटें धूम्रपंथें पडिलियां।
तरी संसारपांतीं जुंतलियां, भंवतचि असावें ॥ २४४॥

हे सायास देखोनि मोठे, आतां कैसेनि पां एकवेळ फिटे।
म्हणोनि योगमार्गु गोमटे, शोधिले दोन्ही ॥ २४५॥

तंव एकें बह्मत्वा जाइजे, आणि एकें पुनरावृत्ते येइजे।
परि दैवगत्या जो लाहिजे, देहांतीं जेणें ॥ २४६॥

     नैते सृती पार्थ जानन् योगी मुह्याति कश्चने।
     तस्मात्सर्वेषु कालेषु योगसुक्तो भवार्जुन ॥ २७॥

ते वेळी म्हणितलें हें नव्हे, वायां अवचटें काय पावे।
देह त्यजुनि वस्तु होआवें, मार्गेचि कीं ॥ २४७॥

तरी आतां देह असो अथवा जावो, आम्ही तों केवळ वस्तूचि आहों।
कां जे दोरीं सर्पत्व वावो, दोराचिकडुनी ॥ २४८॥

मज तरंगपण असे कीं नसे, ऐसें हें उदकासी कहीं प्रतिभासे।
तें भलतेव्हां जैसें तैसें, उदकचि कीं ॥ २४९॥

तरंगाकारें न जन्मेचि, ना तरंगलोपें न निमेचि।
ते विदेही जे देहेंचि, वस्तु जाहले ॥ २५०॥

आतां शरीराचें तयाचिया ठाईं, आडनांवही उरलें नाहीं।
तरि कोणें काळें काई, निमे तें पाहें पां ॥ २५१॥

मग मार्गातें कासया शोधावें, कोणें कोठूनि कें जावें।
जरी देशकालादि आघवें, आपणचि असे ॥ २५२॥

आणि हां गा घटु जे वेळीं फुटे, ते वेळीं तेथींचें आकाश लागे नीटे वाटे।
वाटा लागे तरि गगना भेटे, एऱ्हवीं काय चुके ॥ २५३॥

पाहें पां ऐसें हन आहे, कीं तो आकारूचि जाये।
येर गगन तें गगनींचि आहे, घटत्वाहि आधीं ॥ २५४॥

ऐसिया बोधाचेनि सुरवाडें, मार्गामार्गाचें सांकडें।
तया सोऽहंसिद्धा न पडे, योगियांसी ॥ २५५॥

याकारणें पांडुसुता, तुवां होआवे योगयुक्ता।
येतुलेनि सर्वकाळीं साम्यता, आपणपां होईल ॥ २५६॥

मग भलतेथ भलतेंव्हा, देहबंध असो अथवा जावा।
परि अबंधा नित्य ब्रह्मभावा, विघड नाहीं ॥ २५७॥

तो कल्पादि जन्मा नागवे, कल्पांतीं मरणें नाप्लवे।
माजीं स्वर्गसंसाराचेनि लाघवें, झकवेना ॥ २५८॥

येणें बोधें जो योगी होये, तयासीचि या बोधाचें नीटपण आहे।
कां जे भोगातें पेलूनि पाहें, निजरूपा ये ॥ २५९॥

पैं गा इंद्रादिकां देवां, जयां सर्वस्वें गाजती राणिवा।
तें सांडणें मानूनि पांडवा, डावली जो ॥ २६०॥

     वेदेषु यज्ञेषु तपःसु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम्।
     अत्येति तत्सर्वमिदं विदेत्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम् ॥ २८॥

जरी वेदाध्ययनाचे जालें, अथवा यज्ञाचें शेतचि पिकलें।
कीं तपोदनांचें जोडलें, सर्वस्व हन जें ॥ २६१॥

तया आघवां पुण्याचा मळा, भार आंतौनि जया ये फळा।
तें परब्रह्मा निर्मळा, सांटी न सरे ॥ २६२॥

जें नित्यानंदाचेनि मानें, उपमेचा कांटाळां न दिसे सानें।
पाहा पां वेदयज्ञादि साधनें, जया सुखा ॥ २६३॥

जें विटे ना सरे, भोगितयाचेनि पवाडें पुरे।
पुढती महासुखाचें सोयरें, भावंडचि ॥ २६४॥

ऐसें दृष्टीचेनि सुखपणें, जयासी अदृष्टाचें बैसणें।
जें शतमखाही आंगवणें, नोहेचि एका ॥ २६५॥

तयातें योगीश्वर अलौकिकें, दिठीचेनि हाततुकें।
अनुमानती कौतुकें, तंव हळुवार आवडे ॥ २६६॥

मग तया सुखाची किरीटी, करुनियां गा पाउटी।
परब्रह्मचिये पाटीं, आरूढती ॥ २६७॥

ऐसें चराचरैकभाग्य, जें ब्रह्मेशां आराधनेयोग्य।
योगियांचे भोग्य-, भोगधन जें ॥ २६८॥

जो सकळ कळांची कळा, जो परमानंदाचा पुतळा।
तो जिवाचा जिव्हाळा, विश्वाचिया ॥ २६९॥

जो सवर्ज्ञतेचा वोलावा, जो यादवकुळींचा कुळदिवा।
तो श्रीकृष्णजी पांडवा-, प्रति बोलिला ॥ २७०॥

ऐसा कुरुक्षेत्रींचा वृत्तांतु, संजयो रायासी असे सांगतु।
तेचि परियेसा पुढां मातु, ज्ञानदेव म्हणे ॥ २७१॥

॥ आठवा अध्याय समाप्त ॥