भारत की संस्कृति के लिए... भाषा की उन्नति के लिए... साहित्य के प्रसार के लिए

ज्ञानेश्वरी / अध्याय दहावा / संत ज्ञानेश्वर

Kavita Kosh से
यहाँ जाएँ: भ्रमण, खोज

नमो विशदबोधविदग्धा, विद्यारविंदप्रबोधा,
पराप्रमेयप्रमदा, विलासिया ॥ १ ॥

नमो संसारतमसूर्या, अप्रतिमपरमवीर्या,
तरुणतरतूर्या, लालनलीला ॥ २ ॥

नमो जगदखिलपालना, मंगळमणिनिधाना,
सज्जनवनचंदना, आराध्यलिंगा ॥ ३ ॥

नमो चतुरचित्तचकोरचंद्रा, आत्मानुभवनरेंद्रा,
श्रुतिसारसमुद्रा, मन्मथमन्मथा ॥ ४ ॥

नमो सुभावभजनभाजना, भवेभकुंभभंजना,
विश्वोद्भसवभुवना, श्रीगुरुराया ॥ ५ ॥

तुमचा अनुग्रहो गणेशु, जैं दे आपुला सौरसु,
तैं सारस्वतीं प्रवेशु, बाळकाही आथी ॥ ६ ॥

जी दैविकीं उदार वाचा, जैं उद्देशु दे नाभिकाराचा,
तैं नवरससुधाब्धीचा, थावो लाभे ॥ ७ ॥

जी आपुलिया स्ने,हाची वागेश्वरी, जरी मुकेयातें अंगिकारी,
तो वाचस्पतीशीं करी, प्रबंधुहोडा ॥ ८ ॥

हें असो दिठी जयावरी झळके, कीं हा पद्मकरु माथां पारुखे,
तो जीवचि परि तुके, महेशेंसीं ॥ ९ ॥

एवढें जिये महिमेचें करणें, तें वाचाबळें वानूं मी कवणें,
कां सूर्याचिया आंगा उटणें, लागत असे ? ॥ १० ॥

केउता कल्पतरुवरी फुलौरा ?, कायसेनि पाहुणेरु क्षीरसागरा ?,
कवणें वासीं कापुरा, सुवासु देवों ? ॥ ११ ॥

चंदनातें कायसेनि चर्चावें, अमृतातें केउतें रांधावें,
गगनावरी उभवावें, घडे केवीं ? ॥ १२ ॥

तैसें श्रीगुरूचें महिमान, आकळितें कें असे साधन ?,
हें जाणोनि मियां नमन, निवांत केलें ॥ १३ ॥

जरी प्रज्ञेचेनि आथिलेपणें, श्रीगुरूसामर्थ्या रूप करूं म्हणे,
तरि तें मोतियां भिंग देणें, तैसें होईल ॥ १४ ॥

कां साडेपंधरया रजतवणी, तैशीं स्तुतींचीं बोलणीं,
उगियाचि माथा ठेविजे चरणीं, हेंचि भलें ॥ १५ ॥

मग म्हणितलें जी स्वामी, भलेनि ममत्वें देखिलें तुम्हीं,
म्हणौनि कृष्णार्जुनसंगमीं, प्रयागवटु जाहलों ॥ १६ ॥

मागां दूध दे म्हणतलियासाठीं, आघविया क्षीराब्धीची करूनि वाटी,
उपमन्यूपुढें धूर्जटी, ठेविली जैसी ॥ १७ ॥

ना तरी वैकुंठपीठनायकें, रुसला ध्रुव कवतिकें,
बुझाविला देऊनि भातुकें, ध्रुवपदाचें ॥ १८ ॥

तैसी जे ब्रह्मविद्यारावो, सकळ शास्त्रांचा विसंवता ठावो,
ते भगवद्गीनता वोंविये गावों, ऐसें केलें ॥ १९ ॥

जे बोलणियाचे रानीं हिंडतां, नायकिजे फळलिया अक्षराची वार्ता,
परि ते वाचाचि केली कल्पलता, विवेकाची ॥ २० ॥

होती देहबुद्धी एकसरी, ते आनंदभांडारा केली वोवरी।
मन गीतार्थसागरीं, जळशयन जालें ॥ २१ ॥

ऐसें एकेक देवांचें करणें, तें अपार बोलों केवीं मी जाणें।
तऱ्ही अनुवादलों धीटपणें, ते उपसाहिजो जी ॥ २२ ॥

आतां आपुलेनि कृपाप्रसादें, मियां भगवद्गीरता वोंवीप्रबंधें।
पूर्वखंड विनोदें, वाखाणिलें ॥ २३ ॥

प्रथमीं अर्जुनाचा विषादु, दुजीं बोलिला योगु विशदु।
परि सांख्यबुद्धीसि भेदु, दाऊनियां ॥ २४ ॥

तिजीं केवळ कर्म प्रतिष्ठिलें, तेंचि चतुर्थीं ज्ञानेंशीं प्रगटिलें।
पंचमीं गव्हरिलें, योगतत्त्व ॥ २५ ॥

तेचि षष्ठामाजीं प्रगट, आसनालागोनि स्पष्ट।
जीवात्मभाव एकवट, होती जेणें ॥ २६ ॥

तैसी जे योगस्थिती, आणि योगभ्रष्टां जे गती।
तें आघवीचि उपपत्ती, सांगितली षष्ठीं ॥ २७ ॥

तयावरी सप्तमीं, प्रकृतिपरिहार उपक्रमीं।
करूनि भजती जे पुरुषोत्तमीं, ते बोलिले चाऱ्ही ॥ २८ ॥

पाठीं सप्तमींची प्रश्नसिद्धी, बोलोनि प्रयाणसमयसिद्धी।
एवं ते सकळवाक्यअवधि, अष्टमाध्यायीं ॥ २९ ॥

मग शब्दब्रह्मीं असंख्याकें, जेतुला कांहीं अभिप्राय पिके।
तेतुला महाभारतें एकें, लक्षें जोडे ॥ ३० ॥

तिये आघवांचि जें महाभारतीं, तें लाभे कृष्णार्जुनवाचोक्तीं।
आणि जो अभिप्रावो सातेंशतीं, तो एकलाचि नवमीं ॥ ३१ ॥

म्हणौनि नवमींचिया अभिप्राया, सहसा मुद्रा लावावया।
बिहाला मग मी वायां, गर्व कां करूं ? ॥ ३२ ॥

अहो गूळासाखरे मालयाचे, हे बांधे तरी एकाचि रसाचे।
परि स्वाद गोडियेचे, आनआन जैसे ॥ ३३ ॥

एक जाणोनियां बोलती, एक ठायें ठावो जाणविती।
एक जाणों जातां हारपती, जाणते गुणेंशीं ॥ ३४ ॥

हें ऐसें अध्याय गीतेचे, परि अनिर्वाच्यपण नवमाचें।
तो अनुवादलों हें तुमचें, सामर्थ्य प्रभू ॥ ३५ ॥

अहो एकाचि शाटी तपिन्नली, एकीं सृष्टीवरी सृष्टी केली।
एकीं पाषाणीं वाऊनि उतरलीं, समुद्रीं कटकें ॥ ३६ ॥

एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं चुळींचि सागरातें भरिलें।
तैसें मज मुकयाकरवीं बोलविलें, अनिर्वाच्य तुम्हीं ॥ ३७ ॥

परि हें असो एथ ऐसें, राम रावण झुंजिन्नले कैसे।
राम रावण जैसे, मीनले समरीं ॥ ३८ ॥

तैसें नवमीं कृष्णाचें बोलणें, तें नवमीचियाचि ऐसें मी म्हणें।
या निवाडा तत्त्वज्ञु जाणें, जया गीतार्थु हातीं ॥ ३९ ॥

एवं नवही अध्याय पहिले, मियां मतीसारिखे वाखाणिले।
आतां उत्तरखंड उवाइलें, ग्रंथाचें ऐका ॥ ४० ॥

जेथ विभूति प्रतिविभूती, प्रस्तुत अर्जुना सांगिजेती।
ते विदग्धा रसवृत्ती, म्हणिपैल कथा ॥ ४१ ॥

देशियेचेनि नागरपणें, शांतु शृंगारातें जिणें।
तरि ओंविया होती लेणें, साहित्यासि ॥ ४२ ॥

मूळ ग्रंथींचिया संस्कृता, वरि मऱ्हाठी नीट पढतां।
अभिप्राय मानलिया उचिता, कवण भूमी हें न चोजवे ॥ ४३ ॥

जैसें अंगाचेनि सुंदरपणें, लेणिया आंगचि होय लेणें।
तेथ अळंकारिलें कवण कवणें, हें निर्वचेना ॥ ४४ ॥

तैसी देशी आणि संस्कृत वाणी, एका भावार्थाच्या सोकासनीं।
शोभती आयणी, चोखट आइका ॥ ४५ ॥

उठावलिया भावा रूप, करितां रसवृत्तीचें लागे वडप।
चातुर्य म्हणे पडप, जोडलें आम्हां ॥ ४६ ॥

तैसें देशियेचें लावण्य, हिरोनि आणिलें तारुण्य।
मग रचिलें अगण्य, गीतातत्त्व ॥ ४७ ॥

जो चराचर परमगुरु, चतुर चित्तचमत्कारु।
तो ऐका यादवेश्वरु, बोलता जाहला ॥ ४८ ॥

ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे, ऐसें बोलिलें श्रीहरी तेणें।
अर्जुना आघवियाची मातु अंतःकरणें, धडौता आहासि ॥ ४९ ॥

  श्रीभगवानुवाचः भूय एव महाबाहो श्रृणु मे परमं वचः।
  यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया ॥ १॥

आम्हीं मागील जें निरूपण केलें, तें तुझें अवधानचि पाहिलें।
तवं टाचें नव्हें भलें, पुरतें आहे ॥ ५० ॥

घटीं थोडेसें उदक घालिजे, तेणें न गळे तरी वरिता भरिजे।
ऐसा परिसौनि पाहिलासि तंव परिसविजे, ऐसेंचि होतसे ॥ ५१ ॥

अवचितयावरी सर्वस्व सांडिजे, मग चोख तरी तोचि भांडारी कीजे।
तैसा किरीटी तूं आतां माझें, निजधाम कीं ॥ ५२ ॥

ऐसें अर्जुना येउतें सर्वेश्वरें, पाहोनि बोलिलें अत्यादरें।
गिरी देखोनि सुभरें, मेघु जैसा ॥ ५३ ॥

तैसा कृपाळुवांचा रावो, म्हणे आइकें गा महाबाहो।
सांगितलाचि अभिप्रावो, सांगेन पुढती ॥ ५४ ॥

पैं प्रतिवर्षीं क्षेत्र पेरिजे, पिकाची जंव जंव वाढी देखिजे।
यालागीं नुबगिजे, वाहो करितां ॥ ५५ ॥

पुढतपुढती पुटें देतां, जोडे वानियेची अधिकता।
म्हणौनि सोनें पंडुसुता, शोधूंचि आवडे ॥ ५६ ॥

तैसें एथ पार्था, तुज आभार नाहीं सर्वथा।
आम्ही आपुलियाचि स्वार्था, बोलों पुढती ॥ ५७ ॥

जैसें बाळका लेवविजे लेणें, तया शृंगारा बाळ काइ जाणे ?।
परि ते सुखाचे सोहळे भोगणें, माउलिये दिठी ॥ ५८ ॥

तैसें तुझें हित आघवें, जंव जंव कां तुज फावे।
तंव तंव आमुचें सुख दुणावे, ऐसें आहे ॥ ५९ ॥

आतां अर्जुना असो हे विकडी, मज उघड तुझी आवडी।
म्हणौनि तृप्तीची सवडी, बोलतां न पडे ॥ ६० ॥

आम्हां येतुलियाचि कारणें, तेंचि तें तुजशीं बोलणें।
परि असो हें अंतःकरणें, अवधान देईं ॥ ६१ ॥

तरी ऐकें गा सुवर्म, वाक्य माझें परम।
जें अक्षरें लेऊनी परब्रह्म, तुज खेंवासि आलें ॥ ६२ ॥

परी किरीटी तूं मातें, नेणसी ना निरुतें।
तरि तो गा जो मी एथें, तें विश्वचि हें ॥ ६३ ॥

  न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः।
  अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः ॥ २॥

एथ वेद मुके जाहाले, मन पवन पांगुळले।
रातीविण मावळले, रविशशी जेथ ॥ ६४ ॥

अगा उदरींचा गर्भु जैसा, न देखें आपुलिये मातेची वयसा।
मी आघवेया देवां तैसा, नेणवे कांहीं ॥ ६५ ॥

आणि जळचरां उदधीचें मान, मशका नोलांडवेचि गगन।
तेवीं महर्षींचें ज्ञान, न देखेचि मातें ॥ ६६ ॥

मी कवण पां केतुला, कवणाचा कैं जाहला।
या निरुती करितां बोला, कल्प गेले ॥ ६७ ॥

कां जे महर्षीं आणि या देवां, येरां भूतजातां सर्वां।
मी आदि म्हणौनि पांडवा, अवघड जाणतां ॥ ६८ ॥

उतरलें उदक पर्वत वळघे, जरी झाड वाढत मुळीं लागे।
तरी मियां जालेनि जगें, जाणिजे मातें ॥ ६९ ॥

कां गाभेवनें वटु गिंवसवे, जरी तरंगीं सागरू सांठवे।
कां परमाणूमाजीं सामावे, भूगोलु हा ॥ ७० ॥

तरी मियां जालिया जीवां, महर्षीं अथवा देवां।
मातें जाणावया होआवा, अवकाशु गा ॥ ७१ ॥

ऐसाही जरी विपायें, सांडूनि पुढीले पाये।
सर्वेंद्रियांसि होये, पाठिमोरा जो ॥ ७२ ॥

प्रवर्तलाही वेगीं बहुडे, देह सांडूनि मागलीकडे।
महाभूतांचिया चढे, माथयावरी ॥ ७३ ॥

  यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम्।
  असंमूढः स मर्त्येषु सर्वपापैः प्रमुच्यते ॥ ३॥

तैसा राहोनि ठायठिके, स्वप्रकाशें चोखें।
अजत्व माझें देखे, आपुलिया डोळां ॥ ७४ ॥

मी आदीसिं परु, सकळलोकमहेश्वरु।
ऐसिया मातें जो नरु, यापरी जाणें ॥ ७५ ॥

तो पाषाणांमाजीं परिसु, रसांमाजी सिद्धरसु।
तैसा मनुष्याकृति अंशु, तो माझाचि जाण ॥ ७६ ॥

तो चालतें ज्ञानाचें बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ,
परि माणुसपणाची भांब, लोकाचि भागु ॥ ७७ ॥

अगा अवचिता कापुरा-, माजीं सांपडला हिरा।
वरी पडिलिया नीरा, न निगे केवीं ॥ ७८ ॥

तैसा मनुष्यलोकाआंतु, तो जरी जाहला प्राकृतु।
तऱ्ही प्रकृतिदोषाची मातु, नेणिजे तेथ ॥ ७९ ॥

तो आपसयेंचि सांडिजे पापीं, जैसा जळत चंदनु सर्पीं,
तैसा मातें जाणें तो संकल्पीं, वर्जूनि घालिजे ॥ ८० ॥

तेंचि मातें कैसें जाणिजे, ऐसें कल्पी जरी चित्त तुझें।
तरी मी ऐसा हें माझें, भाव ऐकें ॥ ८१ ॥

जे वेगळालां भूतीं, सारिखे होऊनि प्रकृती।
विखुरले आहेती त्रिजगतीं, आघविये ॥ ८२ ॥

  बुद्धिर्ज्ञानमसंमोहः क्षमा सत्यं दमः शमः।
  सुखं दुःखं भवोऽभावो भयं चाभयमेव च ॥ ४॥

  अहिंसा समता तुष्टिस्तपो दानं यशोऽयशः।
  भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः ॥ ५॥

ते प्रथम जाण बुद्धी, मग ज्ञान जें निरवधी।
असंमोह सहनसिद्धी, क्षमा सत्य ॥ ८३ ॥

मग शम दम दोन्ही, सुख दुःख वर्तत जनीं।
अर्जुना भावाभाव मानीं, भावाचिमाजीं ॥ ८४ ॥

आतां भय आणि निर्भयता, अहिंसा आणि समता,
हे मम रुपची पांडुसुता, ओळख तू ॥ ८५ ॥

 दान यश अपकीर्ती, ते जे भाव सर्वत्र वसती।
ते मजचि पासूनि होती, भूतांचा ठायीं ॥ ८६ ॥

जैसीं भूतें आहाति सिनानीं, तैसेचि हेही वेगळाले मानीं।
एक उपजती माझां ज्ञानीं, एक नेणती मातें ॥ ८७ ॥

अगा प्रकाश आणि कडवसें, हें सूर्याचिस्तव जैसें।
प्रकाश उदयीं दिसे, तम अस्तुसीं ॥ ८८ ॥

आणि माझें जे जाणणें नेणणें, तें तंव भूतांचिया दैवाचें करणें।
म्हणौनि भूतीं भावाचें होणें, विषम पडे ॥ ८९ ॥

यापरी माझां भावीं, हे जीवसृष्टि आहे आघवी।
गुंतली असे जाणावी, पंडुकुमरा ॥ ९० ॥

आतां इये सृष्टीचे पालक, तयां आधीन वर्तती लोक।
ते अकरा भाव आणिक, सांगेन तुज ॥ ९१ ॥

  महर्षयः सप्त पूर्वे चत्वारी मनवस्तथा।
  मद्भषवा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः ॥ ६॥

तरी आघवांचि गुणीं वृद्ध, जे महर्षींमाजीं प्रबुद्ध।
कश्यपादि प्रसिद्ध, सप्त ऋषी ॥ ९२ ॥

आणिकही सांगिजतील, जे चौदा आंतील ।
स्वायंभू मुख्य मुद्दल, चारी मनु ॥ ९३ ॥

ऐसें हे अकरा, माझां मनीं जाहाले धनुर्धरा।
सृष्टीचिया व्यापारा-, लागोनियां ॥ ९४ ॥

जैं लोकांची व्यवस्था न पडे, जैं या त्रिभुवनाचे कांहीं न मांडे।
तैं महाभूतांचे दळवाडें, अचुंबित असे ॥ ९५ ॥

तैंचि हे जाहाले, इहीं लोकपाळ केले,
अध्यक्ष रचूनि ठेविले, इहीं जन ॥ ९६ ॥

म्हणौनि अकरा हे राजा, मग येर लोक यांचिया प्रजा।
ऐसा हा विस्तारु माझा, ओळख तूं ॥ ९७ ॥

पाहें पां आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बूड जाहालें, बुडीं कोंभ निघाले, खांदियांचे ॥ ९८ ॥

खांदियांपासूनि अनेका, पसरलिया शाखोपशाखा,
शाखांस्तव देखा, पल्लवपानें ॥ ९९ ॥

पल्लवीं फूल फळ, एवं वृक्षत्व जाहालें सकळ।
तें निर्धारितां केवळ, बीजचि तें ॥ १०० ॥

ऐसें मी एकचि पहिलें, मग मी तें मनातें व्यालें।
तेथ सप्तऋषि जाहाले, आणि चारी मनु ॥ १०१ ॥

इहीं लोकपाळ केले, लोकपाळीं विविध लोक सृजिले।
लोकांपासूनि निपजले, प्रजाजात ॥ १०२ ॥

ऐसेनि हें विश्व येथें, मीचि प्रसवला ना निरुतें।
परी भावाचेनि हातें, माने जया ॥ १०३ ॥

  एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः।
  सोऽविकंपेन योगेन युज्यते नात्र संशयः ॥ ७॥

यालागीं सुभद्रापती, हे भाव इया माझिया विभूती।
आणि यांचिया व्याप्ती, व्यापिलें विश्व ॥ १०४ ॥

म्हणोनि गा यापरी, ब्रह्मादिपिपीलिकावरी।
मीवांचूनि दुसरी, गोठी नाहीं ॥ १०५ ॥

ऐसें जाणे जो साचें, तया चेइरें जाहालें ज्ञानाचें।
म्हणोनि उत्तम मध्यम भेदाचें, दुःस्वप्न तयां ॥ १०६ ॥

मी माझिया विभूती, विभूतीं अधिष्ठिलिया व्यक्ती।
हें आघवें योगप्रतीती, एकचि मानी ॥ १०७ ॥

म्हणोनि निःशंकें येणें महायोगें, मज मीनला मनाचेनि आंगें।
एथ संशय करणें न लगे, तो त्रिशुद्धी जाहला ॥ १०८ ॥

कां जे ऐसें किरीटी, मातें भजे जो अभेदा दिठी।
तयाचिये भजनाचिये नाटीं, सूती मज ॥ १०९ ॥

म्हणऊनि अभेदें जो भक्तियोगु, तेथ शंका नाहीं नये खंगु।
करितां ठेला तरी चांगु, तें सांगितलें षष्ठीं ॥ ११० ॥

तोचि अभेदु कैसा, हें जाणावया मानसा।
साद जाली तरी परियेसा, बोलिजेल ॥ १११ ॥

  अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते।
  इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः ॥ ८॥

तरि मीचि एक सर्वां, या जगा जन्म पांडवा।
आणि मजचिपासूनि आघवा, निर्वाहो यांचा ॥ ११२ ॥

कल्लोळमाळा अनेगा, जन्म जळींचि पैं गा।
आणि तयां जळचि आश्रयो तरंगा, जीवनही जळ ॥ ११३ ॥

ऐसें आघवांचि ठायीं, तया जळचि जेविं पाहीं।
तैसा मीवांचूनि नाहीं, विश्वीं इये ॥ ११४ ॥

ऐसिया व्यापका मातें, मानूनि जे भजती भलतेथें।
परि साचोकारें उदितें, प्रेमभावें ॥ ११५ ॥

देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न।
जैसा वायु होऊन गगन, गगनींचि विचरे ॥ ११६ ॥

ऐसेनि जे निजज्ञानी, खेळत सुखें त्रिभुवनीं।
जगद्रूपा मनीं, सांठऊनि मातें ॥ ११७ ॥

जें जें भेटे भूत, तें तें मानिजे भगवंत।
हा भक्तियोगु निश्चित, जाण माझा ॥ ११८ ॥

  मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परम्।
  कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च ॥ ९॥

चित्तें मीचि जाहाले, मियांचि प्राणें धाले।
जीवों मरों विसरले, बोधाचिया भुली ॥ ११९ ॥

मग तया बोधाचेनि माजे, नाचती संवादसुखाचीं भोजें।
आतां एकमेकां घेपे दीजे, बोधचि वरी ॥ १२० ॥

जैशीं जवळिकेंचीं सरोवरें, उचंबळलिया कालवती परस्परें।
मग तरंगासि धवळारें, तरंगचि होती ॥ १२१ ॥

तैसी येरयेरांचिये मिळणी, पडत आनंदकल्लोळांची वेणी।
तेथ बोध बोधाचीं लेणीं, बोधेंचि मिरवी ॥ १२२ ॥

जैसें सूर्यें सूर्यातें वोंवाळिलें, कीं चंद्रें चंद्रम्या क्षेम दिधलें।
ना तरी सरिसेनि पाडें मीनले, दोनी वोघ ॥ १२३ ॥

तैसें प्रयाग होत सामरस्याचें, वरी वोसाण तरत सात्त्विकाचें।
ते संवादचतुष्पथींचे, गणेश जाहले ॥ १२४ ॥

तेव्हां तया महासुखाचेनि भरें, धांवोनि देहाचिये गांवाबाहेरें।
मियां धाले तेणें उद्गारें, लागती गाजों ॥ १२५ ॥

पैं गुरुशिष्यांचां एकांतीं, जे अक्षरा एकाची वदंती।
ते मेघाचियापरी त्रिजगतीं, गर्जती सैंघ ॥ १२६ ॥

जैसी कमळकळिका जालेपणें, हृदयींचिया मकरंदातें राखों नेणें।
दे राया रंका पारणें, आमोदाचें ॥ १२७ ॥

तैसेंचि मातें विश्वीं कथित, कथितेनि तोषें कथूं विसरत।
मग तया विसरामाजीं विरत, आंगें जीवें ॥ १२८ ॥

ऐसें प्रेमाचेनि बहुवसपणें, नाहीं राती दिवो जाणणें।
केलें माझें सुख अव्यंगवाणें, आपणपेयां जिहीं ॥ १२९ ॥

  तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम्।
  ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते ॥ १०॥

तयां मग जें आम्ही कांहीं, द्यावें अर्जुना पाहीं।
ते ठायींचीच तिहीं, घेतली सेल ॥ १३० ॥

कां जे ते जिया वाटा, निगाले गा सुभटा।
ते सोय पाहोनि अव्हांटा, स्वर्गापवर्ग ॥ १३१ ॥

म्हणोनि तिहीं जें प्रेम धरिलें, तेंचि आमुचें देणें उपाइलें।
परि आम्हीं देयावें हेंहि केलें, तिहींची म्हणियें ॥ १३२ ॥

आतां यावरी येतुलें घडे, जें तेंचि सुख आगळें वाढें।
आणि काळाची दिठी न पडे, हें आम्हां करणें ॥ १३३ ॥

लळेयाचिया बाळका किरीटी, गवसणी करूनि स्नेआहाचिया दिठी, जैसी खेळतां पाठोपाठीं, माउली धांवे ॥ १३४ ॥

तें जो जो खेळ दावी, तो तो पुढें सोनयाचा करूनि ठेवी।
तैसी उपास्तीची पदवी, पोषित मी जायें ॥ १३५ ॥

जिये पदवीचेनि पोषकें, ते मातें पावती यथासुखें।
हे पाळती मज विशेखें, आवडे करूं ॥ १३६ ॥

पैं गा भक्तासि माझें कोड, मज तयाचे अनन्यगतीची चाड।
कां जे प्रेमळांचें सांकड, आमुते घरीं ॥ १३७ ॥

पाहें पां स्वर्ग मोक्ष उपायिले, दोन्ही मार्ग तयाचिये वाहणी केले, आम्हीं आंगही शेखीं वेंचिलें, लक्ष्मियेसीं ॥ १३८ ॥

परि आपणपेंवीण जें एक, तें तैसेंचि सुख साजुक।
सप्रेमळालागीं देख, ठेविलें जतन ॥ १३९ ॥

हा ठायवरी किरीटी, आम्ही प्रेमळु घेवों आपणपयासाठीं।
या बोलीं बोलिजत गोष्टी, तैसिया नव्हती गा ॥ १४० ॥

  तेषामेवानुकम्पार्थमहमज्ञानजं तमः।
  नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता ॥ ११॥

म्हणोनि मज आत्मयाचा भावो, जिहीं जियावया केला ठावो।
एक मीवांचूनि वावो, येर मानिलें जिहीं ॥ १४१ ॥

तयां तत्त्वज्ञां चोखटां, दिवी पोतासाची सुभटा।
मग मीचि होऊनि दिवटा, पुढां पुढां चालें ॥ १४२ ॥

अज्ञानाचिये राती-, माजीं तमाचि मिळणी दाटती।
ते नाशूनि घालीं परौती, करीं नित्योदयो ॥ १४३ ॥

ऐसें प्रेमळाचेनि प्रियोत्तमें, बोलिलें जेथ पुरुषोत्तमें।
तेथ अर्जुन मनोधर्में, निवालों म्हणतसे ॥ १४४ ॥

अहो जी अवधारा, भला केरु फेडिला संसारा।
जाहलों जननीजठरजोहरा-, वेगळा प्रभू ॥ १४५ ॥

जी जन्मलेपण आपुलें, हें आजि मियां डोळां देखिलें।
जीवित हातां चढलें, आवडतसें ॥ १४६ ॥

आजि आयुष्या उजवण जाहली, माझिया दैवा दशा उदयली।
जे वाक्यकृपा लाधली, दैविकेनि मुखें ॥ १४७ ॥

आतां येणें वचन तेजाकारें, फिटलें आंतील बाहेरील आंधारें।
म्हणोनि देखतसें साचोकारें, स्वरूप तुझें ॥ १४८ ॥

  अर्जुन उवाच, परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान्।
  पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुम् ॥ १२॥

तरी होसी गा तूं परब्रह्म, जें या महाभूतां विसंवतें धाम।
पवित्र तूं परम, जगन्नाथा ॥ १४९ ॥

तूं परम दैवत तिहीं देवां, तूं पुरुष जी पंचविसावा।
दिव्य तूं प्रकृतिभावा-, पैलीकडील ॥ १५० ॥

अनादिसिद्ध तूं स्वामी, जो नाकळिजसी जन्मधर्मीं।
तो तूं हें आम्ही, जाणितलें आतां ॥ १५१ ॥

तूं या कालयंत्रासि सूत्री, तूं जीवकळेची अधिष्ठात्री।
तूं ब्रह्मकटाहधात्री, हें कळलें फुडें ॥ १५२ ॥

  आहुस्त्वामृषयः सर्वे देवर्षिनारदस्तथा।
  असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे ॥ १३॥

पैं आणिकही एक परी, इये प्रतीतीची येतसे थोरी।
जे मागें ऐसेंचि ऋषीश्वरीं, सांगितलें तूंतें ॥ १५३ ॥

परि तया सांगितलियाचें साचपण, हें आतां माझें देखतसे अंतःकरण, जे कृपा केली आपण, म्हणोनि देवा ॥ १५४ ॥

एऱ्हवीं नारदु अखंड जवळां ये, तोही ऐसेंचि वचनीं गाये।
परि अर्थ न बुजोनि ठाये, गीतसुखचि ऐकों ॥ १५५ ॥

जी आंधळेयांचां गांवीं, आपणपें प्रगटलें रवी।
तरी तिहीं वोतपलीचि घ्यावी, वांचूनि प्रकाशु कैंचा ? ॥ १५६ ॥

येरवीं देवर्षि अध्यात्म गातां, आहाच रागांगेंसीं जे मधुरता।
तेचि फावे येर चित्ता, नलगेचि कांहीं ॥ १५७ ॥

पैं असिता देवलाचेनिहि मुखें, मी एवंविधा तूंतें आइकें।
परी तैं बुद्धि विषयविखें, घारिली होती ॥ १५८ ॥

विषयविषाचा पडिपाडू, गोड परमार्थु लागे कडू।
कडू विषय तो गोडू, जीवासी जाहला ॥ १५९ ॥

आणि हें आणिकांचें काय सांगावें, राउळा आपणचि येऊनि व्यासदेवें, तुझें स्वरूप आघवें, सर्वदा सांगिजे ॥ १६० ॥

परि तो अंधारीं चिंतामणि देखिला, जेवीं नव्हे या बुद्धी उपेक्षिला, पाठीं दिनोदयीं वोळखिला, होय म्हणौनि ॥ १६१ ॥

तैसीं व्यासादिकांचीं बोलणीं, तिया मजपाशीं चिद्रत्नांंचिया खाणी, परि उपेक्षिल्या जात होतीया तरणी, तुजवीण कृष्णा ॥ १६२ ॥

  सर्वमेतदृतं मन्ये यन्मां वदसि केशव।
  न हि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवा न दानवाः ॥ १४॥

ते आतां वाक्यसूर्यकर तुझे फांकले, आणि ऋषीं मार्ग होते जे कथिले।
तयां आघवियांचेंचि फिटलें, अनोळखपण ॥ १६३ ॥

जी ज्ञानाचें बीज तयांचे बोल, माजीं हृदयभूमिके पडिले सखोल, वरि इये कृपेची जाहाली वोल, म्हणोनि संवादफळेंशीं उठलें ॥ १६४ ॥

अहो नारदादिकां संतां, त्यांचिया उक्तिरूप सरिता।
मी महोदधीं जालां अनंता, संवादसुखाचा ॥ १६५ ॥

प्रभु आघवेनि येणें जन्में, जियें पुण्यें केलीं मियां उत्तमें।
तयांचीं न ठकतीचि अंगीं कामें, सद्गुुरु तुवां ॥ १६६ ॥

एऱ्हवीं वडिलवडिलांचेनि मुखें, मी सदां तूंतें कानीं आइकें।
परि कृपा न कीजेचि तुवां एकें, तंव नेणवेचि कांहीं ॥ १६७ ॥

म्हणोनि भाग्य जैं सानुकूळ, जालिया केले उद्यम सदां सफळ।
तैसें श्रुताधीत सकळ, गुरुकृपा साच ॥ १६८ ॥

जी बनकरु झाडें सिंपी जीवेंसाटीं, पाडूनि जन्में काढी आटी।
परि फळेंसी तैंचि भेटी, जैं वसंतु पावे ॥ १६९ ॥

अहो विषमा जैं वोहट पडे, तैं मधुर तें मधुर आवडे।
पैं रसायनें तैं गोडें, जैं आरोग्य देहीं ॥ १७० ॥

कां इंद्रियें वाचा प्राण, यां जालियांचे तैंचि सार्थकपण।
जैं चैतन्य येऊनि आपण, संचरे माजीं ॥ १७१ ॥

तैसें शब्दजात आलोडिलें, अथवा योगादिक जें अभ्यासिलें।
तें तैंचि म्हणों ये आपुलें, जैं सानुकूल गुरु ॥ १७२ ॥

ऐसिये जालिये प्रतीतीचेनि माजें, अर्जुन निश्चयाचि नाचतुसें भोजें, तेवींचि म्हणे देवा तुझें, वाक्य मज मानलें ॥ १७३ ॥

तरि साचचि हें कैवल्यपती, मज त्रिशुद्धी आली प्रतीती।
जे तूं देवदानवांचिये मती-, जोगा नव्हसी ॥ १७४ ॥

तुझें वाक्य व्यक्ती न येतां देवा, जो आपुलिया जाणे जाणिवा।
तो कहींचि नोहे हें सद्भा वा, भरंवसेनि आलें ॥ १७५ ॥

  स्वयमेवात्मनात्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम।
  भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते ॥ १५॥

एथ आपुलें वाडपण जैसें, आपणचि जाणिजे आकाशें।
कां मी येतुली घनवट ऐसें, पृथ्वीचि जाणे ॥ १७६ ॥

तैसा आपुलिये सर्वशक्ती, तुज तूंचि जाणूं लक्ष्मीपती।
येर वेदादिक मती, मिरवती वायां ॥ १७७ ॥

हां गा मनातें मागां सांडावें, पवनातें वावीं मवावें।
आदिशून्य उतरोनि जावें, केउतें बाहीं ॥ १७८ ॥

तैसें हें तुझें जाणणें आहे, म्हणोनि कोणाही ठाकतें नोहे।
आतां तुझें ज्ञान होये, तुजचिजोगें ॥ १७९ ॥

जी आपणपयातें तूंचि जाणसी, आणिकातें सांगावयाही तूं समर्थ होसी।
तरी आतां एक वेळ घाम पुसीं, आर्तीचिये निडळींचा ॥ १८० ॥

हें आइकिलें कीं भूतभावना, त्रिभुवनगजपंचानना, सकळदेवदेवतार्चना, जगन्नायका ॥ १८१ ॥

जरी थोरी तुझी पाहात आहों, तरी पासीं उभे ठाकावयाही योग्य नोहों।
या शोच्यता जरी विनवूं बिहों, तरी आन उपायो नाहीं ॥ १८२ ॥

भरले समुद्रसरिता चहूंकडे, परि ते बापियासि कोरडे।
कां जैं मेघौनि थेंबुटा पडे, तैं पाणी कीं तया ॥ १८३ ॥

तैसे गुरु जी सर्वत्र आथी, परि कृष्णा आम्हां तूंचि गती।
हें असो मजप्रती, विभूती सांगें ॥ १८४ ॥

  वक्तुमर्हस्यशेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः।
  याभिर्विभूतिर्लोकानिमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि ॥ १६॥

जी तुझिया विभूती आघविया, परि व्यापिती शक्ति दिव्या जिया, तिया आपुलिया दावाविया, आपण मज ॥ १८५ ॥

जिहीं विभूतीं ययां समस्तां, लोकांतें व्यापूनि आहाती अनंता।
तिया प्रधाना नामांकिता, प्रगटा करीं ॥ १८६ ॥

  कथं विद्यामहं योगिंस्त्वां सदा परिचिन्तयन्।
  केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया ॥ १७॥

जी कैसें मियां तूंतें जाणावें, काय जाणोनि सदा चिंतावें।
जरी तूंचि म्हणों आघवें, तरि चिंतनचि न घडे ॥ १८७ ॥

म्हणोनि मागां भाव जैसे, आपुले सांगितले तुवां उद्देशें।
आतां विस्तारोनि तैसे, एक वेळ बोलें ॥ १८८ ॥

जयां जयां भावाचां ठायीं, तूंतें चिंतितां मज सायासु नाहीं।
तो विवळ करूनि देईं, योगु आपुला ॥ १८९ ॥

  विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन।
  भूयः कथय तृप्तिर्हि श्रृण्वतो नास्ति मेऽमृतम् ॥ १८॥

आणि पुसलिया जिया विभूती, त्याही बोलाविया भूतपती।
येथ म्हणसी जरी पुढती, काय सांगों ॥ १९० ॥

तरी हा भाव मना, झणें जाय हो जनार्दना।
पैं प्राकृताही अमृतपाना, ना न म्हणवे जी ॥ १९१ ॥

जे काळकूटाचें सहोदर, जें मृत्यूभेणें प्याले अमर।
तरि दिहाचे पुरंदर, चौदा जाती ॥ १९२ ॥

ऐसा कवण एक क्षीराब्धीचा रसु, जया वायांचि अमृतपणाचा आभासु, तयाचाही मीठांशु, जे पुरे म्हणों नेदी ॥ १९३ ॥

तया पाबळेयाही येतुलेवरी, गोडियेचि आथि थोरी।
मग हें तंव अवधारीं, परमामृत साचें ॥ १९४ ॥

जें मंदराचळु न ढाळितां, क्षीरसागरु न डहुळितां।
अनादि स्वभावता, आइतें आहे ॥ १९५ ॥

जें द्रव ना नव्हे बद्ध, जेथ नेणिजती रस गंध।
जें भलतयांही सिद्ध, आठवलेंचि फावे ॥ १९६ ॥

जयाची गोठीचि ऐकतखेंवो, आघवा संसारु होय वावो।
बळिया नित्यता लागे येवों, आपणपेंया ॥ १९७ ॥

जन्ममृत्यूची भाख, हारपोनि जाय निःशेख।
आंत बाहेरी महासुख, वाढोंचि लागे ॥ १९८ ॥

मग दैवगत्या जरी सेविजे, तरी तें आपणचि होऊनि ठाकिजे।
तें तुज देतां चित्त माझें, पुरें म्हणों न शके ॥ १९९ ॥

तवं तुझें नामचि आम्हां आवडे, वरि भेटी होय आणि जवळिक जोडे, पाठीं गोठी सांगसी सुरवाडें, आनंदाचेनी ॥ २०० ॥

आतां हें सुख कायिसयासारिखें, कांहीं निर्वचेना मज परितोखें।
तरि येतुलें जाणें जे येणें मुखें, पुनरुक्तही हो ॥ २०१ ॥

हां गा सूर्य काय शिळा ?, अग्नि म्हणों येत आहे वोंविळा।
कां नित्य वाहातया गंगाजळा, पारसेपण असे ॥ २०२ ॥

तुंवा स्वमुखें जें बोलिलें, हें आम्हीं नादासि रूप देखिलें।
आजि चंदनतरूचीं फुलें, तुरंबीत आहों मां ॥ २०३ ॥

या पार्थाचिया बोला, सर्वांगें कृष्ण डोलला।
म्हणे भक्तिज्ञानासि जाहला, आगरु हा ॥ २०४ ॥

ऐसा पतिकराचिया तोषा आंतु, प्रेमाचा वेगु उचंबळतु।
सायासें सांवरूनि अनंतु, काय बोले ॥ २०५ ॥

  श्रीभगवानुवाच, हन्त ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः,
  प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे ॥ १९॥

मी पितामहाचा पिता, हें आठवितांही नाठवे चित्ता।
कीं म्हणतसे बा पंडुसुता, भलें केलें ॥ २०६ ॥

अर्जुनातें बा म्हणे एथ कांहीं, आम्हां विस्मो करावया कारण नाहीं, आंगें तो लेंकरूं काई, नव्हेचि नंदाचें ॥ २०७ ॥

परि प्रस्तुत ऐसें असो, हें करवी आवडीचा अतिसो।
मग म्हणे आइकें सांगतसों, धनुर्धरा ॥ २०८ ॥

तरी तुवां पुसलिया विभूती, तयांचें अपारपण सुभद्रापती।
ज्या माझियाचि परि माझिये मती, आकळती ना ॥ २०९ ॥

आंगींचिया रोमा किती, जयाचिया तयासि न गणवती।
तैसिया माझिया विभूती, असंख्य मज ॥ २१० ॥

एऱ्हवीं तरी मी कैसा केवढा, म्हणोनि आपणपयांही नव्हेचि फुडा, यालागीं प्रधाना जिया रूढा, तिया विभूती आइकें ॥ २११ ॥

जिया जाणतलियासाठीं, आघवीया जाणितलिया होती किरीटी, जैसें बीज आलिया मुठीं, तरूचि आला होय ॥ २१२ ॥

कां उद्यान हाता चढिलें, तरी आपैसीं सांपडलीं फळें फुलें।
तेवीं देखिलिया जिया देखवलें, विश्व सकळ ॥ २१३ ॥

एऱ्हवीं साचचि गा धनुर्धरा, नाहीं शेवटु माझिया विस्तारा।
पैं गगना ऐशिया अपारा, मजमाजीं लपणें ॥ २१४ ॥

  अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः।
  अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च ॥ २०॥

आइकें कुटिलालकमस्तका, धनुर्वेदत्र्यंबका।
मी आत्मा असें एकैका, भूतमात्राचां ठायीं ॥ २१५ ॥

आंतुलीकडे मीचि यांचा अंतःकरणीं, भूतांबाहेरी माझीच गंवसणी, आदि मी निर्वाणीं, मध्यही मीचि ॥ २१६ ॥

जैसें मेघां या तळीं वरी, एक आकाशचि आंत बाहेरी।
आणि आकाशींचि जाले अवधारीं, असणेंही आकाशीं ॥ २१७ ॥

पाठीं लया जे वेळीं जाती, ते वेळीं आकाशचि होऊनि ठाती।
तेवीं आदि स्थिती अंतगती, भूतांसि मी ॥ २१८ ॥

ऐसें बहुवस आणि व्यापकपण, माझें विभूतियोगें जाण।
तरी जीवचि करूनि श्रवण, आइकोनि आइक ॥ २१९ ॥

याहीवरी त्या विभूती, सांगणें ठेलें तुजप्रति।
सांगेन म्हणितलें तुज प्रीती, त्या प्रधाना आइकें ॥ २२० ॥

  आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान।
  मरीचिर्मरुतानामस्मि नक्षत्राणामहं शशी ॥ २१॥

हें बोलोनि तो कृपावंतु, म्हणे विष्णु मी आदित्यांआंतु।
रवी मी रश्मिवंतु, सुप्रभांमाजीं ॥ २२१ ॥

मरूद्गीणांच्या वर्गीं, मरीचि म्हणे मी शारङ्गी।
चंद्र मी गगनरंगीं, तारांमाजीं ॥ २२२ ॥

  वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः।
  इन्द्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना ॥ २२॥

वेदांआंतु सामवेदु, तो मी म्हणे गोविंदु।
देवांमाजी मरुद्बंसधु, महेंद्र तो मी ॥ २२३ ॥

इंद्रियांआंतु अकरावें, मन तें मी हें जाणावें।
भूतांमाजी स्वभावें, चेतना ते मी ॥ २२४ ॥

रुद्राणां शंकरश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसाम्।
वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखरिणामहम् ॥ २३॥

अशेषांही रुद्रांमाझारीं, शंकर जो मदनारी।
तो मी येथ न धरीं , भ्रांति कांहीं ॥ २२५ ॥

यक्षरक्षोगणांआंतु, शंभूचा सखा जो धनवंतु।
तो कुबेरु मी हें अनंतु, म्हणता जाहला ॥ २२६ ॥

मग आठांही वसूंमाझारीं, पावकु तो मी अवधारीं।
शिखराथिलियां सर्वोपरी, मेरु तो मी ॥ २२७ ॥

  पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिम्।
  सेनानीनामहं स्कन्दः सरसामस्मि सागरः ॥ २४॥

  महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम्।
  यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः ॥ २५॥

जो स्वर्गसिंहासना सावावो, सर्वज्ञते आदीचा ठावो।
तो पुरोहितांमाजीं रावो, बृहस्पती मी ॥ २२८ ॥

त्रिभुवनींचिया सेनापतीं-, आंत स्कंदु तो मी महामती।
जो हरवीर्यें अग्निसंगती, कृत्तिकाआंतु जाहला ॥ २२९ ॥

सकळिकां सरोवरांसी, माजीं समुद्र तो मी जळराशी।
महर्षींआंतु तपोराशी, भृगु तो मी ॥ २३० ॥

अशेषांही वाचा, आंतु नटनाच सत्याचा।
तें अक्षर एक मी वैकुंठींचा, वेल्हाळु म्हणे ॥ २३१ ॥

समस्तांही यज्ञांचा पैकीं, जपयज्ञु तो मी ये लोकीं।
जो कर्मत्यागें प्रणवादिकीं, निफजविजे ॥ २३२ ॥

नामजपयज्ञु तो परम, बाधूं न शके स्ना नादि कर्म।
नामें पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थें ॥ २३३ ॥

स्थावरां गिरीवरां आंतु, पुण्यपुंज जो हिमवंतु।
तो मी म्हणे कांतु, लक्ष्मियेचा ॥ २३४ ॥

  अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः।
  गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः ॥ २६॥

  उच्चैःश्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्भिवम्।
  ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम् ॥ २७॥

कल्पद्रुम हन पारिजातु, गुणें चंदनुही वाड विख्यातु।
तरि ययां वृक्षजातां आंतु, अश्वत्थु तो मी ॥ २३५ ॥

देवऋषींआंतु पांडवा, नारदु तो मी जाणावा।
चित्ररथु मी गंधर्वां, सकळिकांमाजीं ॥ २३६ ॥

ययां अशेषांही सिद्धां-, माजीं कपिलाचार्यु मी प्रबुद्धा।
तुरंगजातां प्रसिद्धां-, आंत उचैःश्रवा मी ॥ २३७ ॥

राजभूषण गजांआंतु, अर्जुना मी गा ऐरावतु।
पयोराशी सुरमथितु, अमृतांशु तो मी ॥ २३८ ॥

ययां नरांमाजीं राजा, तो विभूतिविशेष माझा।
जयातें सकळ लोक प्रजा, होऊनि सेविती ॥ २३९ ॥

  आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक्।
  प्रजनश्चास्मि कन्दर्पः सर्पाणामस्मि वासुकिः ॥ २८॥

  अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम्।
  पितृणामर्यमा चास्मि यमः संयमतामहम् ॥ २९॥

पैं आघवेयां हातियेरां, आंत वज्र तें मी धनुर्धरा।
जें शतमखोत्तीर्णकरा, आरूढोनि असे ॥ २४० ॥

धेनूंमध्यें कामधेनु, तें मी म्हणे विष्वक्सेनु।
जन्मवितयांआंत मदनु, तो मी जाणें ॥ २४१ ॥

सर्पकुळाआंत अधिष्ठाता, वासुकी गा मी कुंतीसुता।
नागांमाजीं समस्तां, अनंतु तो मी ॥ २४२ ॥

अगा यादसांआंतु, जो पश्चिमप्रमदेचा कांतु।
तो वरुण मी हें अनंतु, सांगत असे ॥ २४३ ॥

आणि पितृगणां समस्तां-, माजीं अर्यमा जो पितृदेवता।
तो मी हें तत्त्वता, बोलत आहें ॥ २४४ ॥

जगाचीं शुभाशुभें लिहिती, प्राणियांच्या मानसांचा झाडा घेती।
मग केलियानुरूप होती, भोगनियम जे ॥ २४५ ॥

तयां नियमितयांमाजीं यमु, जो कर्मसाक्षी धर्मु।
तो मी म्हणे रामु, रमापती ॥ २४६ ॥

  प्रल्हादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहम्।
  मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम् ॥ ३०॥

अगा दैत्यांचिया कुळीं, प्रल्हादु तो मी न्याहाळीं।
म्हणौनि दैत्यभावादिमेळीं, लिंपेचिना ॥ २४७ ॥

पैं कळितयांमाजीं महाकाळु, तो मी म्हणे गोपाळु।
श्वापदांमाजीं शार्दूळु, तो मी जाण ॥ २४८ ॥

पक्षिजातिमाझारीं, गरुड तो मी अवधारीं।
यालागीं जो पाठीवरी, वाहों शके मातें ॥ २४९ ॥

  पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहम्।
  झषाणां मकरश्चास्मि स्त्रोतसामस्मि जान्हवी ॥ ३१॥

पृथ्वीचिया पैसारा-, माजीं घडीं न लगतां धनुर्धरा।
एकेचि उड्डाणें सातांहि सागरां, प्रदक्षिणा करी जो ॥ २५० ॥

तयां वहिलियां गतिमंतां-, आंत पवनु तो मी पांडुसुता।
शस्त्रधरां समस्तां-, माजीं श्रीराम तो मी ॥ २५१ ॥

जेणें सांकडलिया धर्माचेन कैवारें, आपणपयां धनुष्य करूनि दुसरें।
विजयलक्ष्मीये एक मोहरें, केलें त्रेतीं ॥ २५२ ॥

पाठीं उभे ठाकूनि सुवेळीं, प्रतापलंकेश्वराचीं सिसाळीं।
गगनीं उदो म्हणतया हस्तबळीं, दिधली भूतां ॥ २५३ ॥

जेणें देवांचा मानु गिंवसिला, धर्मासि जीर्णोद्धारु केला।
सूर्यवंशीं उदेला, सूर्य जो कां ॥ २५४ ॥

तो हातियेरुपरजितया आंतु, रामचंद्र मी जानकीकांतु।
मकर मी पुच्छवंतु, जळचरांमाजीं ॥ २५५ ॥

पैं समस्तांही वोघां-, मध्यें जे भगीरथें आणितां गंगा।
जन्हूनें गिळिली मग जंघा, फाडूनि दिधली ॥ २५६ ॥

ते त्रिभूवनैकसरिता, जान्हवी मी पांडुसुता।
जळप्रवाहां समस्तां-, माझारीं जाणें ॥ २५७ ॥

ऐसेनि वेगळालां सृष्टीपैकीं, विभूती नाम सूतां एकेकीं।
सगळेन जन्मसहस्रें अवलोकीं, अर्ध्या नव्हती ॥ २५८ ॥

  सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन।
  अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम् ॥ ३२॥

  अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च।
  अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतोमुखः ॥ ३३॥

जैसीं अवघींचि नक्षत्रें वेंचावीं, ऐसी चाड उपजेल जैं जीवीं।
तैं गगनाची बांधावी, लोथ जेवीं ॥ २५९ ॥

कां पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा, तरि भूगोलुचि काखे सुवावा।
तैसा विस्तारु माझा पहावा, तरि जाणावें मातें ॥ २६० ॥

जैसें शाखांसी फूल फळ, एकिहेळां वेटाळूं म्हणिजे सकळ।
तरी उपडूनियां मूळ, जेवीं हातीं घेपे ॥ २६१ ॥

तेवीं माझें विभूतिविशेष, जरी जाणों पाहिजेती अशेष।
तरी स्वरूप एक निर्दोष, जाणिजे माझें ॥ २६२ ॥

एऱ्हवीं वेगळालिया विभूती, कायिएक परिससी किती।
म्हणोनि एकिहेळां महामती, सर्व मी जाण ॥ २६३ ॥

मी आघवियेचि सृष्टी, आदिमध्यांतीं किरीटी।
ओतप्रोत पटीं, तंतु जेवीं ॥ २६४ ॥

ऐसिया व्यापका मातें जैं जाणावें, तैं विभूतिभेदें काय करावें।
परि हे तुझी योग्यता नव्हे, म्हणोनि असो ॥ २६५ ॥

कां जे तुवां पुसिलिया विभूती, म्हणोनि तिया आईक सुभद्रापती।
तरी आतां विद्यांमाजीं प्रस्तुतीं, अध्यात्मविद्या ते मी ॥ २६६ ॥

अगा बोलतयांचिया ठायीं, वादु तो मी पाहीं।
जो सकलशास्त्रसंमतें कहीं, सरेचिना ॥ २६७ ॥

जो निर्वचूं जातां वाढे, आइकतयां उत्प्रेक्षे सळु चढे।
जयावरी बोलतयांचीं गोडें, बोलणीं होतीं ॥ २६८ ॥

ऐसा प्रतिपादनामाजीं वादु, तो मी म्हणे गोविंदु।
अक्षरांमाजीं विशदु, अकारु तो मी ॥ २६९ ॥

पैं गा समासांमाझारीं, द्वंद्व तो मी अवधारीं।
मशकालागोनि ब्रह्मावेरीं, ग्रासिता तो मी ॥ २७० ॥

मेरुमंदरादिकीं सर्वीं, सहित पृथ्वीतें विरवी।
जो एकार्णवातेंही जिरवी, जेथिंचा तेथें ॥ २७१ ॥

जो प्रळयतेजा देत मिठी, सगळिया पवनातें गिळी किरीटी।
आकाश जयाचिया पोटीं, सामावलें ॥ २७२ ॥

ऐसा अपार जो काळु, तो मी म्हणे लक्ष्मीलीळु।
मग पुढती सृष्टीचा मेळु, सृजिता तो मी ॥ २७३ ॥

  मृत्युः सर्वहरश्चाहमुद्भमवश्च भविष्यताम्।
  कीर्तिः श्रीर्वाक् च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा ॥ ३४॥

आणि सृजिलिया भूतांतें मीचि धरीं, सकळां जीवनही मीचि अवधारीं।
शेखीं सर्वांतें या संहारीं, तेव्हां मृत्युही मीचि ॥ २७४ ॥

आतां स्त्रीगणांचां पैकीं, माझिया विभूती सात आणिकी।
तिया ऐक कवतिकीं, सांगिजतील ॥ २७५ ॥

तरी नीच नवी जे कीर्ति, अर्जुना ते माझी मूर्ती।
आणि औदार्येंसी जे संपत्ती, तेही मीचि जाणें ॥ २७६ ॥

आणि ते गा मी वाचा, जे सुखासनीं न्यायाचा।
आरूढोनि विवेकाचा, मार्गीं चाले ॥ २७७ ॥

देखिलेनि पदार्थें, जे आठवूनि दे मातें।
ते स्मृतिही पैं एथें, त्रिशुद्धी मी ॥ २७८ ॥

पैं स्वहिता अनुजायिनी, मेधा ते गा मी इये जनीं।
धृती मी त्रिभुवनीं, क्षमा ते मी ॥ २७९ ॥

एवं नारींमाझारीं, या सातही शक्ति मीचि अवधारीं।
ऐसें संसारगजकेसरी, म्हणता जाहला ॥ २८० ॥

  बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम्।
  मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः ॥ ३५॥

वेदराशीचिया सामा-, आंत बृहत्साम जें प्रियोत्तमा।
तें मी म्हणे रमा-, प्राणेश्वरु ॥ २८१ ॥

गायत्रीछंद जें म्हणिजे, तें सकळां छंदांमाजीं माझें।
स्वरूप हें जाणिजे, निभ्रांत तुवां ॥ २८२ ॥

मासांआंत मार्गशीरु, तो मी म्हणे शारङ्गधरु।
ऋतूंमाजीं कुसुमाकरु, वसंतु तो मी ॥ २८३ ॥

  द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहम्।
  जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्वं सत्त्ववतामहम् ॥ ३६॥

  वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनंजयः।
  मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः ॥ ३७॥

छळितयां विंदाणा-, माजीं जूं तें मी विचक्षणा।
म्हणोनि चोहटां चोरी परी कवणा, निवारूं न ये ॥ २८४ ॥

अगा अशेषांही तेजसां-, आंत तेज तें मी भरंवसा।
विजयो मी कार्योद्देशां, सकळांमाजीं ॥ २८५ ॥

जेणें चोखाळत दिसे न्याय, तो व्यवसायांत व्यवसाय।
माझें स्वरूप हें राय, सुरांचा म्हणे ॥ २८६ ॥

सत्त्वाथिलियांआंतु, सत्त्व मी म्हणे अनंतु।
यादवांमाजीं श्रीमंतु, तोचि तो मी ॥ २८७ ॥

जो देवकी-वसुदेवास्तव जाहला, कुमारीसाठीं गोकुळीं गेला।
तो मी प्राणासकट पियाला, पूतनेतें ॥ २८८ ॥

नुघडतां बाळपणाची फुली, जेणें मियां अदानवीं सृष्टि केली।
करीं गिरि धरूनि उमाणिली, महेंद्रमहिमा ॥ २८९ ॥

कालिंदीचें हृदयशल्य फेडिलें, जेणें मियां जळत गोकुळ राखिलें।
वासरुवांसाठीं लाविलें, विरंचीस पिसें ॥ २९० ॥

प्रथमदशेचिये पहांटे-, माजीं कंसा ऐशीं अचाटें।
महाधेंडीं अवचटें, लीळाचि नासिलीं ॥ २९१ ॥

हें काय कितीएक सांगावें, तुवांही देखिलें ऐकिलें असे आघवें।
तरि यादवांमाजीं जाणावें, हेंचि स्वरूप माझें ॥ २९२ ॥

आणि सोमवंशीं तुम्हां पांडवां-, माजीं अर्जुन तो मी जाणावा।
म्हणोनि एकमेकांचिया प्रेमभावा, विघडु न पडे ॥ २९३ ॥

संन्यासी तुवां होऊनि जनीं, चोरूनि नेली माझी भगिनी।
तऱ्ही विकल्पु नुपजे मनीं, मी तूं दोन्ही स्वरूप एक ॥ २९४ ॥

मुनीआंत व्यासदेवो, तो मी म्हणे यादवरावो।
कवीश्वरांमाजीं धैर्या ठावो, उशनाचार्य तो मी ॥ २९५ ॥

  दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम्।
  मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम् ॥ ३८॥

अगा दमितयांमाझारीं, अनिवार दंडु तो मी अवधारीं।
जो मुंगियेलागोनि ब्रह्मावेरीं, नियमित पावे ॥ २९६ ॥

पैं सारासार निर्धारितयां, धर्मज्ञानाचा पक्षु धरितयां।
सकळ शास्त्रांमाजीं ययां, नीतिशास्त्र तें मी ॥ २९७ ॥

आघवियाचि गूढां-, माजीं मौन तें मी सुहाडा।
म्हणोनि न बोलतयां पुढां, स्त्रष्टाही नेण होय ॥ २९८ ॥

अगा ज्ञानियांचिया ठायीं, ज्ञान तें मी पाहीं।
आतां असो हें ययां कांहीं, पार न देखों ॥ २९९ ॥

  यच्चाऽपि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन।
  न तदस्ति विना यत्स्यान्मया भूतं चराचरम् ॥ ३९॥

  नान्तोऽस्ति मम दिव्यांना विभूतीनां परंतप।
  एष तूद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया ॥ ४०॥

पैं पर्जन्याचिया धारां, वरी लेख करवेल धनुर्धरा।
कां पृथ्वीचिया तृणांकुरां, होईल ठी ॥ ३०० ॥

पैं महोदधीचिया तरंगां, व्यवस्था धरूं नये जेवीं गा।
तेवीं माझिया विशेष लिंगां, नाहीं मिती ॥ ३०१ ॥

ऐशियाही सातपांच प्रधाना, विभूती सांगितलिया तुज अर्जुना।
तो हा उद्देशु जो गा मना, आहाच गमला ॥ ३०२ ॥

येरां विभूतिविस्तारांसि कांहीं, एथ सर्वथा लेख नाहीं।
म्हणौनि परिससीं तूं काई, आम्हीं सांगों किती ॥ ३०३ ॥

यालागीं एकिहेळां तुज, दाऊं आतां वर्म निज,
सर्वभूतांकुरें बीज, विरूढत असे तें मी ॥ ३०४ ॥

म्हणोनि सानें थोर न म्हणावें, उंच नीच भाव सांडावे।
एक मीचि ऐसें मानावें, वस्तुजातातें ॥ ३०५ ॥

तरी यावरी साधारण, आईक पां आणिकही खूण।
तरी अर्जुना तें तूं जाण, विभूति माझी ॥ ३०६ ॥

  यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा।
  तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंऽशसंभवम् ॥ ४१॥

जेथ जेथ संपत्ति आणि दया, दोन्ही वसती आलिया असती ठाया।
ते ते जाण धनंजया, विभूति माझी ॥ ३०७ ॥

  अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन।
  विष्टभ्याहमिदं कृत्स्नजमेकांशेन स्थितो जगत् ॥ ४२॥

अथवा एकलें एक बिंब गगनीं, तरी प्रभा फांके त्रिभुवनीं।
तेवीं एकाकियाची सकळ जनीं, आज्ञा पाळिजे ॥ ३०८ ॥

तयांतें एकलें झणीं म्हण, ते निर्धन या भाषा नेण।
काय कामधेनूसवें सर्व साहान, चालत असे ॥ ३०९ ॥

तियेतें जें जेधवां जो मागे, तें ते एकसरेंचि प्रसवों लागे।
तेवीं विश्वविभव तया अंगें, होऊनि आहाति ॥ ३१० ॥

तयातें वोळखावया हेचि संज्ञा, जे जगें नमस्कारिजे आज्ञा।
ऐसें आथि तें जाण प्राज्ञा, अवतार माझे ॥ ३११ ॥

आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष।
कां जे मीचि एक अशेष, विश्व आहे म्हणोनि ॥ ३१२ ॥

तरी आतां साधारण आणि चांगु, ऐसा कैसेनि पां कल्पावा विभागु।
वायां आपुलियेचि मती वंगु, भेदाचा लावावा ॥ ३१३ ॥

एऱ्हवीं तरी तूप कासया घुसळावें, अमृत कां रांधूनि अर्धें करावें।
हां गा वायूसि काय पां डावें, उजवें अंग आहे ॥ ३१४ ॥

पैं सूर्यबिंबासि पोट पाठीं, पाहतां नासेल आपुली दिठी।
तेवीं माझ्या स्वरूपीं गोठी, सामान्यविशेषाची नाहीं ॥ ३१५ ॥

आणि सिनाना इहीं विभूतीं, मज अपारातें मविसील किती।
म्हणोनि किंबहुना सुभद्रापती, असो हें जाणणें ॥ ३१६ ॥

आतां पैं माझेनि एकें अंशें, हें जग व्यापिलें असे।
यालागीं भेदू सांडूनि सरिसें, साम्यें भज ॥ ३१७ ॥

ऐसें विबुधवनवसंतें, तेणें विरक्तांचेनि एकांतें।
बोलिलें जेथ श्रीमंतें, श्रीकृष्णदेवें ॥ ३१८ ॥

तेथ अर्जुन म्हणे स्वामी, येतुलें हें राभस्य बोलिलेती तुम्हीं।
जे भेदु एक आणि आम्हीं, सांडावा एकीं ॥ ३१९ ॥

हां हो सूर्य म्हणे काय जगातें, अंधारें दवडा कां परौतें।
तेवीं धसाळ म्हणों देवा तूंतें, तरी अधिक हा बोलु ॥ ३२० ॥

तुझें नांवचि एक कोण्ही वेळे, जयांचिये मुखासि कां कानां मिळे।
तयांचिया हृदयातें सांडूनि पळे, भेदु जी साच ॥ ३२१ ॥

तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें।
तरी आतां भेदु कायसा कें, देखावा कवणें ॥ ३२२ ॥

जी चंद्रबिंबाचा गाभारां, रिगालियावरीही उबारा।
परी राणेपणें शारङ्गधरा, बोला हें तुम्हीं ॥ ३२३ ॥

तेथ सावियाचि परितोषोनि देवें, अर्जुनातें आलिंगिलें जीवें।
मग म्हणे तुवां न कोपावें, आमुचिया बोला ॥ ३२४ ॥

आम्हीं तुज भेदाचिया वाहाणीं, सांगितली जे विभूतींची कहाणी।
ते अभेदें काय अंतःकरणीं, मानिली कीं न मनें ॥ ३२५ ॥

हेंचि पाहावयालागीं, नावेक बोलिलों बाहेरिसवडिया भंगीं।
तंव विभूती तुज चांगी, आलिया बोधा ॥ ३२६ ॥

येथ अर्जुन म्हणे देवें, हें आपुलें आपण जाणावें।
परी देखतसें विश्व आघवें, तुवां भरलें ॥ ३२७ ॥

पैं राया तो पांडुसुतु, ऐसिये प्रतीतीसि जाहला वरैतु।
या संजयाचिया बोला निवांतु, धृतराष्ट्र राहे ॥ ३२८ ॥

कीं संजयो दुखवलेनि अंतःकरणें, म्हणतसे नवल नव्हे दैव दवडणें।
हा जीवें धाडसा आहे मी म्हणें, तंव आंतुही आंधळा ॥ ३२९ ॥

परी असो हें तो अर्जुनु, स्वहिताचा वाढवितसे मानु।
कीं याहीवरी तया आनु, धिंवसा उपनला ॥ ३३० ॥

म्हणे हेचि हृदयाआंतुली प्रतीती, बाहेरी अवतरो कां डोळ्यांप्रती।
इये आर्तीचां पाउलीं मती, उठती जाहली ॥ ३३१ ॥

मियां इहींच दोहीं डोळां, झोंबावें विश्वरूपा सकळा।
एवढी हांव तो दैवाआगळा, म्हणऊनि करी ॥ ३३२ ॥

आजि तो कल्पतरूची शाखा, म्हणोनि वांझोळें न लगती देखा।
जें जें येईल तयाचि मुखा, तें तें साचचि करितसे येरु ॥ ३३३ ॥

जो प्रल्हादाचिया बोला, विषाहीसकट आपणचि जाहला।
तो सद्गुहरु असे जोडला, किरीटीसी ॥ ३३४ ॥

म्हणोनि विश्वरूप पुसावयालागीं, पार्थ रिगता होईल कवणें भंगीं।
तें सांगेन पुढिलिये प्रसंगीं, ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा ॥ ३३५

ॐ तत्सदिति श्रीमद्भ्गयवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः ॥ १० ॥

इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां दशमोऽध्यायः ॥